"We have offended, oh ! my countrymen!
We have offended very grievously,
And been most tyrannous, From east to west
A groan of accusation pierces Heaven!

The wretched plead against us multitudes
Countless and vehement, the sons of God,
Our brethren like a cloud that travels on,
Steamed up from Cairo's Swamps of pestilence

Even so, my countrymen! have we gone forth
And borne to distant tribes slavery and  pangs
And, deadlier far, our vices, whose deep taint
With slow perdition murders the whole man,
His body and his soul!''

खरोखरच या इंग्लंडने आमचे शरीर आणि शरीरात वास्तव्य करणारा मानस-हंस यांस कायमचे पंगू केले आहे. या राष्ट्राने इतरांच्या स्वातंत्र्याचे कैवारी असे स्वत:स म्हणवून घेणे म्हणजे रावणाप्रमाणे आपल्याच हाताने 'शाबास माझी' धृती; अशी पाठ थोपटून घेण्यासारखे आहे. नुकत्याच झालेल्या महायुध्दात चिमुकल्या बेल्जमच्या स्वातंत्र्यासाठी इंग्लंड युध्दात पडले! काय पण शब्द! महात्मा गांधीनी तर स्पष्टच सांगितले की, जर्मनी जितका दोषी तितकेच इंग्लंडही दोषी आहे. एडवर्ड कार्पेंटरने हीच गोष्ट सिध्द केली आहे. हॅरिसन या ग्रंथकाराने आपल्या नॅशनल प्रॉब्लेम्स या प्रकरणातील लेखात इंग्लंडच्या गेल्या शतकातील धोरणावर हीच टीका केली आहे. तो 'Empire and Humanity' या निबंधात स्पष्ट लिहितो: What race, which hemisphere, what latitude, has not seen the unsheathed sword of Britain?' आणि खरोखर, हेच ब्रिटनचे यथार्थ वर्णन आहे. इतर राष्ट्रांतील चळवळ पाहून आणि स्वत:च्या देशांतील धांगडधिंगा पाहून नवीन सुशिक्षित लोकांस निराशा वाटू लागली. हिंदुस्तानातील पैशाने अवाढव्य खर्चाची युध्दे उत्पन्न करावी हे इंग्लंडचे धोरण! अफगाण युध्दावर टीका करिताना हॅरिसन म्हणतो, ''War wanton and cruel presents to our eyes the element of evil that it must throw back the task of administering our Indian Empire. A war which to every circumstance of injustice, bad faith and barbarity, adds the crushing load of exacting wrung from २०० millions of our fellow-subjects. '' व अशा लढायात होणारा अवाढव्य खर्च हिंदुस्तानच्या बोडक्यावर! याशिवाय बड्या अंमलदारांचे पगार व अत्यंत अपमानास्पद कायदे!! राज्यकारभारात तर भाग नाहीच. इंग्लंडने शंभर वर्षे राज्य केले तरी हिंदुस्तानचे पाऊल पुढे पडत नाही; परंतु तेच जपान पहा! पन्नास वर्षांत त्याने युरोपातील राष्ट्रांच्या मांडीशी मांडी लावून बसण्याचा मान मिळविला. इंग्लंड बोलून चालून परकी. स्वत:च्या रंगाचे आयरिश लोकांस जर ते वगळले तर हिंदुस्तान हे बोलून चालून काळ्यांचे राष्ट्र. आजपर्यंत शेकडो अर्ज विनंत्या केल्या त्याचा यत्किंचितही परिणाम या कठोर सरकारावर झाला नाही. राणीच्या जाहिरनाम्यात आता अशक्य सनद ठरवून टाकण्यात आले. जळफळणा-या लोकांना तत्काळ शमविण्यासाठी तो वरपांगी उपाय होता. कर्झनच्या कारकीर्दीत तर जास्तच दडपशाही माजली. सरकारी अंमलाची तात गळ्याभोवती जास्तच घट्ट बसली. हिंदुस्तानातील लोकांस एक बडी जागा देणे म्हणजे गो-याची एक जागा कमी करणे नव्हे काय? आपल्या अंमलदारांस, इंजिनिअरास, डॉक्टरांस, प्रोफेसरांस भरपूर पगाराच्या जागा देण्यासाठीच सरकारची सर्व चळवळ असावी असे लोकांस वाटू लागले. इजिप्तमध्ये सुध्दा असाच धिंगाणा परोपकाराच्या पवित्र नावाखाली इंग्लंडने घातला. आपण चळवळ केली पाहिजे, ऐक्य- वृध्दी केली पाहिजे, ही जाणीव लोकांस प्रखरतेने भासू लागली. विशेषत: बंगालमध्ये ऐक्य जास्त सहजसाध्य होते. बंगालच्या मध्यभागी सर्व बंगाली लोकांची जूट होती. हे लोक सुशिक्षित, विद्वान, भावनाप्रधान असत. त्यांच्यामध्ये जोमदार माणसे पुढे येऊ लागली. उत्तम वर्तमानपत्र निघू लागली. सरकारला हे लोकांमधील वाढते ऐक्य पाहवेना. बंगालची फाळणी करण्याचे कर्झन साहेबांच्या मनात आले. बंगाल प्रांत मोठा आहे तेव्हा त्याचा राज्यकारभार सुरळीत चालवावयासाठी आम्ही त्याची दोन छकले करतो असे गव्हर्नर जनरलने जाहीर केले. राज्यकारभार नीट होते नसेल तर तो गव्हर्नरच्या हाताखाली इलाखा करा असे सर हेन्‍री कॉटन यांनी सुचविले. परंतु लोकांचे तुकडे पाडण्याचा ज्याचा उद्देश त्यास हे कसे पटणार? त्याशिवाय गव्हर्नर हा इंग्लंडामधून नेमला जातो; लेफ्टनंट गव्हर्नर तर गव्हर्नर जनरलचा अधिकारी असतो. तोच त्याची नेमणूक करतो. यामुळे गव्हर्नर नेमण्याची बुध्दी कर्झनास पटेना. प्रथम जेव्हा कर्झन साहेबांनी आपला हेतू जाहीर केला तेव्हा बंगालचा फक्त एका कातळाच काढावा, असे त्यांच्या मनात होते. लोकांनी त्या वेळेस फार गिल्ला केला, सभा भरविल्या. यामुळे काही दिवस सर्वत्र सामसूम होते. सरकारने फाळणीचा प्रश्न सोडून दिला असे लोकांस वाटले, पण आत खलबते चालली होती. पडद्याआड कारस्थाने जोरात सुरू होती. आणि १९०५ च्या आगष्ट महिन्यात फाळणी योजना जाहीर करण्यात आली. लोकांनी ही योजना लुप्त व्हावी म्हणून आकाश पाताळ एक केले. पूर्वीच्या कातळ्याऐवजी आता बंगालचा निम्मा तुकडाच काढण्याचे सरकारने ठरविले. सिव्हिल सर्व्हंटांची पोळी पिकणार होती यामुळे त्यांनी या योजनेस मोठ्या आनंदाने संमति दिली. सिव्हिल सर्व्हंटांचे  मत विचारले, परंतु बंगालमधील ज्या जमीनदारास गोडगोड थापा देऊन सरकारने वेळोवेळी मदत घेतली होती. त्या जमीनदारांस याप्रसंगी सरकारने विचारले होते का? गरज सरो आणि वैद्य मरो. या विभागणी कायदा रद्द व्हावा म्हणून पांचशेवर सभा भरल्या. लोकांची मने दुखवू नका; जनमताला कस्पटासमान लेखणे अंती हितपरिणामक व्हावयाचे नाही असे जबाबदार पुढा-यांनी पुन: पुन: बजाविले. येवढेच काय परंतु ज्या फुल्लर साहेबांनी पुढे लोकांवर गहजब केला ते फुल्लर साहेब या विभागणीच्या विरुध्द होते. साठ हजार लोकांच्या सह्यांचा अर्ज हाऊस ऑफ कामन्सकडे करण्यात आला. पार्लमेंटमध्ये काही प्रश्नोत्तरे झाली. परंतु शेवटी काय? कर्झनसाहेबांनी आपलेच खरे केले. पार्लमेंटच्या शेवटच्या निकालाशिवाय ही योजना अंमलात येणार नाही असे दुखावलेल्या लोकांच्या मनात वाटत होते. निराश होऊनही ते आशा करीत होते. परंतु '१६ ऑक्टोबर १९०५ पासून हा कायदा, ही विभागणी अंमलात आणिली जाईल.' असे सप्टेंबरमध्ये जाहीर झाले, सरकाचा सर्व लोकांस संताप आला. सर्व मतांचे बंगाली लोक एक झाले. राष्ट्रीय वृत्ती वावरू लागली. हे बोलून चालून परकी सरकार! त्यास आमची काळजी कशी असणार? तेव्हा सरकारवर बहिष्कार घालण्याचे ठरले. ब्रिटिश मालावर बहिष्कार घालण्याचे अमलात येऊ लागले, राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळा निघू लागल्या. तरुण लोक सामर्थ्य कमावू लागले ! लाठीचे खेळ सुरू झाले!! नवचैतन्याचा उदय झाला!!! सर्व देशातील लोकांची मने एकवटली. हा कर्झन साहेबांनी आमच्या राष्ट्रावर एक गुप्त उपकारच केला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel