भद्दियाच्या कथेवरून निघणारा निष्कर्ष

बुद्ध भगवंताची कीर्ति ऐकून पुष्कळ शाक्य कुमार भिक्षु होऊ लागले, आणि तोपर्यंत शाक्यांच्या गादीवर भद्दिय राजा होता. मग शुद्धोदन राजा झाला कधी? शाक्यांच्या राजाला सगळे शाक्य एकत्रित होऊन निवडीत असत. किंवा त्याची नेमणूक कोसल महाराजाकडून होत असे, हे सांगता येत नाही. शाक्यांनी जर याची निवड केली म्हणावी, तर त्यांना त्याच्यापेक्षा वडील महानाम शाक्यासारखा एखादा शाक्य सहज निवडता आला असता. याशिवाय अंगुत्तरनिकायाच्या पहिल्या निपातात, उच्च कुलात जन्मलेल्या माझ्या भिक्षुश्रावकात कालिगोधरेचा पुत्र भद्दिय श्रेष्ठ आहे असे बुद्धवचन सापडते. केवळ उच्च कुलात जन्मल्याने शाक्यासारखे गणराजे भद्दियाला आपला राजा करतील हे संभवनीय दिसत नाही. कोसल देशाच्या पसेनदि राजाकडूनच त्याची नेमणूक झाली असावी, हे विशेष ग्राह्य दिसते. काही झाले तरी शुद्धोदन कधीही शाक्यांचा राजा झाला नाही असे म्हणावे लागते.

शक्यांचा मुख्य धंदा शेती

त्रिपिटक वाङमयात मिळणार्‍या माहितीची अशोकाच्या लुम्बिनीदेवी येथील शिलालेखाच्या आधारे छाननी केली असता असे दिसून येते की, शुद्धोदन शाक्यांपैकी एक असून लुम्बिनी गावात राहत होता. आणि तेथेच बोधिसत्त्व जन्मला, वर दिलेल्या महानामाच्या आणि अनुरुद्धाच्या संवादावरून सिद्ध होते की, शाक्यांचा मुख्य धंदा शेतीचा होता. महानामासारखे शाक्य असे स्वत: शेती करीत, तसाच शुद्धोदन शाक्यही करीत होता. जातकाच्या निदानकथेत शुद्धोदनाला महाराजा बनवून त्याच्या शेतीचे वर्णन केले आहे, ते येणेप्रमाणे –

“एके दिवशी राजाच्या राणीचा समारंभ (वप्पमंगलं) होता. त्या दिवशी सगळे शहर देवाच्या विमानाप्रमाणे शृंगारीत असत. सर्व दास आणि कामगार नवीन वस्त्र नेसून आणि गंध्रमालदिकांनी भूषित होऊन राजवाड्यात एकत्र होत. राजाच्या शेतीवर एक हजार नागरांचा उपयोग होत असे त्या दिवशी सातशे नव्याण्णव नागरांच्या दोर्‍या, बैल आणि बैलांची वेसणे रुप्याने मढविलेली असत, आणि राजाचा नांगर वगैरे शंभर नंबरी सोन्याने मढविलेली असत. राजा सोन्याने मढविलेला नांगर धरी, आणि रुप्याने मढविलेले सतशे नव्याण्णव नांगर अमात्य धरीत बाकीचे (२००) इतर लोक घेत व सर्व जण मिळून शेत नांगरीत. राजा सरळ इकडे तिकडे नांगर फिरवीत असे.”

या कथेत पराचा कावळा झाला असला तरी एवढे तथ्य आहे की, शुद्धोदन स्वत: शेती करीत होता. आजकाल महाराष्ट्रात आणि गुजराथेत जसे वतनदार पाटील स्वत: शेती करतात आणि मजरांकडूनही करून घेतात. त्यांच्यासारखेच शाक्य होते. फरक एवढाच की, आजकालच्या पाटलांना राजकीय अधिकार फार थोडे आहेत आणि शाक्यांना ते बरेच होते. आपल्या जमिनीतील कुळांचा आणि मजुरांचा न्याय ते स्वत: करीत व आपल्या देशाची अंतर्गत व्यवस्था संस्थागारात एकत्र जमून पाहत असत. परस्परांमध्ये काही तंटा बखेडा उपस्थित झाला, तर त्याचा निकाल ते स्वत:च देत. मात्र कोणाला हद्दपार करावयाचे असले किंवा फाशी द्यावयाचे असले तर त्यासाठी त्यांना कोसल राजाची परवानगी घ्यावी लागत असे, असे चुळसच्चकसुत्तातील खालील संवादावरून दिसून येईल –

“भगवान म्हणतो, हे अग्निवेसन, पसेनदि कोसलासारख्या किंवा मगधांच्या अजातशत्रूसारख्या मूर्धावसिक्त राजाला आपल्या प्रज्ञेपैकी एकाद्या अपराध्याला देहांताशिक्षा देण्याचा, दंड करण्याचा किंवा हद्दपार करण्याचा पूर्ण अधिकार आहे की नाही?”

“सच्चक, भो गोतम, वज्जी आणि मल्ल या गणराजांना देखील आपल्या राज्यातील अपराध्याला फाशी देण्याचा, दंड करण्याचा किंवा हद्दपार करण्याचा अधिकार आहे, तर मग पसेनदि कोसल राजाला किंवा अजातशत्रूला हा अधिकार आहे हे सांगावयास नको.”

या संवादावरून जाणता येईल की, गणराज्यांपैकी वज्जीचे आणि मल्लांचे तेवढे पूर्ण स्वातंत्र्य कायम होते, आणि शाक्य, कोलिय, काशी, अंग इत्यादि गणराजांना अपराध्याला देहान्त शासन देण्याचा तसाच मोठा दंड करण्याचा किंवा हद्दपार करण्याचा अधिकार राहिला नव्हता. त्यासाठी शाक्य, कोलिय व काशी या गणराजांना कोसल राजाची व अंग गणराजांना मगधराजाची परवानगी घ्यावी लागत असे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel