'That you should have got the European members of the committee to join in all your criticisms and proposals, except one, is a remarkable triumph for us all and everybody must recognise that it has been achieved mainly owing to your great tact and influence and your powerful personality.  It is felt here that if the Bombay Senate adopt their report -as most probably will now be the case- the opposition to the commission's recommendations will be enormously strengthened.  They have no hope here of getting their own Senate to condemn the report as ours has done or rather will shortly do and the difference in calibre and political grit between their leaders and ours is therefore at present being freely recognised here.  You know how emotional these people are and how easily swayed.' या पत्रात गोखल्यांनी त्या वेळच्या बंगालच्या राजकीय पुढा-यांच्या मध्ये व आपल्याकडील पुढा-यांच्या मध्ये असणारा फरक दाखविला आहे आणि बंगाली लोकांच्या भावनाप्रधान स्वभावाचे जाता जाता दिग्दर्शन केले आहे.

परंतु अखेर सर्व विरोधास धाब्यात बसवून- युनिव्हर्सिटी सुधारणा करण्यासाठी कमिटी नेमण्याचे बिल २ नोव्हेंबर १९०३ मध्ये मांडण्यात आले. थॉमस रॅले साहेबांनी 'कोणत्याही संस्थेस असे वाटत नसते की, आपणामध्ये दोष आहेत आणि ते सुधारले पाहिजेत,' ('No corporate body cares to admit that its constitution needs improvement.') असे सांगितले. सरकार शिक्षणाची खच्ची करीत आहे अशी ओरड करणा-यांवर कर्झनसाहेबांनी तोंडसुख घेतले. सरकारच्या मनात लवमात्र पापबुध्दी नाही; तुमच्या कल्याणाचे मार्गच ते आखीत आहे असे त्यांनी सांगितले. गोपाळरावांनी डिसेंबरच्या बैठकीत या बिलास कसून विरोध केला. मुंबईस मेथांचे जोरदार भाषण झाले, परंतु अरण्यदनाला कोण विचारतो? इंग्लिशमन पत्राने सुध्दा अशी कबुली दिली की 'One of the main objects of the proposed reforms was that the direction of University education should thenceforward be under the domination of the Government through such a new constitution as may be established by legislation.' शेवटी १९०४ मध्ये कायदेशीरपणे युनिव्हर्सिट्यांवर नवीन कायदे लादण्यात आले. युनिव्हर्सिटी  सरकारची हस्तक बनली. युनिव्हर्सिटीच्या सीनेटमध्ये आपणांस कोण दिसणार- तर चॅन्सलर, सरकारनियुक्त सभासद, हायकोर्टाचे न्यायाधीश, बिशप, एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलाचे सभासद, शाळा खात्याचे प्रांतिक अधिकारी व सरकारी आणि मिशनरी विद्यापीठातील आचार्य. लोकांच्या प्रतिनिधीचे नावही नको!

१९०४ च्या जुलै महिन्यात गोखले काँग्रेसचे जॉइंट सेक्रेटरी असल्यामुळे मद्रासच्या बाजूस गेले. मद्रासला त्यांचे जंगी जाहीर स्वागत करण्यात आले. मुंबईच्या प्रांतिक कौन्सिलात दुष्काळग्रस्त लोकांची त्यांनी सांगितलेले कष्टप्रद कथा, म्युनिसिपल कायद्यासंबंधी त्यांनी केलेले विवेचन, वरिष्ठ कायदेकौन्सिलात सरकारी गुपितांचा कायदा, व युनिव्हर्सिटीसंबंधी कायदा यांच्यावर निर्भीडपणे टीका करून जी लोकपक्षाची सेवा त्यांनी केली होती ती, या सर्व गोष्टी लोकांच्या मनांत ताज्या होत्या. आपल्या हक्कांचे समर्थन करणारा, सरकारच्या कृष्णकारस्थानातील विष आविष्कृत करणारा हा पुढारी जेव्हा मद्रासी लोकांनी पाहिला तेव्हा त्यास आनंदाचे भरते आले. निरनिराळ्या वर्तमानपत्रकर्त्यांनी त्यांचे त्रोटक चरित्र दिले. त्यांच्या स्वार्थत्यागाचा, विद्वत्तेचा, वगैरे गौरव केला गेला. अ‍ॅग्लो इंडियन वर्तमानपत्रेही मागे नव्हती. मद्रास टाइम्सने लिहिले, 'It is no easy task to stand Ranade's cross examination. Gokhale's contact with Ranade gave him an opportunioty to imbibe in a large degree his master's prodigious industry, great breadth of vision, a true sobriety of judgement, a calm sweetness and reasonableness, a temper singularly free from prejudice and personal bias and a sincerity of conviction which those alone who knew him most could realise best.' त्यांच्या अंदाजपत्रकांवरील भाषणांनी तर नवीनच क्रांती घडवून आणली होती. विचारवंत लोकांत त्यांची फार स्तुती झाली. विद्यार्थ्यांनी त्यांस मानपत्रे दिली. निरलसता व निरपेक्षता ज्याच्या ठिकाणी एकवटली आहेत, त्याचे कोण कौतुक करणार नाही? त्याचे गोडवे कोण गाणार नाही? सार्वजनिक संस्थांनी त्यांचा सत्कार केला. गोखल्यांच्या बि-हाडी भेटीस व मुलाखतीस येणा-या गृहस्थांची मारे गर्दी असे. मित्रांनी त्यांस मेजवान्या दिल्या.  अशा रीतीने मुलाखती, संभाषणे यात काळ चालला असता मैलापुरास त्यांस एका पवित्र कार्यासाठी आमंत्रण देण्यात आले. तेथे रानडे यांच्या स्मारकासाठी बांधण्यात येणा-या इमारतीच्या पायाचा दगड बसवावयाचा होता. रानड्यांबद्दलचा गोखल्यांच्या मनात असणारा भक्तीचा जिव्हाळा जे जे गृहस्थ पाहात त्यांस गोखल्यांच्या मनाची आध्यात्मिक ठेवण पाहून मोठे समाधान होईल. कृतज्ञतापूर्ण अंत:करणाने गोखले मैलापुरास गेले. तेथील त्यांचे भाषण फार रसाळ आणि प्रेमळ असे झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel