दृष्टमंगलिका जरी त्याच्याशी पत्नीच्या नात्याने वागण्यास तयार होती, तथापि त्याने तिला अशा रीतीने न वागवता अरण्यात जाऊन घोर तपश्चर्या आरंभिली. सात दिवसांनी मातंग परत आला आणि दृष्टमंगलिकेला म्हणाला, “तू जाहीर कर की, माझा पति मातंग नसून महाब्रह्मा आहे; व तो पौर्णिमेच्या दिवशी चन्द्रमंडळातून खाली उतरणार आहे.” त्याप्रमाणे दृष्टमंगलिकेने हे वर्तमान सर्वांना सांगितले. पौर्णिमेच्या दिवशी रात्री मोठा जनसमुदाय चांडालग्रामात तिच्या घरासमोर जमला. तेव्हा मातंग ऋषि चन्द्रमंडळातून खाली उतरला’ आणि आपल्या झोपडीत शिरून त्याने दृष्टमंगलिकेच्या नाभीला आपल्या अंगठ्याने स्पर्श केला.

तेथे जन्मलेल्या ब्रह्मभक्तांनी हा अदभुत चमत्कार पाहून दृष्टमंगलिलेला उचलून वाराणसी नगरीत नेले आणि नगरीच्या मध्यभागी एक मोठा मंडप उभारून तिची पूजा चालविली. लोक तिल नवस करू लागले. नऊ महिन्यांनंतर त्याच मंडपात तिला मुलगा झाला. मंडपात जन्मल्यामुळे त्याचे नाव मांडव्य ठेवण्यात आले. लोकांनी त्या मंडपाजवळच एक मोठा प्रासाद बांधला आणि या मातापुत्रांना त्या प्रासादात ठेवले. त्यांची पूजा चालू होती.

लहानपणापासून मांडव्यकुमाराला शिकविण्यासाठी मोठमोठाले वैदिक पंडित स्वच्छेने आले. तो तीनही वेदांत पारंगत झाला आणि ब्राह्मणांना पुष्कळ मदत करू लागला. एके दिवशी मातंग ऋषि त्याच्या दारात भिक्षेसाठी उभा राहिला असता मांडव्य त्याला म्हणाला, “चिंध्या पांघरून पिशाचासारखा येथे उभा राहणारा तू कोण आहेस?”

मातंग— तुझ्या घरी अन्नपान पुष्कळ आहे. यास्तव काही तरी खरकटे मला मिळेल, या हेतूने मी येथे उभा आहे.
मांडव्य— पण हे अन्न ब्राह्मणांसाठी आहे. तुझ्यासारख्या हलकटाला देण्यासाठी नाही.

दोघंचाही बराच संवाद झाल्यावर मांडव्याने मातंगाला आपल्या तीन द्वारपालांकडून धक्के मारून घालवून दिले. पण त्यामुळे त्याची बोबडी वळली. डोळे पांढरे फटफटीत झाले आणि  निश्चेष्टित होऊन पडला. त्याच्या बरोबरच्या ब्राह्मणांची देखील काही कमी प्रमाणात हीच स्थिति झाली. तोंडे वेडीवाकडी करून ते गडबडा लोळू लागले. हा प्रकार पाहून दृष्टमंगलिका घाबरून गेली. एका दरिद्री तपस्व्याच्या प्रभावाने आपल्या मुलाची व इतर ब्राह्मणांची ही स्थिति झाल्याचे जेव्हा तिला समजले, तेव्हा त्या तपस्व्याचा शोध करण्यासाठी ती निघाली. मातंग ऋषि एका ठिकाणी बसून भिक्षाटनात मिळालेली पेज खात होता.

दृष्टमंगलिकेने त्याला ओळखले आणि आपल्या मुलाला क्षमा करण्याची विनंती केली. आपल्या उष्टया पेजेचा काही भाग त्याने तिला दिला आणि सांगितले की, ही पेज मुलाच्या आणि इतर ब्राह्मणांच्या तोंडात घाल म्हणजे ते बरे होतील. त्याप्रमाणे दृष्टमंगलिकने केल्यावर ते सर्व ब्राह्मण पूर्वस्थितीवर आले. पण चांडाळाच्या उष्ट्याने ब्राह्मण बरे झाल्याचे वर्तमान सर्व वाराणसीत पसरले. तेव्हा लोकांना लाजून ते मेज्झ (मेध्य) राष्ट्रांत गेले. मांडव्य मात्र तेथेच राहिला.

मातंग ऋषि काही काळाने प्रवास करीत मेज्झ राष्ट्रात जाऊन पोहोचला. हे वर्तमान मांडव्याबरोबरच्या ब्राह्मणांना समजल्याबरोबर त्यांनी मेज्झराजाची अशी समजूत करून दिली की, हा नवीन आलेला भिकारी मायावी आहे आणि तो सर्व राष्ट्राचा नाश करील. हे ऐकल्याबरोबर राजाने आपले शिपाई मातंगाच्या शोधासाठी पाठवले. त्यांनी त्याला एका भिंतीजवळ बसून भिक्षेत मिळालेले अन्न खात असताना गाठले आणि तेथेच ठार केले. त्यामुळे देवता क्षोभल्या आणि त्यांनी ते राष्ट्र ओस पाडले.

मातंगाच्या हत्येमुळे मेज्झ राष्ट्र ओस पडल्याचा उल्लेख अनेक जातकात सापडतो. या दंतकथेत कितपत तथ्य आहे हे सांगता येत नाही. तथापि मातंग ऋषि चांडाळ होता व त्याची पूजा ब्राह्मण आणि क्षत्रिय देखील करीत होते. हे वसलसुत्तांतील खालील गाथांवरून स्पष्ट होते.

तदमिना पि जाना यथा मदं नदस्तनं।।

चण्डालपुत्तो सोपाकी मातंगी ति स्सुतो ।।१।।
सो यसं रमं पत्तो मातंगो यं सुदुल्लभं।
आगच्छुं तस्सुपट्ठानं खत्तिया ब्राह्मणा बहू ।।२।।
देवयानं अभिरुय्ह विरजं सो महापथं।
कामरागं विराजेत्वा बरह्मलोकूपगो अहू।
न न जाति नारेसि ब्रह्मलोकापपत्तिया ।।३।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel