श्रमण पंथाचा वेदविरोध

अजितकेसकंबल नास्तिकमतप्रवर्तक असल्यामुळे यज्ञयागावरच नव्हे तर वेदांवर देखील टीका करीत असावा असे सर्वदर्शनातील चार्वाक मताच्या वर्णनवरून अनुमान करता येते. चार्वाकमतप्रदर्शक जे काही श्लोक सर्वदर्शनात आहेत त्यापैकी हा दीड श्लोक आहे –

पशुश्चेन्निहत: स्वर्ग ज्योतिष्टोमे गमिष्यति।
स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिस्यते।।
त्रयो वेस्य कर्तारो भण्डदूर्थनिशाचरा:


‘अग्निष्टोम यज्ञात मारलेला पशू जर स्वर्गाला जातो, तर त्या यज्ञात यजमान आपल्या पित्याच्या वध का करीत नाही? ...वेदांचे कर्ते भण्ड, धूर्त, राक्षस हे तिघे आहेत.’

यावरून असे दिसून येते की, बहुतेक श्रमण संप्रदाय कमीजास्ती प्रमाणाने वेदाचा स्पष्ट निषेध करीत असत आणि त्यांना वेदनिंदक म्हणण्यास हरकत नव्हती, परंतु बुद्धाने वेदाची निंदा केल्याचा दाखला कोठेच आढळत नाही. याच्या उलट वेदाभ्यासाचा जिकडे तिकडे गौरव सापडतो. बुद्धाच्या भिक्षुसंघात महाकात्यावनासारखे वेदपारंगत ब्राह्मण होते. तेव्हा बुद्ध भगवान वेदनिंदा करी, हे संभवतच नाही. पण यज्ञयागात होणारी गाईबैलांची आणि इतर प्राण्यांची हिंसा त्याला इतर श्रमणाप्रमाणेच पसंत नव्हती.

यज्ञांचा निषेध

कोमलसंयुत्ता यज्ञयागांचा निषेध करणारे सुत्त आहे ते असे— “बुद्ध भगवान श्रावस्ती येथे राहत होता. त्या वेळी पसेनदि कोसल राजाच्या महायज्ञाला सुरुवात झाली. त्यात पाचशे बैल, पाचशे मोहरे, पाचशे कालवडी, पाचशे बकरे व पाचशे मेंढे बलिदासाठी यूपाना बांधले होते. राजाचे दास, दूत व कामगार दंडाच्या भयाने भयभयीत होऊन आसवे गाळीत, रडत रडत यज्ञाची कामे करीत होते.

“ते सर्व भिक्षूंनी पाहून भगवंताला सांगितले. तेव्हा भगवान म्हणाला,
अस्समेघ पुरिसमेध सम्मापासं वाजपेयं।
निरग्गळं महारम्भा न ते होन्ति महप्फला।।
अजेळका च गावो च विविधा यत्थ हञ्ञरे।
न तं सम्मग्गता यञ्ञं उपयन्ति महेसिनो।।
ये च यञ्ञा निरारम्भा यजन्ति अनुकूलं सदा।
अजेळका च गावो च विविधा नेत्थ हञ्ञरे।।
एतं सम्मग्गता यञ्ञं उपयन्ति महेसिनो।
एतं यजेथ मेधावी एको यञ्ञो मगप्फलो।
एतं हि यजमानस्य सेययो होति न पापयो।
यञ्ञो च विपुलो हि पसीदन्ति च देवता।

‘अश्वमेघ, पुरुषमेघ, सम्यक्पाश, वाजपेय आणि निरर्गल हे यज्ञ मोठ्या खर्चाचे आहेत. पण ते महाफलदायक होत नाहीत. बकरे, मेंढे आणि गाई असे विचित्र प्राणी ज्यात मारले जातात. त्या यज्ञाला सद्वर्तनी महर्षि जात नाहीत. परंतु ज्या यज्ञात प्राण्यांची हिंसा होत नाही, जे लोकांना आवडतात, आणि बकरे, मेंढे, गाई वगैरे विविध प्राणी ज्यात मारले जात नाहीत, अशा यज्ञात सद्वर्तनी महर्षि उपस्थित होतात म्हणून सूज्ञ पुरुषाने असा यज्ञ करावा. हा यज्ञ महाफलदायक आहे. कारण या यज्ञाच्या यजमानाचे कल्याण होते, अकल्याण होत नाही. आणि तो यज्ञ वृद्धि पावतो, व देवता प्रसन्न होतात.”

यज्ञात पाप का?

यज्ञात प्राणिवध केल्याने कायावाचामने यजमान अकुशल कर्माचे चरण करतो, म्हणून यज्ञ अमंगळ आहे, असे बुद्धाचे म्हणणे होते. यासंबंधी अंगुत्तर निकायाच्या सत्तकनिपतात एक सुत्त सापडते. त्याचे रूपांतर येणेप्रमाणे –
एके समयी भगवान श्रावस्ती येथे जेतवनात अनाथपिंडिकाच्या आरामात राहत होता. त्या वेळी उदगतशरीर (उग्गतसरीर) ब्राह्मणाने महायज्ञाची तयारी चालविली होती. पाचशे बैल, पाचशे गोहरे, पाचशे कालवडी, पाचशे बकरे आणि पाचशे मेंढे यज्ञात बलि देयाकरिता यूपांना बांधले होते. तेव्हा उदगतशरीर ब्राह्मण भगवंतापाशी येऊन भगवंताला कुशल प्रश्नादिक विचारून एका बाजूला बसला, आणि म्हणाला, “मी गोतम यज्ञासाठी अग्नि पेटविणे आणि यूप उभारणे महत्फलदयक होते, असे मी ऐकले हे.”

भगवान म्हणाला, “हे ब्राह्मणा यज्ञासाठी अग्नि पेटविणे आणि यूप उभारणे महात्फदायक होते असे मीही पण ऐकले आहे.”

हेच वाक्य ब्राह्मणाने आणखी दोनदा उच्चारले, आणि भगवंताने त्याला तेच उत्तर दिले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, “तर मग आपणा दोघांचे सर्वथैव जुळते.”

त्यावर आनंद म्हणाला, “हे ब्राह्मणा, हा तुझा प्रश्न बरोबर नाही. ‘असे ऐकले आहे.’ असे न म्हणता तू असे म्हण, ‘यज्ञासाठी मी अग्नि पेटविण्याच्या व यूप उभारण्याच्या प्रयत्नात आहे. यासंबंधी भगवंताने मला असा उपदेश करावा की, ज्यामुळे माझे चिरकाल कल्याण होईल.”

आनंदाच्या म्हणण्याप्रमाणे ब्राह्मणाने भगवंताला प्रश्न केला. तेव्हा भगवान म्हणाला, “जो यज्ञासाठी अग्नि पेटवितो व यूप उभारतो, तो दु:खोत्पादक तीन अकुशल शस्त्रे उगारतो. ती कोणती तर कायशस्त्र, वाचाशस्त्र आणि चित्तशस्त्र, जो यज्ञाला सुरवात करतो, त्याच्या मनात इतके बैल, इतके गोहरे, इतक्या कलवडी, इतके बकरे, इतके मेंढे मारण्यात यावे, असा अकुशल विचार उद्भवतो. याप्रमाणे तो सर्वात प्रथम दु:खोत्पादक अकुशल चित्तशस्त्र उगारतो. नतंर हे प्राणी मारण्याला तो आपल्या तोंडाने आज्ञा देतो, आणि त्या योगे दु:खोत्पादक अकुशल वाचाशास्त्र उगारतो. तदनंतर त्या प्राण्यांना मारावे म्हणून प्रथम आपणच त्या त्या प्राण्यास मारण्यास आरंभ करतो आणि त्या योगे दु:खोत्पादक कुशल कायशस्त्र उगरतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel