मगध आणि कोसल या देशांत एकसत्ताक राज्यपद्धति दृढमूल झाली असली तरी त्या देशाच्या राजांना मूळच्या गणसत्ताक राज्यपद्धतीचे समूळ उन्मूलन करता आले नाही. बिंबिसार महाराजाने किंवा पसेनदि महाराजाने कोणत्याही स्त्रीला जबरदस्तीने आपल्या झनानखान्यात आणल्याचा दाखला कोठेच सापडत नाही.

काही एकसत्ताक राज्यात स्त्रियांचा मान

गणसत्ताक राज्यपद्धति लोकांच्या स्मृतिपथांतून जात चालली आणि एकसत्ताक राज्यपद्धति जसजशी प्रबळ होत गेली तस तसे स्त्रियांचे स्वातंत्र्य देखील संपुष्टात येत चालले, तथापि काही राजे स्त्रियांचा योग्य मान ठेवीत असे उन्मादयन्तीच्या (उम्मदंतीच्या) गोष्टीवरून दिसून येईल.* (*उन्मदंतीजातक नं. ५२७.)

बोधिसत्त्व शिवि राजकुलात जन्मला. त्याला शिविकुमार असेच म्हणत. शिवी राजाच्या सेनापतीचा पुत्र अभिपारक आणि शिविकुमार समवयस्क होते. तक्षशिलेला जाऊन त्या दोघांनी शस्राध्यन केले. बापाच्या मरणांतर शिविकुमार राजा झाला. आणि सेनापतीच्या मरणानंतर त्याने अभिपारकाला सेनापति केले. अभिपारकाने उन्मादयन्ती नावाच्या अत्यंत सुस्वरूप श्रेष्ठिकन्येशी लग्न केले. राजा नगरप्रदक्षिणेला निघाला असता खिडकीत उभी असलेल्या उन्मादयंतीची व त्याची दृष्टादृष्ट झली. राजा तिच्यावर मोहित होऊन उन्मत्त झाला व राजवाड्यात जाऊन बिछान्यावर पडून राहिला. अभिपारकाला हे वर्तमान समजले तेव्हा राजाजवळ जाऊन आपल्या बायकोचा स्वीकार करून उन्मत्तपणा सोडून देण्याबद्दल राजाची त्याने प्रार्थना केली. त्यामुळे राजा शुद्धीवर येऊन म्हणाला, “हा शिविचा धर्म नव्हे. मी शिवीचा पुढारी आहे. आणि शिविचा धर्म अनुपालन करणे माझे कर्तव्य आहे, म्हणून माझ्या चित्तविकराला वश होणे मला योग्य नव्हे.”

ही कथा विस्तृत आणि रोचक आहे. तिचे सार तेवढे येथे दिले आहे. ही रचणाऱाच्या वेळी गणसत्ताक राज्यपद्धति पार नष्ट झली होती असे दिसते. तथापि शिविसारख्या गणसत्ताक राजांचे स्त्रियांविषयीचे कर्तव्य त्याला पूर्णपणे माहीत होते, आणि ते सर्वसत्ताधारी राजांनी लक्षात ठेवावे असा त्याचा हेतु होता. शिविकुमाराच्या भाषणाच्या शेवटी त्याने ही गाथा घातली आहे –

नेता पिता उग्गतो रट्ठपालो
धम्मं सिविनं अपचायमानो।
सो धम्ममेवनिचिन्तयन्तो
तस्मा सके चित्तवसे न दत्ते।।

‘मी शिवीचा नेता, पिता आणि राष्ट्रपालक पुढारी आहे. म्हणून शिवीच्या कर्तव्याला मान देऊन आणि शिवीच्या धर्माचा नीट विचार करून माझ्या स्वत:च्या चित्तविकाराला मी वश होणार नाही.’

बालविवाहाची प्रथा

या गोष्टीचा परिणाम बौद्ध राजावर तरी चांगलाच झाला असला पाहिजे. पण त्यामुळे दुसरीच एक वाईट चाल निघाली असावी. ब्रह्मदेशातील राजे विवाहित स्त्रीला आपल्या झनानखान्यात ठेवीत नसत, जरी विवाहित स्त्रीच्या पतीने आपल्या बायकोशी काडीमोड करून तिला राजाच्या हवाली करण्याचे कबूल केले तरी हा मोठा अधर्म समजत असत. पण अविवाहित स्त्रीला तिच्या आईबापांच्या संमतीशिवाय खुशाल उचलून घेऊन जात. राजा आपल्या मुलीला जबरदस्तीने नेईल या भयाने आईबाप मुलीचे लग्न लहानपणीच करून त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधीत. ही लग्न साफ खोटी असत. मुली नवर्‍याच्या घरी जात नसत. एवढेच नव्हे तर पहिला नवरा सोडून वाटेल त्या नवर्‍याशी लग्न लावण्यास त्यांना पूर्ण मुभा असे. केवळ राजांच्या जुलमापासून मुलीचे रक्षण करण्याचा हा उपाय होता. हिंदुस्थानात बालविवाहाची दृढमूल झालेली चाल अशाच परिस्थितीतून निघाली की काय हे सांगता येणे शक्य नाही. पण ही चाल बुद्धसमकाली सार्वत्रिक झाली नव्हती आणि एकसत्ताक राज्यपद्धति बळकट झाल्यावर ती धार्मिक होऊन बसली, याबद्दल शंका नाही. हिंदुस्थानात गणसत्ताक राज्यपद्धतीचा विकास झाला असता तर बालविवाहाला मुळीच थारा मिळाला नसता हे सांगावयालाच नको.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel