बुद्ध यशाला बरोबर घेऊन दुसर्‍या दिवशीं सकाळी त्याच्या घरीं गेला. जेवण आटोपल्यावर त्यानें यशाच्या आईबापांनां आणि बायकोला धर्मोपदेश केला. त्यायोगें आई व बायको या दोघीहि यशाच्या बापाप्रमाणेंच बुद्धाच्या उपासिका झाल्या, व यशाला गृहस्थाश्रमांत येण्यासाठीं त्यांनी आग्रह केला नाहीं.

वाराणसी नगरींमध्यें यशाचे पुष्कळ मित्र होते. त्यांपैकीं चौपन तरुणांनी गृहत्याग करून बुद्धाच्या भिक्षुसंघांत प्रवेश केला. बुद्धाचे पूर्वीचे पाच साथीदार, यश आणि यशाचे चौपन सोबती मिळून बुद्धाजवळ आतां साठ भिक्षु जमले.

कार्तिकी पौर्णिमा होऊन गेल्यावर बुद्धानें एके दिवशी त्या सर्व भिक्षूंना एकत्र जमविलें, आणि तो त्यांनां म्हणाला “भिक्षुहो¡ मी इहलोकींच्या आणि स्वर्गलोकींच्या सर्व बंधनापासून मुक्त झालों आहें. त्याचप्रमाणें तुम्हीदेखील या सर्व बंधनांपासून मुक्त झालां आहां. आतां तुम्ही जनतेच्या कल्याणासाठी चारी दिशांनी संचार करा. आरंभी कल्याणप्रद, मध्याला कल्याणप्रद व परिणामीं कल्याणप्रद अशा माझ्या धर्माचा सर्व लोकांनां उपदेश करा, आणि शुद्ध ब्रह्मचर्याचें सर्वानां ज्ञान करून द्या. एका मार्गानें दोघे जाऊं नका. भिक्षुहो¡ या जगामध्यें ज्यांची बुद्धि सर्वथैव मलिन झाली नाहीं, असे पुष्कळ प्राणी आहेत; पण धर्मवाक्य कानीं न पडल्यामुळें त्यांची हानि होऊं पहात आहे. तेव्हां माझा धर्म जाणणारे तुम्हांला पुष्कळ लोक सांपडतील. मीदेखील धर्मप्रचारासाठीं पुन: उरुवेलेला जातों.”

बुद्धाचें हें भाषण संपते न संपते तोंच दुष्ट मार तेथें प्रकट होऊन म्हणाला, “इहलोकींच्या आणि स्वर्गलोकींच्या सर्व बंधनांनीं तूं बांधला गेला आहेस¡ हे श्रमण, तूं या माझ्या महाबंधनातून कदापि मुक्त होणार नाहींस¡”

बुद्ध म्हणाला, “ रूप, शब्द, रस, गंध आणि स्पर्श हे पंचेद्रियांचे विषय तुझीं बंधनें आहेत; पण ते मला मोह पाडूं शकत नाहींत. तेव्हां तुझा प्रयत्न व्यर्थ आहे¡”

बुद्धानें आपणाला ओळखलें, असें पाहून मार अत्यंत दु:खी होऊन तेथेंच अंतर्धान पावला.

त्या समयी नाना राष्ट्रांतून बुद्धाच्या संघांत प्रवेश करूं इच्छिणार्‍या मनुष्यांला घेऊन हे साठ भिक्षु बुद्धाजवळ जात;  पण त्यामुळें त्यांना फार त्रास होत असे. तेव्हां बुद्धानें त्यांना तशी परवानगी दिली, कीं, ज्या होतकरू मनुष्याची संघांत प्रवेश करण्याची इच्छा असेल, त्याला आपणाजवळ न आणतां भिक्षूंनींच परस्पर दीक्षा द्यावी.

आपल्या प्रमुख साठ शिष्यांनां सर्वत्र धर्मप्रचारासाठीं पाठविल्यावर, व परस्पर श्रमणदीक्षा देण्याची त्यांनां अनुज्ञा दिल्यावर बुद्धगुरू एकटाच उरुवेलेच्या अरण्यांत आला.

मागें एके ठिकाणी सांगितलेंच आहे, कीं, या अरण्यामध्यें रहाणार्‍या तपस्वी लोकांत उरुवेलकाश्यप, नदीकाश्यप आणि गयाकाश्लप यांची प्रमुखत्वानें गणना होत होती. या तिघां भावांमध्यें उरुवलेकाश्यप वडील असल्यामुळे इतर दोघे त्याला आपला गुरू समजत असत. उरुवेलकाश्यपाचें पांचशे जटाधारी शिष्य होते. नदीकश्यपाचे तीनशें व गयाकाश्यपाचे दोनशे शिष्य होते.

बुद्धगुरू प्रथमत: उरुवेलकाश्यपाच्या आश्रमामध्यें जाऊन त्याला म्हणाला “ भो काश्यप, जर तुला माझ्यापासून अडचण होण्यासारखी नसेल, तर मी तुझ्या अग्निशाळेमध्ये एक रात्र राहीन.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel