भिक्षुसंघाच्या शिस्तीचा प्रभाव

सकाळच्या प्रहरी भगवान भिक्षेला जात असता कधी कधी निरनिराळ्या परिव्राजकांच्या आश्रमांना भेट देई. भगवंताला पाहून परिव्राजकोंचे पुढारी आपल्या शिष्यांना म्हणत, ‘‘हा श्रमण गोतम येतो. त्याला गडबड आवडत नाही. यास्तव तुम्ही मोठमोठय़ाने गोष्टी न करता जरा शांत बसा.’’ अशाच एका प्रसंगाचे वर्णन मज्झिमनिकायातील महासकुलुदायिसुत्तात (नं. ७७) आहे. त्यात बुद्धाच्या दिनचर्येतील दुसर्‍याही काही गोष्टींचा खुलासा आला असल्यामुळे त्याचा संक्षिप्त गोषवारा येथे देतो.

भगवान राजगृह येथे वेणुवनातील कलंदकनिवापात राहत होता. त्या वेळी काही प्रसिद्ध परिव्राजक मोरनिवापोतील परिव्राजकांच्या आरामात राहत असत. एके दिवशी सकाळी भगवान काजगृहात भिक्षाटन करण्याला निघाला. भिक्षाटनाला जाण्याचा समय झाला नसल्यामुळे भगवान वाटेत त्या परिव्राजकांच्या आश्रमाकडे गेला. तेथे सकुलुदायि आपल्या मोठया पारिव्राजकसभेत बसला होता; आणि ते परिव्राजक राजकथा, चोरकथा, महामात्यकथा, सेनाकथा, भयकथा, युद्धकथा इत्यादि भलत्यासलत्या गोष्टी मोठमोठय़ाने बोलत होते. सकलदायाने आश्रमाच्या काही अंतरावर भगवंताला पाहिले; आणि तो आपल्या शिष्यांना म्हणाला, ‘‘ बाबांनो, मोठ्याने बोलू नका. गडबड बंद करा. हा श्रमण गोतम येत आहे. त्याला हळू बोलणे आवडते, व हळू बोलण्याची तो स्तुति करतो. आम्ही गडबड केली नाही, तरच या सभेत येमे त्याला योग्य वाटेल.’’

ते परिव्राजक शांत झाले. आणि भगवान सकुलदायि परिव्राजक होता तेथे आला. तेव्हा सकुलुदायि भगवंताला म्हणाला, ‘‘भगवान, या भगवंताचे स्वागत असोभगवान चिरकालाने आमच्या सभेत आले. आपणांसाठी हे आसन तयार केले आहे, त्यावर बसा.’’

त्या आसनावर भगवान बसला आणि आपल्याजवळ बसलेल्या सकुलुदायि परिव्राजक म्हणाला, ‘‘उदायि, येथे तुमच्या काय गोष्टी चालल्या होत्या?’’

उदायि-- भगवान , आमच्या गोष्टी राहू द्या. त्या दुर्लक्ष नाहीत. पण मला एक गोष्ट आठवते. काही कालामागे निरनिराळ्या संप्रदायांचे श्रमण ब्राह्मण एका कौतुहलशालेत जमले होते. त्यांच्यात प्रश्न उपस्थित झाला की, पूरण सक्कप, मक्खलि गोसाल, अजित केसकंबल, यकुध कच्चायेन, संजय बेलट्ठपुत्त, निगण्ठ नाथपुत्तआणि श्रमण गोतम, असे हे मोठमोठाल्या संघाचे पुढारी आजला राजगृहाजवळ वर्षावासासाठी राहत आहेत, हे अंगमगधांतील लोकांचे मोठे भाग्य समजले पाहिजे पण या पुढार्‍यात श्रावक ज्याचा योग्य मानंरातब राखतात, असा पुढारी को आणि श्रावक त्याच्या आश्रयाखाली कसे कसे वागतात.
तेव्हा काही जण म्हणाले, ‘‘हा पूरण सक्कप प्रसिद्ध पुढारी आहे. परंतु श्रावक त्याचा मान ठेवीत नाहीत आणि त्याच्या आश्रयाखाली राहू इच्छित नाहीत. त्यांच्यांत तक्रारी उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे दुसर्‍या काही जणांनी सक्खलि गोसाल इत्यादि पुढार्‍याच्या श्रावकांमध्ये कशा तक्रारी होतात. याचे वर्णन केले. अखेरीस काही जण म्हणाले, ‘‘ हा श्रमण गोतम प्रसिद्ध पुढारी आहे. त्याचे श्रावक त्याचा योग्य मान राखतात. आणि त्याच्या आश्रयाखाली राहतात. एकदा गोतम मोठ्या सभेत धर्मोपदेश करीत होता. तेथे श्रमण गोतमाचा एक श्रावक खोकला. त्याला गुढघ्याने दाबून दुसरा हळूच म्हणाला, ‘गडबड करू नकोस, आमचा शास्ता(गुरु) धर्मोपदेश करीत आहे.’ ज्यावेळी श्रमण गोतम शकडो लोकांच्या परिषदेत धर्मोपदेश करतो., त्यावेळी त्याच्या श्रावकांचा शिंकेचा किंवा खोकल्याचा देखील शब्द ऐकू येत नसतो. लोक मोठय़ा आदराने त्याचा धर्म ऐकण्यास तत्पर असतात..’’
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel