बोधिसत्त्वाच्या समाधीचा विषय

बोधिसत्त्वाच्या ध्यानाचा विषय कोणता हे सांगणे सोपे नाही. प्रथमध्यान ज्यावर साधते असे एकंदरीत सव्वीस विषय* आहे. त्यापैकी बोधिसत्त्वाच्या ध्यानाचा विषय कोणता हे नक्की सांगता येणे जरी कठीण आहे, तरी मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या चार विषयापैकी एखाद्या विषयावर तो ध्यान करीत असावा, असे अनुमान अप्रस्तुत होणार नाही. का की, ते त्याच्या प्रेमळ स्वभावाला अनुसरून होते. आणि त्याला एक दुसरा आधार सापडतो तो असा –
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*बुद्धघोषाचार्याच्या आणि अभिधर्माच्या मते पंचवीस विषय, पण उपेक्षेवर देखील प्रथमध्यान साध्य होते, असे गृहीत धरले तर सव्वीस विषय समाधिमार्गे पृ. ६८-६९ पाहा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
+समाधिमार्गे, पृ. ३१-३५ पाहा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
“बुद्ध भगवान कोलिय देशात हरिद्रवसन नावाच्या कोलियांच्या शहराजवळ राहत असता काही भिक्षु सकाळच्या प्रहरी भिक्षाटन करण्यापूर्वी इतर परिव्राजकांच्या आरामात गेले, तेव्हा ते परिव्राजक त्यांना म्हणाले, ‘आम्ही आमच्या श्रावकांना उपदेश करतो की मित्रहो, चित्ताचे उपक्लेश आणि चित्ताला दुर्बल करणारी जी पाच नीवरणे आहेत ती सोडून तुम्ही मैत्रीसहगत चित्ताने एक दिशा भरून टाका. दुसरी, तिसरी व चौथी भरून टाका. त्याचप्रमाणे वर, खाली व चोहोबाजूला सर्व जगत् विपुल, श्रेष्ठ, निस्सीम, अवैर व द्वेषरहित मैत्रीसहगत चित्ताने भरून टाका. करुणासहगत चित्ताने... मुदितसहृगतचित्ताने.. उपेक्षासहगतचित्ताने भरून टाका. श्रमण गोतम देखील असाच उपदेश करतो. मग त्याच्या आणि आमच्या उपदेशात फरक कोणता?” (बीज्झंगसंयुक्त वग्ग ६, सुत्त ४)

शाक्य आणि कौलिय शेजारी असून त्यांचा निकट संबंध होता, आणि कधी कधी रोहिणी नदीच्या पाण्यासंबंधाने त्यांच्यात भांडणे उपस्थित होत, असा उल्लेख जतकअट्ठकथेत आणि इतर अट्ठकथातून पुष्कळ ठिकाणी आला आहे. त्या कोलियच्या राज्यात अन्य पंथातील परिव्राजक बौद्ध संघातील भिक्षूंना वरील प्रश्न विचारतात. हे परिव्राजक तेथे बर्‍याच वर्षापासून राहत असले पाहिजेत. त्यांचा आश्रम बुद्धाने धर्मोपदेश करण्याला सुरुवात केल्यानंतर स्थापन झाला नाही, तो पूर्वीपासूनच तेथे होता हे खास आणि हे परिव्राजक मैत्री करुणा, मुदिता व उपेक्षा ह्या चार ब्रह्मविहारांची पावना करावी, असा उपदेश करीत.* तेव्हा ते कालामाच्याच पंथातील होते, असे समजण्याला हरकत कोणती? निदान हे ब्रह्मविहार बोधिसत्त्वाला तरुणपणीच माहीत होते आणि तो त्याजवर ध्यान करून प्रथमध्यान संपादीत असे, या विधानाला बाधा येत नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*ह्या ब्रह्मविहाराचे स्पष्टीकरण समाधिमार्गाच्या पाचव्या प्रकरणात केले आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel