उद्दक रामपुत्ताची भेट

आळार कालाम आणि उद्दक रामपुत्त हे दोघेही एकच समाधिमार्ग शिकवीत होते. त्यांच्यात एवढाच फरक होता की, आळार कालाम समाधीच्या सात पायर्‍या व उद्दक रामपुत्त आठ पायर्‍या शिकवीत असे. या दोघांचा कोणी तरी एकच गुरू असावा आणि नंतर त्यांनी हे दोन पंथ काढले असावेत. आळार कालामाला सोडून बोधिसत्त्व उद्दकापाशी गेला. पण त्याच्याही मार्गात त्याला विशेष तथ्य दिसले नाही. तेव्हा राजगृहाला जाऊन तेथील प्रसिद्ध श्रमणपंथांचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याचा त्याने निश्चय केला.

बिंबासार राजाची भेट

राजगृहात बोधिसत्त्वाच्या आगमनाचे वर्णन एका अज्ञात कवीने सुत्तनिपातातील पब्बज्जासुत्तात केले आहे, त्याचे भाषान्तर येणेप्रमाणे –
१. चक्षुष्मन्ताने (बोधिसत्त्वाने) प्रव्रज्या का घेतली व कोणत्या विचारामुळे त्याला ती आवडली हे सांगून (त्याच्या) प्रव्रज्येने मी वर्णन करतो.
२. गृहस्थाश्रम ही अडचणींची आणि कचर्‍याची जागा व प्रव्रज्या म्हणजे मोकळी हवा असे जाणून त्याने प्रव्रज्या घेतली.
३. प्रव्रज्या घेऊन त्याने शारीरिक पापकर्म वर्ज्य केले. वाचसिक दुर्वर्तन सोडून दिले आणि आपली उपजिवीका शुद्ध मार्गाने चालविली.
४. बुद्ध मगधांच्या गिरिव्रजाला (राजगृहाला) आला. सर्व शरीरावर उत्तम लक्षणे फैलावली आहेत अशा त्याने राजगृहात भिक्षाटनासाठी प्रवेश केला.
५. आपल्या प्रासादावरून बिंबिसाराने त्याला पाहिले. त्याची लक्षणसंपत्ति पाहून बिंबासार म्हणाला,
६. “अहो, मझे ऐका- हा सुंदर भव्य, शुद्ध आणि आचरणाने संपन्न असून पायापाशी दोन हाताच्या अंतरावर दृष्टि ठेवून चालतो. (युगमत्तं च पेक्खति).
७. हा दृष्टि पायापाशी ठेवून चालणारा जागृत भिक्षु नीच कुळातला वाटत नाही. तो कोठे जात आहे, हे राजदूतांना धावत जाऊन पाहू द्या.
८. तो भिक्षु (बोधिसत्त्व) कोठे जातो व वस्तीला कोठे राहतो हे पाहण्यासाठी ते (बिंबिसार राजाने पाठविलेले) दूत त्याच्या मागोमाग गेले.
९. इन्द्रिय़ाचे संरक्षण करीत घरोघरी भिक्षा घेऊन विवेकी आणि जागृत बोधिसत्त्वाने ताबडतोब पात्रभर भिक्षा मिळविली.
१०. भिक्षाटन पुरे करून तो मुनि नगरातून बाहेर पडला आणि वस्तीला येथे राहीन अशा उद्देशाने पाण्डव पर्वताजवळ आला.
११. त्याला वस्तीला राहिलेला पाहून ते दूत त्याच्याजवळ बसले आणि त्यापैकी एकाने जाऊन राजाला खबर दिली.
१२. “महाराज, तो भिक्षू पाण्डव पर्वताच्या पूर्वेला व्याघ्यासारखा, ऋषभसारखा किंवा गिरिगव्हरात राहणार्‍या सिंहासारखा बसला आहे.”
१३. ते दूताचे वचन ऐकून तो क्षत्रिय (राजा) उत्तम यानात बसला व त्वरेने पाण्डव पर्वताकडे जाण्यास निघाला.
१४. जिथपर्यंत यानाने जाणे शक्य होते तिथपर्यंत जाऊन तो क्षत्रिय यानातून खाली उतरला आणि पायीच (बोधिसत्त्वाच्या) जवळ येऊन त्याच्या संनिध बसला.
१५. तेथे बसून राजाने त्याला कुशलप्रश्नादिक विचारले. कुशलप्रश्नादिक विचारून ती येणेप्रमाणे बोलला :--
१६. “तू जवान आणि तरुण आहेस, मनुष्याच्या प्रथम वयातला आहेस. तुझी कान्ति कुलीन क्षत्रियासारखी अत्यंत रोचक दिसते.
१७. “तू हत्तीचा समुदाय बरोबर घेऊन माझ्या सेनेला शोभा आण. मी तुला संपत्ति देतो. तिचा उपयोग घे. आणि आता तुझी जाति कोणती हे मला सांग.”
१८. हे राजा येथून सरळ हिमालयाच्या पायथ्याशी धनाने आणि वीर्याने संपन्न ज्याचा कोसल राष्ट्रात समावेश होतो—असा देश आहे.
१९. “त्याचे (तेथल्या महाजनाचे) गोत्र आदित्य आहे आणि त्यांच्या जातीला शाक्य म्हणतात, त्या कुलातून हे राजा मी परिव्राजक झालो, तो कोमपभोगांच्या इच्छेने नव्हे.
२०. “नामोपभोगात मला दोष दिसला आणि एकान्तवास सुखाचा वाटला. आता मी तपश्चर्येसाठी जात आहे. त्या मार्गात माझे मन रमते.”

या सुत्ताच्या तिसर्‍या गाथेत बोधिसत्त्वाने काया, वाचा व उपजीविका याचे संशोधन केल्याचा उल्लेख आला आहे. हे कृत्य घरातून निघाल्यानंतर वाटेतल्या वाटेत त्याला करता येणे शक्य दिसत नाही. आळार कालाम व उद्दक रामपुत्त यांच्यापाशी राहून त्यांचे आचारविचार नीट सांभाळून बोधिसत्त्वाने हे काम केले असावे असे दिसते. पण एवढ्यानेच त्याचे समाधान न होता प्रसिद्ध श्रमणनयकाचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याच्या उद्देशाने तो राजगृहाला आला. तेथे त्या सर्व संप्रदायांमध्ये कमीजास्त प्रमाणाने तपश्चर्या आढळून आल्यामुळे आपणही अशीच तपश्चर्या केली पाहिजे, असे त्याला वाटले. आणि म्हणूनच त्या सुत्ताच्या शेवटल्या गाथेत, ‘आता मी तपश्चर्येसाठी जात आहे,’ असे तो म्हणतो. कामोपभोगातून त्याचे मन पूर्वीच निघाले असल्यामुळे मगधराजाने देऊ केलेला अधिकार त्याला आवडला नाही हे सांगावयालाच नको.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel