परिशिष्ट तिसरे
अशोकाचा भाब्रू शिलालेख आणि त्यात निर्देशिलेली सूत्रे


भाब्रू हे स्थान जयपूर संस्थानातील एक डोंगराळ प्रदेशात आहे. तेथे राहणार्‍या भिक्षूसंघाने अशोक राजापाशी संदेश मागितल्यामुळे अशोकाने हा संदेश पाठविला व तो एका शिलेवर कोरावयास लावला असावा. अशा प्रकारचे संदेश अशोक वारंवार पाठवीत असावा. परंतु त्यापैकी जे त्याला महत्त्वाचे वाटते, तेच तो शिलांवर किंवा शिलास्तंभावर कोरावयास लावी. ह्या शिलालेखांत निर्देशिलेली सूत्रे मगधदेशातील बौद्धांनी वाचावी असे संदेश तोंडी किंवा पत्राने अशोकाने पाठविलेलीच असतील; पण ते कोरावयास लावले नाहीत. का की, आसपासचे संघ काय करतात, काय वाचतात, याचे वर्तमान त्याला वारंवार समजत होते. त्यासाठी त्याने खास अधिकारी नेमले होते. परंतु राजपुतान्यासारख्या दूरच्या प्रदेशातून बातम्या येण्यास उशीर लागत होता. तेव्हा असा एक शिलालेख तेथे राहणे अशोकाला योग्य वाटले असावे. माझ्या समजूतीप्रमाणे या शिलालेखाचे भाषांतर खाली देत आहे.

भाब्रू शिलालेखाचे भाषांतर

‘‘प्रियदर्शी मगधराजा संघाला अभिवादन करून संघाचे स्वास्थ व सुखनिवास विचारतो. भदन्त, आपणाला, माझा बुद्ध धर्म व संघ यांविषयी किती आदर व भक्ति आहे हे माहित आहेच. भगवान बुद्धाचे वचन सर्वच वचन सुभाषित आहे. पण, भदन्त, जे मी येथे निर्देशितो ते एवढय़ासाठीच की सद्धर्म चिरस्थायी व्हावा, आणि त्याचसाठी बोलणे योग्य वाटते. भदन्त, हे धर्मपर्याय(सूत्रे) आहेत-- विनयसमुकसे, अलियवसानि, अनागतभयानि, मुनिगाथा, मोनेयसुत्ते, उपतिसपसिने आणि राहुलला केलेल्या उपदेशात खोटे बोलण्यास उद्देशून जे भगवान बुद्धाने भाषण केले ते. ह्या सूत्रासंबंधाने, भदन्त, माझी इच्छा अशी की. ती पुश्कळ भिक्षूंनी व भिक्षूणींनी वारंवार ऐकावी व पाठ करावी. त्याचप्रमाणे उपासकांनी व उपासिकांनी, भदत, हा लेख मी कोरावयास लावला आहे; कारण माझे अभिहित (संदेश) सर्वजण जाणोत.’’

अलियवसानि किवा अरियवंससुत्त

हे सुत्त अंगुत्तरनिकायाच्या चतुक्कनिपातात सापडते. त्याचे रूपांतर येणेप्रमाणे—

भिक्षुहो, हे चार आर्यवंश अग्र व फारा दिवसांचे वंश आहेत. ते प्रश्नचीन व असंकिर्ण असून कधीही संकीर्ण झाले नाहीत, संकीर्ण होत नाहीत व संकीर्ण होणार नाहीत. त्यांना कोणत्याही श्रमणांनी व ब्रााह्मणांनी दोष लावलेला नाही. ते चार कोणते?

येथे भिक्षु मिळेल तशा चीवराने संतुष्ट होतो, अशा संतुष्टीची स्तुति करतो, चीवरानसाठी अयोग्य आचरण करीत नाही, चीवर नाही मिळाले तर त्रस्त होत नाही, मिळाले तर हावरा न होता, मत्त न होता, आसक्त न होता चीवरात दोष जाणून केवळ मुक्तीसाठी ते वापरतो. आणि त्या आपल्या तशा प्रकारच्या संतुष्टीने आत्मस्तुति व परनिंदा प्रश्नचीन अग्र आर्यवंशाला अनुसरून वागणारा भिक्षु म्हणतात.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु मिळेल तशा भिक्षेने संतुष्ट होतो, अशा संतुष्टीची स्तुति करतो, भिक्षेसाठी अयोग्य आचरण करीत नाही. भिक्षा न मिळाल्यास त्रस्त होत नाही, मिळाल्यास हावरा न होता, मत्त न होता, आसक्त न हो, अन्नात दोष जाणून केवळ मुक्तीसाठी अन्न सेवन करतो; आणि त्या आपल्या तशा प्रकारच्या संतुष्टीने आत्मस्तुति व परनिंदा करीत नाही. जो अशा संतोषात दक्ष, सावध, हुशार व स्मृतिमान होतो, भिक्षुहो, त्यालाच प्रश्नचीन अग्र आर्यवंशाला अनुसरून वागणारा भिक्षु म्हणतात.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु कशाही प्रकारच्या निवासस्थानाने संतुष्ट होतो, तशा प्रकारच्या संतुष्टीची स्तुति करतो, निवासस्थानासाठी अयोग्यआचरण करीत नाही, निवासस्थान न मिळाले तर त्रस्त होत नाही, मिळाले तर हावरा न होता, मत्त न होता, आसक्त न होता, निवासस्तानात दोष जाणुन केवळ मुक्तीसाठी ते वापरतो आणि त्या आपल्या तशा प्रकारच्या संतुष्टीने आत्मस्तुति व परनिंदा करीत नाही. जो अशा संतोषात दक्ष, सावध, हुशार व स्मृतिमान होतो, त्यालाच प्रश्नचीन अग्र आर्यवंशाला अनुसरून वागणारा भिक्षु म्हणतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel