दगडालाही भावना असतात, असे आपण ठरविले आहे. दगडाच्या न बोलत्या देवाला मोदक आवडतात की लोणीसाखर आवडते, हे आपण ठरविले; परंतु आजूबाजूला लाखो बोलणारे चैतन्यमय देव आहेत, त्यांना दुपारी नैवेद्य मिळाला की नाही, याची मात्र वास्तपुस्त आपण घेत नाही. दगडाच्या देवाला सोन्याचांदीचे मुकुट आहेत. त्यांच्या कासेला पीतांबराची धटी आहे; परंतु सभोवतालच्या लाखो बंधूंना थंडीच्या दिवसांत डोक्याला बांधावयास फडके नाही व अंगावर घालावयाला चिंधी नाही. काय ही मूर्तिपूजा ! त्या मूर्तीत जर खरोखर देव असेल तर तो काय म्हणेल ? ईश्वराची लाखो लेकरे अन्नान्नदशेत असताना त्या दगडांच्या देवाला अन्नकोट रुचतील का ? लाखो लेकरांना पांघरायला नाही, देवाला पीतांबर रुचतील का ? तुमचे पीतांबर देवाला सापासारखे वाटतील. तुमची ती चंदनचर्चने देवाला निखा-याप्रमाणे वाटतील. तुमचे ते मुकुट देवाला काटयाप्रमाणे वाटतील. एखाद्या भाग्यवंत मातेला बरीच मुले असावीत; परंतु त्या मुलांतील एक दोन मुले इतरांपेक्षा प्रबळ झाली. समजा, इतर भावांची हे दोन भाऊ मुळीच काळजी घेत नाहीत, त्यांना ना देत खायला, ना देत प्यायला; परंतु भावांना जरी विचारीत नसले तरी ते दोन भाऊ आईकडे जातात व म्हणतात, 'आई ! तुझ्यावर आमची भक्ती आहे. ही घे तुला पैठणी. हे घे मोत्याचे दागिने.' त्यावेळेस माता काय म्हणेल ? ती म्हणेल, 'बाळांनो ! इतर भावांना तुम्ही लाथा मारता. त्यांना घासही तुम्ही देत नाही, त्यांची चिंता वहात नाही. मला हे कसे घेववेल ? माझ्या मुलांना आधी द्या. त्यांना मिळाले म्हणजे मला पोचले. माझ्या मुलांचे गाल वर आले म्हणजे माझेही गाल आनंदाने फुलतील. माझ्या मुलांना अंथरा-पांघरायला, नेसायला मिळाले म्हणजे सारी महावस्त्रे मला मिळाली; परंतु हे जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत या वस्तूंना माझ्याच्याने कसा हात लाववेल ? तुम्ही प्रेमाने मला नटविलेत तरी मी शोकाग्नीने जळूनच जाईन.' सा-या भावांनी प्रेमाने परस्परांची काळजी वहात एकत्र नांदणे यात मातेची खरी पूजा असते.

परमेश्वराला आपण एकीकडे माता म्हणतो व दुसरीकडे त्याच्या लाखो लेकरांना लाथा मारतो. परमेश्वर जर खरीखुरी माता असेल तर मातेजवळ सर्व लेकरांना का जाता येऊ नये ? अस्पृश्यांना, हरिजनांना मनात आले तर या मातेच्या पायांजवळ का जाता येऊ नये ? त्या हरिजनांना तर दूर ठेवतो ! त्यांना दूर करताच दगडात देव न राहता तेथे दगडच राहतो व त्याच्यासमोर हात जोडणाराही दगडच उभा असतो. दूर असलेल्याबद्दल मातेला काळजी. त्याप्रमाणे ज्याला सर्वांनी दूर ठेविले आहे त्याच्याजवळ देव असणार.

लोक म्हणतात, 'हरिजन सर्वत्र आले तरी चालतील; परंतु मंदिरांत नाही येता कामा,' मी म्हणेन, 'इतर जागी नका येऊ देऊ; परंतु मंदिरात तर आधी येऊ दे.' मंदिराला मंदिरत्व तरच येईल. तरच त्या दगडाला देवपण येईल. ईश्वरासमोर मी ब्राह्मण, मी उच्च, असे भेद का माजवावयाचे ? सारे भेद जेथे विसरावयाचे, तेथेही भेदांचा बुजबुजाट करावयाचा का ? बाहेर परस्परांवर भुंकतोच; परंतु मंदिरात ईश्वराच्या समोर एकमेकांवर भुंकावयाचे का ? तेथेही आपली जानवी, आपल्या शेंडया, आपली गोत्रे, आपली नावे, आपली आडनावे, यांची विस्मृती नाही का होऊ द्यावयाची ! हे उच्चपणाचे बिल्ले, ही श्रेष्ठ वर्गाची पदके छातीवर लटकावून का त्या त्रिभुवन-सुंदराजवळ, कारुण्यसिंधूजवळ, त्या जगन्माऊलीजवळ जावयाचे ?

'तेथ जातीव्यक्ती पडे बिंदुले'


अरे ! देवासमोर जातीव्यक्तीच्या नावाने शून्याकार होऊ दे. तेथेही मोठेपणा मिरवणार का ? तेथे मातीचे कण व्हा, पाण्याचे बिंदू व्हा व त्या अनंतात मिसळा. येऊ देत सारे. येऊ देत आईजवळ सारी लेकरे. पावित्र्य व प्रेम यांचा पूर होऊ दे क्षणभर ! भेदातीतता, अद्वैत सर्वांना अनुभवू दे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel