बुद्ध म्हणाला "हे मार, तूं निष्काळजी हो. मी लवकरच इहलोक सोडून जाणार आहें. आणखी तीन महिन्यांनी माझें परिनिर्वाण होणार आहे!''

मार निघून गेल्यावर बुद्धानें आपल्या सामर्थ्यानें दाबन ठेविलेले जीवितसंस्कार सोडून दिले. त्या वेळी भयंकर धरणीकंप झाला!

भगवान् आनंदाला बरोबर घेऊन चापालचैत्याहून वैशाली येथील महावनांत कूटागारशालेंत आला, व आनंदाला पाठवून वैशालीच्या आसपास असलेल्या सर्व भिक्षूंनां त्यानें कूटागारशालेंत गोळा करविलें. सगळे भिक्षु एकत्र जमल्यावर बुद्ध ह्मणाला "भिक्षुहो, तुमचें ब्रह्मचर्य चिरस्थायि व्हावें व त्यायोगें पुष्कळ लोकांचें कल्याण व्हावें, पुष्कळ लोकांनां सुख व्हावें, असें जर तुह्मांला वाटत असेल, तर मीं शिकविलेल्या कुशल धर्माचें चांगले अध्ययन करा, व त्याची चांगली भावना करा. भिक्षुहो, चार स्मृत्युपस्थानें१, चार सम्यक् प्रयत्न२, चार ऋद्विपाद३, पांच इंद्रियें, पांच बळें, सात बोध्यंगं२ आणि आर्य अष्टांगिक३ मार्ग, या कुशल धर्माचा बोध करून घेऊन मीं तुम्हाला उपदेश केला आहें; याचें चांगलें मनन करून भावना करा.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१. पान२५६-६१ पहा.
२. जे पापविचार उत्पन्न झाले नसतील, ते उत्पन्न होऊं न देण्याविषयीं प्रयत्न; जे पापविचार उद्भवले असतील त्यांच्या नाशाविषयीं प्रयत्न; जे पुण्यविचार उत्पन्न झाले नसतील ते उत्पन्न करण्याविषयीं प्रयत्न; आणि जे पुण्यविचार उभंवले असतील त्यांची अभ्युन्नति करून पूर्तता करण्याचा प्रयत्न; या चार मानसिक प्रयत्नांनां सम्यक् प्रयत्न असें म्हणतात.

३. क्रियासातत्य, चित्ताची एकाग्रता, मानसिक उत्साह आणि सत्यान्वेषणबुद्धि (मीमांसा) या चार मनोधर्माला ऋद्विपाद म्हणजे योगसिद्धीचे पाये असें म्हणतात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"भिक्षुहो, सावध व्हा, सावध व्हा! सगळे संस्कार व्ययधर्मी आहेत, हें लक्ष्यांत ठेवा, व सावधपणें वागा. तीन महिन्यांनी माझें परिनिर्वाण होणार आहे! भिक्षुहो, मी अत्यंत वृद्ध झालो आहें, आणि माझें आयुष्य थोडें राहिलें आहे. माझें कर्तव्य मीं केलें आहे, व लवकरच मीं तुम्हांला सोडून जाणार आहें. भिक्षुहो, सावध आणि जागृत व्हा, शील आणि समाधि या गुणांनीं युक्त व्हा, व स्वत:च्या चित्ताचें दमन करा. जो माझ्या उपदेशाला अनुसरून सावधानपणें वागेल, तो पुनर्जन्मापासून मुक्त होऊन दु:खाचा नाश करील''

दुसर्‍या दिवशी बुद्ध आनंदाला बरोबर घेऊन वैशालींत भिक्षेला गेला. तेथें तो आनंदाला म्हणाला "आनंद, तथागताला वैशालीचें हें शेवटलें दर्शन आहे. चल-आतां आपण भांडग्रामाला जाऊं.''

तदनंतर बुद्ध आपल्या भिक्षुसंघासह भांडग्रामाला आला, व तेथें भिक्षूंनां म्हणाला "भिक्षुहो, आर्यशील, आर्यसमाधि, आर्यप्रज्ञा, आणि आर्यविमुक्ति, या चार गोष्टींचा यथार्थ बोध झाल्यामुळें आम्ही अनादिकालापासून संसृतीच्या पाशांत सांपडलों होतों; पण ज्या अर्थीं आम्हांला चार चार धर्मांचे यथार्थ ज्ञान झालें आहे, त्या अर्थीं आतां आम्हांला पुनर्जन्म राहिला नाही.''
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१. इंद्रियें आणि बळें एकच आहेत. इंद्रियांसंबंधानें विशेष माहिती १२९-३० पानांवर आलीच आहे.
२. सात बोध्यंगांची भावना कशी करावी, यासंबंधानें माहिती ''१-'' पानांवर पहावी.
३. पान १५०-५१ पहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel