धर्मचक्रवप्रवर्तन

असे मी ऐकले आहे. एके समयी भगवान वाराणसी येथे ऋषिपत्तनात मृगवनात राहत होता. तेथे भगवान पंचवर्गीय भिक्षूंना उद्देशून म्हणाला, “भिक्षु हो, धार्मिक मनुष्याने (पब्बजितेन) या दोन अन्तांना जाऊ नये. ते दोन अन्त कोणते? पहिला कामोपभोगात सुख मानणे. हा अन्त हीन, ग्राम्य, सामान्यजनसेवित, अनार्य आणि अनर्थावह आहे. दुसरा देहदंडन करणे, हा अन्त दु:खकारक, अनर्थ आणि अनर्थावह आहे. या दोन अन्तांना न जाता तथागताने ज्ञानचक्षु उत्पन्न करणारा, उपशमाला, प्रज्ञेला, संबोधाला आणि निर्वाणाला कारणीभूत होणारा मध्यम मार्ग शोधून काढला आहे. तो कोणता? सम्यक् दृष्टि, सम्यक् संकल्प, सम्यक् वाचा, सम्यक् कर्मान्त, सम्यक् जीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति, सम्यक् समाधि हा तो आर्य अष्टांगिक मार्ग होय.

“भिक्षु हो, दु:ख नावाचे पहिले आर्यसत्य असे आहे. जन्म दु:खकारक आहे. जरा दु:खकारक आहे. व्याधि दु:खकारक आहे. मरण दु:खकारक आहे. अप्रियाचा समागम आणि प्रियाचा वियोग दु:खकारक आहे. इच्छिलेली वस्तू मिळत नसली म्हणजे तेणेकरूनही दु:ख होते. संक्षेपाने पाच उपादनस्कन्ध दु:खकारक आहेत.* “भिक्षुहो, पुन: पुन: उत्पन्न होणारी आणि अनेक विषयात रमणारी तृष्णा-जिला कामतृष्णा, भवतृष्णा आणि विनाशतृष्णा म्हणतात- ती दु:खसमुदय नावाचे दुसरे आर्यसत्य होय.

"त्या तृष्णेचा बैराग्याने पूर्ण निरोध करणे, याग करणे, तिच्यपासून मुक्ति मिळविणे हे दु:खनिरोध नावाचे तिसरे आर्यसत्य होय. “आणि (वर सांगितलेला) आर्य अष्टांगिक मार्ग हे दु:खनिरोधगामिनी प्रतिपदा नावाचे चौथे आर्यसत्य होय.
“(क) हे दु:ख आहे असे समजले तेव्हा मला अभिनव दृष्टि उत्पन्न झाली व ज्ञान उत्पन्न झाले. विद्या उद्भवली, आणि आलोक उत्पन्न झाला. हे दु:ख जाणण्याला योग्य आहे असे समजले तेव्हा मला अभिनव दृष्टि (इत्यादि)... हे दु:ख मी जाणले, तेव्हा मला (इत्यादि)....
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*स्कन्ध पाच आहेत. ते वासनामय असले म्हणजे त्यांना उपादानस्कन्ध म्हणतात. ‘बुद्ध, धर्म आणि संघ’ पृ. ९०-९१ पाहा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
“(ख) हे दु:खसमुदय आर्यसत्य आहे असे मी जाणले, ते त्याज्य आहे असे मी जाणले, त्याचा त्याग केला असे मी जाणले, तेव्हा मला अभिनव दृष्टि उत्पन्न झाली (इत्यादी पूर्वोक्त)....
“(ग) हे दु:खनिरोध आर्यसत्य आहे असे मी जाणले, त्याचा साक्षात्कार करणे योग्य आहे असे मी जाणले, त्याचा साक्षात्कार मला झाला असे मी जाणले, तेव्हा मला अभिनव दृष्टि (इत्यादि पूर्वोक्त).....
“(घ) हे दु:खनिरोधगामिनी प्रतिपदा नावाचे आर्यसत्य आहे असे मी जाणले, त्याचा अभ्यास करणे योग्य आहे असे मी जाणले, त्याचा अभ्यास केला असे मी जाणले, तेव्हा मला अभिनव दृष्टि उत्पन्न झाली, ज्ञान उत्पन्न झाले, विद्या उद्भवली आणि आलोक उत्पन्न झाला. जोपर्यंत प्रत्येकी तीन व एकंदरीत बारा प्रकारचे या चार आर्यसत्यांविषयी ज्ञान मला झाले नाही तोपर्यंत मला पूर्ण सबोधि लाभली नाही.”

बुद्धाने केलेले अनेक उपदेश सुत्तपटिकात संग्रहित केले आहेत. पण त्याच्या धर्माचा आधारभूत असा कोणता उपदेश असेल तर तो हा आहे. एका सच्चसंयुत्तात या चार आर्यसत्यासंबंधाने एकंदर 131 सुत्ते आहेत. याशिवाय इतर निकायात याचा उल्लेख वारंवार येत असतो बुद्धाचे इतर सर्व उपदेश या चार आर्यसत्यांना अनुसरून असल्यामुळे यांचे महत्त्व फार मोठे आहे.

वरील रूपान्तरात (क) पासून (घ) पर्यंत आलेला मजकूर फक्त सच्चसंयुत्ताच्या एका सुत्तात व महावग्गात सापडतो. त्याचा उल्लेख इतर ठिकाणी नाही. यावरून तो मागाहून दाखल केला असावा, अशी बळकट शंका येते. तथापि चार आर्यसत्याच्या स्पष्टीकरणाला त्याची मदत होण्यासारखी असल्यामुळे तो येथे देण्यात आला आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel