२२. रामदासला अटक

माया व रामदास यांचा सुखाचा नवसंसार सुरू झाला होता. रामपूर येथील स्वतःच्या वाडयाचा रामदासने सार्वजनिक दवाखाना केला. ती एक सुंदर संस्था झाली. संस्थेसाठी त्याने एक कायम निधी करून दिला. संस्थेमार्फत एक फिरता डॉक्टर ठेवण्यात आला होता. त्याला रविवारची सुट्टी. उरलेले सहा दिवस त्याने खेडयांवरून हिंडावे, मोफत औषधे द्यावीत. शेतकर्‍यांस मोठाच आधार झाला. दीनबंधू रामदासाला दुवा मिळू लागला. रामदास स्वतः खेडयापाडयांतून हिंडे. शेतकर्‍यांची सुख-दुःखे पाही. त्यांच्यात तो संघटना करीत होता. गावोगांवची अस्पृश्यता दूर करीत होता. गावातील पक्षोपपक्ष नाहीसे करीत होता. तो एखाद्या गावी जाई. प्रमुख मंडळींना एकत्र जमवी. त्यांच्यातील कुरबुरी ऐकून घेई. त्यांच्याजवळ मोकळेपणाने बोले, चर्चा करी. सूत कातायला सांगे. घरोघरी जाऊन आया-बहिणींशी बोले. शाळेत जाऊन मुलांना एखादी गोष्ट सांगे. कोठे विहीर दुरुस्त करून देई. कोठे गावातील मंडळींत स्वाभिमान व सहकार्य उत्पन्न करून रस्ता दुरुस्त करायला लावी व त्यांच्याबरोबर स्वतः श्रमे, खपे. कधी-कधी त्याच्याबरोबर मायाही येत असे. मायेच्या भोवती मुलं जमत. ती त्यांना एखादे चित्र पटकन काढून देई. एखादे गमतीचे चित्र काढून हसवी. एकदा एके ठिकाणी एक म्हातारी जात्यावर दळीत होती. रामदास चावडीवर पुढार्‍यांशी बोलत होता. माया गावात हिंडत होती. त्या म्हातारीला तिने दळताना पाहिले. एकटी दळीत होती. जाते जड येत होते. तेथे माया गेली. ''मी लावते तुम्हाला हात. तुम्ही ओव्या म्हणा.'' असे म्हणून खरोखरच दळू लागली. ''नको आई, तू कशाला?'' म्हातारी म्हणाली. ''माझी आई तू; माझी आई लांब आहे हजार मैलांवर. येथील आई तुम्हीच. आईला मदत करू दे.'' माया म्हणाली. म्हातारी ओव्या म्हणू लागली. राम-सीतेच्या ओव्या. मायेला आनंद होत होता. आसपासच्या बायका पाहायला आल्या. इतक्यात रामदास तेथे आला.

''तुला किती शोधायचं? म्हटलं बंगालमध्ये पळालीस की काय?'' रामदास हसून म्हणाला.

''चल बरं रस्ता खणायला !'' त्याने सांगितले.

''चला, दाखवते खणून.'' असे म्हणून माया उठली. म्हातारीही उठली. मायेच्या कपाळावर घाम आला होता. म्हातारीनं तो आपल्या पदरानं पुसला.

''देवमाणसं आहात तुम्ही.'' ती म्हणाली.

''खरी देवमाणसं तुम्ही. तुमची पूजा करून, सेवा करून, आम्हाला थोडं पवित्र होऊ दे.'' माया म्हणाली.
रामदास व माया निघाली. मायेच्या हातून गावचा रस्ता दुरुस्त करण्याचा समारंभ व्हावयाचा होता. गावातील तरुण तेथे जमले होते.

''ही घे कुदळ व मार चार घाव. रामदास म्हणाला.

मायेने पदर बांधला, ओचा खोचला, कुदळ घेऊन ती खणू लागली. कठीण होता रस्ता. तो का खणला जातो?

''पुरे आता. आम्ही करतो काम. टिकमनं खणलं पाहिजे.'' एक तरुण म्हणाला.

''हे काही स्वयंपाकघर नाही; पळीच्या दांडयानं सारवण्याआधी खरपुडया काढतेस तसं नाही येथे, चल आता.'' रामदास म्हणाला. अशा सुंदर रीतीने दोघांचा वेळ जात होता.

कधी माया चित्र काढीत बसे. सुंदर चित्रे बंगाली मासिकाकडे पाठवित असे. मराठीतील 'कला' या मासिकातही तिची दोन चित्रे प्रसिध्द झाली. ग्रामीण जीवनावर ती काही चित्रे तयार करणार होती. रामदास कधी-कधी आश्रमात सायंप्रार्थनेनंतर दिलरुबा वाजवी. स्त्री-पुरुष ऐकायला येत. त्यांना आनंद होई, दुःखाचा थोडा विसर पडे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel