उपनिषदृवि

काही ब्राह्मणांना अशा रीतीने उघडपणे श्रमणधर्म स्वीकारण्याचे धाडस नव्हते. ते वैदिक यज्ञयाग आणि श्रमणांचे तत्त्वज्ञान यांच्या दरम्यान हेलकावे खात असत. अश्वमेघावर वगैरे रुपके रचून त्यातूनच आत्मतत्त्व काढण्याचा प्रयत्न करीत. उदाहरणार्थ बृहदरण्यकोपनिषदाच्या पहिल्या अध्यायातील दुसर्‍या ब्राह्मणाच्या आरंभी आलेली कथा पाहा. तेथे ऋषि म्हणतो, “या जगात उत्पत्तीच्या पूर्वी काही एक नव्हते. मृत्यूने हे सर्व झाकले होते, ते का तर खाण्याच्या इच्छेने. कारण खाण्याच्या इच्छेलाच मृत्यु म्हणतात. त्याला आत्मवान व्हावे असे वाटले. मोठ्या यज्ञाने मी पुनरपि यजन करावे अशी तो मृत्यु कामना करता झाला. अशी कामना करून तो श्रांत झाला. तप करू लागला. त्या श्रांत व तपाने तप्त झालेल्या मृत्यूपासून यश व वीर्य उत्पन्न झाले. प्राण हे यश आणि हेच वीर्य आहे. याप्रमाणे ते प्राण शरीर सोडून निघून गेले असता ते प्रजापतीचे शरीर फुगले. तथापि त्याचे मन त्या शरीरात होते. माझे हे शरीर मेध्य (यत्रिय) व्हावे व त्यायोगाने मी आत्मवान (आत्मन्वी) व्हावे अशी तो कामना करता झाला. ज्याअर्थी ते शरीर माझ्या वियोगाने यश आणि वीर्य यांनी विरहित होत चालले, फुगले, त्याअर्थी तो अश्व (फुगलेला) झाला. आणि ज्याअर्थी ते मेध्य झाले त्याअर्थी तेच अश्वमेघाचे अश्वमेधत्व आहे. जो या अश्वाला याप्रमाणे जाणतो तोच अश्वमेघाला जाणतो.”

यात अश्वमेघाच्या मिषाने तपश्चर्याप्रधान अहिंसाधर्म सांगण्याचा प्रयत्न दिसतो. खाण्याची इच्छा हाच मृत्यू, तो आत्मवान झाला म्हणजे त्याला व्यक्तित्व आले आणि क्रमश: त्याला यज्ञाची इच्छा उद्भवली त्या इच्छेपासून यश आणि वीर्य हे दोन गुण निघाले ते खरे प्राण होत. ते जर निघून गेले, तर शरीर मरून फुगल्यासारखे (अश्वयित) समजावे. आणि ते जाळून टाकण्याला योग्य आहे. हे तत्त्व जो जाणतो तोच अश्वमेघ जाणतो.

छांदोग्य उपनिषदात प्रवहण जैवलि अरुणाच्या पुत्राला म्हणतो. “हे गौतमा, द्युलोक हाच अग्नि आहे. त्याची आजित्य हीच समिधा, किरण हा धूम दिवस ही ज्वाला, चंन्द्रमा हे निखारे, आणि नक्षत्रे किटाळे (विस्फुलिंग) आहेत. (छां. उ. ५य़४)

यावरून असे दिसून येईल की, या ब्राह्मण ऋषींच्या मनावर श्रमण संस्कृतीचा पूर्ण पगडा बसला होता. पण व्यवहारात ती तत्त्वे उघड उघड प्रतिपादणे त्यांना इष्ट वाटत नव्हते आणि म्हणूनच अशा रूपकात्मक भाषेचा ते प्रयोग करीत.

उपनिषदृपि देखील जातिभेद मानीत नव्हते


पूर्वीचे ऋषिमुनी श्रमण आणि उपनिषदृषि यांच्यामध्ये एका बाबतीत एकवाक्यता होती. ही बाब म्हटली म्हणजे जातिभेदाची होय. मातंग ऋषीची गोष्ट वर आलीच आहे. तिजवरून ऋषिमुनीत जातिभेद नव्हता हे स्पष्ट होते. श्रमणसंघात तर जातिभेदाला मुळीच थारा नव्हता आणि उपनिषदृषि देखील जातीला फारसे महत्त्व देत नसत हे खालील गोष्टीवरून दिसून येईल.

सत्यकाम आपली आई जबाला हिला म्हणाला, “आई, मी ब्रह्मचर्याचे आचरण करू इच्छितो (ब्रह्मज्ञान मिळविण्याची इच्छा करतो.) माझे गोत्र कोणते हे सांग.” ती त्याला म्हणाली, “बाळ, हे मला माहीत नाही. तरुणपणी मी पुष्कळांशी राहिले (बहृहं चरन्ती) आणि तू जन्मलास तेव्हा तुझे गौत्र मी जाणत नाही. माझे नाव जबाला आणि तुझे नाव सत्यकाम आहे. म्हणून तू सत्यकाम जाबाल आहेस असे सांग.”

तो (सत्यकाम) हारिद्रुमत गौतमाला म्हणाला, “आपणापाशी ब्रह्मज्ञान शिकण्याच्या उद्देशाने मी आलो आहे.”

गौतम म्हणाला, “तुझे गोत्र कोणते?”

सत्यकाम म्हणाला, “ते मला माहीत नाहीत. आईला मी विचारले. पण ती मला म्हणाली की, तारुण्यात पुष्कळ पुरुषांशी संबंध आल्यामुळे आपणाला गोत्र माहीत नाही. तेव्हा तू सत्यकाम जाबाल आहेस असे सांग.”

त्याला गौतम म्हणाला, “तू सत्यापासून च्यूत झाला नाहीस. अब्राह्मणाला हे शक्य नव्हे. म्हणून समिक्षा घेऊन ये. तुझे उपनयन करतो.” असे म्हणून या ऋषीने त्याचे उपनयन केले. (छां. उ. ४१४)

गुप्तांच्या कारकीर्दीपासून जातिभेद बळावला
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel