कौन्सिलातील कामगिरीनंतर त्यांनी बजाविलेल्या इंग्लंडातील कामगिरीचा विचार करावयाचा. १९०५ साली त्यांनी जी चाळीस पन्नास व्याख्याने इंग्लंडात दिली त्या वेळेस हिंदुस्तानच्या हलाखीचे, दारिद्रयाचे, अज्ञानाचे, दडपेगिरीचे त्यांनी असे यथार्थ चित्र रेखाटले की ते चित्र पाहून इंग्लिश लोक चकित झाले. शंभर वर्षे राज्यकारभार केला आणि शेकडा एकही मनुष्य अद्याप लिहू वाचू शकत नाही हे आठवे आश्चर्य नव्हे तर काय?

मोर्लेमिंटो सुधारणांसाठी त्यांनी किती धडपड केली ते मागे आलेच आहे. नाना मुत्सद्दयांच्या मुलाखती घ्याव्या; त्यांच्याशी विचारविनिमय करावा; आणि आपले विचार त्यांस समजावून सांगावे. परंतु या वेळेस गोखल्यांच्या भोळेपणाची एक गोष्ट मोर्ले साहेबांच्या 'आठवणी'वरून दिसून येते ती सांगतो. मोर्ले साहेबांस माहीत होते की, गोखल्यांचे 'रॅडिकल' लोकांवर वजन आहे. ते मिंटोस लिहितात की, 'The British Radical now prominent in the House of Commons does not mean mischief and I think Gokhale does not mean to lead him that way, if the said Gokhale is rightly handled.' मोर्ले साहेबांनी गोखल्यांस आपल्या हातात घेतले. जर हिंदुस्तानात बंडाळी माजेल तर तुम्हांस काही एक मिळणार नाही अशी मोर्ले यांनी गोखल्यांस धमकी दिली. गोखले चपापले व त्यांनी आपल्या मित्रांस हिंदुस्तानात शांतता राखा असे लिहिले. वास्तविक या अशांततेमुळेच सुधारणा मिळत होत्या. अशांतता वाढेल तरच जास्त लवकर अधिकार-हक्क मिळतात. अशा वेळी गोखले सरळपणा दाखवीत. आणि या सरळपणाचा, मुत्सद्दी मात्र फायदा घेत. दक्षिण आफ्रिकेत असेच झाले. पोकळ वचनावर गोखल्यांनी विश्वास ठेवला आणि बोथा साहेबांनी चकविले. 'The dictum of the Roman poet that prudence is an ever- present and all-potent divinity ought assuredly to be kept in mind, by the patriotic Indian who aspires to lay the foundations of an empire-state.' असा मोठा पोक्तपणाचा सल्ला होल्डरनेस साहेबांनी दिला. या वेळी पॅरट साहेबांनी काव्हूरवर लिहितात जे लिहिले आहे त्याची आम्हांस आठवण होते. तो म्हणतो:- 'There are, it has been well said, two qualities essential to a statesman, the one is prudence- the other imprudence. Cavour possessed the two qualities in combination in an exceptional degree. He knew that in the affairs of states, as in the affairs of individuals, there comes a time when rashness is the height of prudence.' गोखले दक्षिण आफ्रिकेत जे गेले होते ते परराष्ट्रीय वकिलासारखे होते. अशा वेळी काही शहाणपणा, काही उतावीळपणा दाखवावा लागतो, सर्वच गोष्टींवर सारवासारव करून अशा वेळी भागत नसते. काही तरी दणदणीतपणा पाहिजे. न्याय्य काय आहे हे आपल्या लोकांस सांगताना अगदी काटेतोल भाषा योग्य ठरले. परंतुल दुस-याकडे ते मागताना गुळगुळीतपणा न दाखविता सडेतोडपणा दाखविला पाहिजे. आणि ते मिळविण्यासाठी इरेस पडले पाहिजे. ग्लॅडस्टन ऍबरडीनविषयी लिहिताना म्हणतात, 'There can be no difficult in any country, least of all this, in finding foreign minister able and willing to assert the fair and reasonable claims of their countrymen with courage and with firmness. The difficulty is quite of another kind; it is to find a foreign minister, first who will himself view those claims in the dry light of reason and of prudence; secondly and far harder task who will have the courage to hazard and if need be to sacrifice himself in keeping the mind of his countrymen down to such claims as are strictly fair and reasonable.' यांत सांगितलेला दुसरा गुण गोखल्यात होता. परंतु आपले म्हणणे साध्य होण्यासाठी जेवढा आटोप दाखवावा लागतो, जो अविर्भावॉ आणावा लागतो तो त्यांनी आणिला नाही. त्यांनी श्रम अपरंपार केले; परंतु दुस-याचे मन दुखविणे त्यांच्या जिवावर येई. मोर्ले साहेब असे म्हणतात मग कसे? बोथा देताहेत वचन-घ्या सध्या तेवढेच. असला प्रकार मुत्सद्दयास योग्य नव्हे. जे काही मागावयाचे ते इतक्या जोराने मागावे की, दुसरा स्मित न करता चपापला पाहिजे. गोखल्यांच्या मनाच्या या गोडपणामुळेच टिळक म्हणत की, गोखले हे परराष्ट्रीय वकील होण्यास योग्य नाहीत; त्यांनी 'गृहमंत्री'- 'होममेंबर'च व्हावे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel