गोखल्यांचा स्वभाव व इतर गुण

प्रत्येकाच्या स्वभावात काही ना काही तरी वैशिष्टय असते. सद्गुणांचा पुतळा एक परमेश्वरच असून अपूर्ण राहण्यातच मौज व माणूसपणा आहे. ज्या मनुष्यात गुण व दोष संमिश्रण असते तो जनतेस फार आवडतो. चंद्र हा कलंकामुळे जास्तच खुलतो. गोखल्यांच्या स्वभावात अशीच मौज आहे. त्यांचा मुख्य अवगुण म्हटला म्हणजे तापटपणा, हट्टीपणा. त्यांच्या विरुध्द काही झाले की ते संतापत. रानड्यांच्या उदाहरणाने त्यांनी स्वत:चा दुर्गुण घालविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; परंतु थोड्या बहुत प्रमाणाने तो टिकलाच. त्यांच्या एखाद्या नोकराने जर सोसायटीचे काम वेळच्या वेळी केले नाही तर ते संतापावयाचे आणि त्यास रागे भरावयाचे. परंतु मागून त्यांचे त्यांनाच वाईट वाटे. आपण त्यास रागे भरावयाचे. परंतु मागून त्यांचे त्यांनाच वाईट वाटे. आपण त्यास फार बोललो असे वाटून ते त्या गड्यास हाक मारीत आणि म्हणत, 'अरे, काम वेळच्या वेळी करावे; टपालासारखे काम महत्त्वाचे असते. ते तू केले नाहीस म्हणून मी रागे भरलो, परंतु असे करू नको व मनात फार वाईट वाटू देऊ नको.' अभ्यंकरानी हाच अवगुण सांगितला आहे. गोखल्यांस शांती नव्हती. टीकेच्या व खळबळीच्या वर तरंगणारी ज्यांची मने असतात असे टिळक- आगरकरच ही शांतता ठेवू जाणोत. इतरांस ते शक्य नसते. वाच्छांनी आपल्या आठवणीत हाच दुगुर्ण सांगितला आहे. वादविवादात स्वत:चेच म्हणणे खरे असे त्यांस वाटावयाचे व ते हमरीतुमरीवर यावयाचे, चिडावयाचे. परंतु मागून ते आपली चूक कबूल करीत. पुष्कळ लोकांस आपली चूक कळली तरी ती कबूल करण्यात कमीपणा वाटतो. परंतु गोखल्यांस असे वाटत नसे आणि खरोखरच स्वत:ची चूक कबूल करण्यास मनाचे फारच मोठे धैर्य लागते. गोखल्यांत  आणि त्यांच्या शिष्यांत - गांधींमध्ये- हा गुण उत्कटत्वाने वास करीत आह. वाच्छा म्हणतात - 'He would seize an idea on the impulse of the moment and try to hug it till he found later on by experience that it was a wrong one.  If in nine cases the impulse was ingenuous, in the tenth it was altogether wrong and ridiculous leading him into embarrasment.  This faculty greatly developed in him as he progressed. Indeed, I should say it became confirmed. At our inner circle, when we happened to meet together for the discussion of a burning question, we had to pull him up, and be it said to his credit he would soon correct himself though not without a preliminary struggle.' या दुर्गणाप्रमाणेच हट्टीपणा, एखाद्या गोष्टीविषयी अढी त्यांच्या मनात असे. हट्टीपणाबरोबरच त्यांच्या अंगी उतावळेपणाही होता. एखादी गोष्ट मनात आली, की ती ताबडतोब अमलात आली पाहिजे असे त्यांस वाटे. एखाद्या गोष्टीची शंका आली, की लगेच ते दुस-याला कळवावयाचे. पुण्याच्या काँग्रेसच्या वेळी त्यांनी वाच्छांस अशीच तार केली. टिळकांबरोबरच्या शेवटच्या वादविवादात, टिळकांविषयी शंका घेऊन लगेच त्यांनी भूपेंद्रनात बसूंस तार केली. या उतावीळपणानेच गोखल्यांस इंग्लंडमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल क्षमा मागावी लागली.

गोखल्यांचा सरळपणा तर इतका होता, की तो गुणाची मर्यादा ओलांडून अवगुण झाला असे म्हटले पाहिजे :- 'Goodness has a limit, which if passed somehow seems to make men cowardly.' अत्यंत सरळपणामुळेच बोथांस 'वचन द्याच' असे गोखल्यांस जोराने ठासून सांगता आले नाही. कोणत्याही गुणाला मर्यादा असते. त्या मर्यादापलीकडे तो अवगुण होतो. या सरळपणास भोळसरपणा हे नाव प्राप्त होते. जगातील  निरनिराळ्या व्यक्तींबरोबर कसे वागावे हे गोखल्यांसारख्या साध्यासीध्या माणसास कसे समजणार? आणि राजकारणी पुरुषास तर याच गुणाची प्रामुख्याने जरूरी असते. नाना प्रकृतींच्या पुरुषांजवळ त्यास विचारविनिमय करावा लागतो. अनेकांची अंतरे उलगडावी लागतात. हा गुण गोखल्यांत नव्हता. मोर्ले साहेब स्टेट सेक्रेटरी झाल्याबरोबर गोखले मनात मांडे खाऊ लागले. परंतु मानवी स्वभावाचे सूक्ष्म ज्ञान असलेल्या टिळकांनी ताबडतोब मोर्ले यांचे सत्यस्वरूप त्यांच्या तोंडावरील तत्त्वज्ञानाचा बुरखा दूर करून जनतेस दाखविले. राजकारणात बिस्मार्कसारके, मॅचिव्हिलीसारखे, लॉईड जॉर्जसारखे कारस्थानी पुरुष असतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel