गृहत्यागाचा प्रसंग

बोधिसत्त्वाने गृहत्याग केला त्या रात्री तो आपल्या प्रासादात बसला होता. त्याच्या परिवारातील स्त्रियांनी वाद्यगीतादिकांनी त्याला रंजविण्याचे पुष्कळ परिश्रम केले. पण बोधिसत्त्व त्यात रमला नाही. शेवटी त्या स्त्रिया कंटाळून झोपी गेल्या. कोणी बडबडत होत्या, तर कुणाच्या तोंडातून लाळ गळत होती. त्याला त्यांचा भयंकर कंटाळा आला, व खाली जाऊन त्याने छन्न सारथ्याला हाक मारून जागे केले. छन्नाने कंथक नावाच्या घोड्याला सज्ज करून आणले. त्यावर बोधिसत्त्व आरूढ झाला व छन्न घोड्याची शेपटी धरून बसला. देवतांनी त्या दोघांसाठी नगरद्वार खुले केले. त्यातून बाहेर पडून ते दोघेही अनोमा नावाच्या नदीतीरावर गेले. तेथे बोधिसत्त्वाने आपले केस आपल्या तलवारीने कापून टाकले. आणि दागदागिने छन्नाच्या स्वाधीन करून बोधिसत्त्व राजगृहाला गेला. बोधिसत्त्वाच्या वियोगामुळे कंथकाने अनोमा नदीवरच देहविसर्जन केले आणि छन्न सारथि दागदागिने घेऊन कपिलवस्तूला गेला, हा निदानकथेतील गोष्टीचा सारांश आहे. निदानकथेत, ललितविस्तरात आणि बुद्धचरित काव्यात या प्रसंगाची रसभरित वर्णने आढळतात आणि त्यांचा बौद्ध चित्रकलेवर चांगला परिणाम झाला आहे, परंतु त्यांच्यात तथ्य मुळीच नाही, किंवा फारच थोडे असावे, असे वाटते. का की, प्राचीनतर सुत्तातून ह्या असंभव्य दंतकथेला मुळीच आधार सापडत नाही.

अरियपरियेसनसुत्ता स्वत: भगवान बुद्धाने आपल्या गृहत्यागसमयाची हकीगत दिली आहे ती अशी :--
सो खो अहं भिक्खवे अपरेन समयेन दहरो व समानो सुसु काळकेसी भद्रेन योब्बनेन समन्नागतो पठमन वसया अकामकानं मातापितुन्न अस्सुमुखानं रुदन्तानं केसमस्सु ओहारेत्वा वासावानि वत्थनि अच्छादेत्वा अगारस्मा अनगारियं पब्बजि।

“भिक्षुहो, असा विचार करीत असता काही काळाने, जरी मी त्या वेळी तरुण होतो माझा कही केस पिकला नव्हता, मी भरज्वानीत होतो आणि माझे आईबाप मला परवानगी देत नव्हते, डोळ्यांतून निघाणार्‍या अश्रुप्रवाहाने त्यांची मुखे भिजली होती ते सारखे रडत होते. तरी मी (त्या सगळ्यांची पर्वा न करता) शिरोमुंडन करून काषाय वस्त्रांनी देह आच्छादून घरातून बाहेर पडलो. (मी संन्याशी झालो.)’

हाच उतारा जशाचा तशाच महासच्चकसुत्तात सापडतो. यावरून बोधिसत्त्व घरच्या माणसांना कळू न देता छन्नासह कंथकावर स्वार होऊन पळून गेला हे म्हणणे साफ चुकीचे आहे, असे दिसते. बोधिसत्त्वाची खुद्द आई मायादेवी सातव्या दिवशी जरी निवर्तली असली तरी त्याचे पालन महाप्रजापती गोमतीने स्वत:च्या मुलाप्रमाणेच केले. अर्थात वरील उतार्‍यात तिला बुद्ध भगवंताने आई म्हटले असले पाहिजे. शुद्धोदनार्‍या व गोमतीला तो परिव्राजक होणार हे पुष्कळ दिवसांपासून माहीत होते. आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध व त्याच्या समक्षच त्याने प्रव्रज्या घेतली हे या उतार्‍यावरून स्पष्ट होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel