ककुत्थानदीवरून बुद्धगुरु भिक्षुसंघासह हिरण्यवती नदी ओलांडून तिच्या परतीरी कुसिनारेंतील मल्लांच्या शालवनांत गेला. तेथें आनंदानें एका जुळ्या शालवृक्षाखालीं बुद्धाचा बिछाना तयार केला. बुद्धगुरु उत्तरेला डोकें करून उजव्या कुशीवर निजला. त्या वेळीं ते शालवृक्ष फुलून गेले होते व आपल्या पुष्पवृष्टीनें जणूं काय बुद्धाची पूजाच करीत होते. अंतरिक्षांतून देखील बुद्धगुरूवर पुष्पवृष्टि होत होती, व बुद्धपूजेसाठीं दिव्य वाद्यें वाजत होती. तें पाहून बुद्ध आनंदाला म्हणाला ''आनंद, तथागताच्या पूजेसाठीं जरी पुष्कळ फुलें खर्च केलीं, किंवा दिव्य वाद्यें वाजविली, तरी तेवढ्यानें तथागताची पूजा होणार नाहीं. तथागताच्या पूजेचा मार्ग म्हटला म्हणजे त्यानें उपदेशिलेल्या धर्माला अनुसरून वागा.''

आनंद म्हणाला ''भगवन्, चारी दिशांना चातुर्मास्य घालविल्यावर भिक्षु आपल्या दर्शनाला येत असत. तेथें दुसर्‍या सज्जन भिक्षूंच्या ओळखी होत असत; पण आतां आह्मांला सज्जन भिक्षूंचें दर्शन कसें होईल?''

बुद्ध म्हणाला "आनंद, तुझ्यासारख्या श्रद्धावान् मनुष्याला माझ्या परिनिर्वाणानंतर या चारस्थानांचें दर्शन घेण्यालायक आहे. जेथें तथागत जन्मला१, तेथें तथागत संबुद्ध२ झाला, जेथें तथागतानें पहिला धर्मोपदेश केला१, व जेथें तथागत परिनिर्वाणाला२ गेला, हीं तीं चार स्थानें होत.या चार स्थानांची यात्रा केली असतां मनुष्याला पुष्कळ पुण्य मिळेल.''
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१. हें स्थान नेपाळी तराईंत भगवानपुर नांवाच्या जिल्ह्याच्या मुख्य शहरापासून दीड मैलाच्या अंतरावर आहे. याला सध्या लुंबिनदेई असें म्हणतात. बुद्ध धर्म आणि संघ, पान २ पहा.
२. हें स्थान गयेच्या दक्षिणेस सात मैलांवर आहे. याला बुद्धगया म्हणतात. येथें प्राचीनकाळीं बांधलेलें एक मंदिर असून बुद्धाच्या पुष्कळ मूर्ति, स्तूप वगैरे पहावयाला सांपडतात.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आनंद म्हणाला "भगवन्, स्त्रियांशीं आम्ही कसें वागावें?''

बुद्ध म्हणाला "होतां होईल तों स्त्रियांचें दर्शन वर्ज्य करा.''

"पण भगवन्, दर्शनाचा प्रसंगच आला तर काय करावें?''

आनंद, असा प्रसंग आला असतां त्यांच्याशीं भाषण करूं नका.''

"आणि भगवन् संभाषणाचा प्रसंग आला असतां काय करावें?''

"आनंद, असा प्रसंग आला असतां स्मृति जागृत ठेवा.''

`भगवन्, परिनिर्वाणानंतर आपल्या देहाची काय व्यवस्था करावी?''

बुद्ध म्हणाला "आनंद, माझ्या परिनिर्वाणानंतर माझ्या देहाची पूजा करावयाच्या भानगडींत तुम्ही पडूं नका. मीं जो तुम्हांला सन्मार्ग शिकविला आहे, त्याला अनुसरून चालण्याचा प्रयत्न करा. सावधान व्हा, उद्योगी व्हा, आणि शांत व्हा. पुष्कळ गृहस्थ माझे शिष्य आहेत, ते माझ्या शरीराची यथायोग्य व्यवस्था लावितील.''

तदनंतर आनंद विहारामध्यें जाऊन अश्रु गाळूं लागला. आपण सोतापन्न३ असतांनाच भगवंताचें परिनिर्वाण होत आहे, याबद्दल
------- -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१. काशीजवळ सारनाथ या ठिकाणी बुद्धानें पहिला उपदेश केला. बुद्धकालीं याला ऋषिपत्तन मृगदाव असें म्हणत.

२. हें स्थान गोरखपुर जिल्ह्यांत आहे. कसया ह्मणून एक तालुक्याचें गांव आहें, तेथून हें एका मैलाच्या अंतरावर आहे. याला माथाकुंवरका कोट असें तेथील शेतकरी म्हणतात.

३. सोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहा अशा निर्वाणमार्गाला लागलेल्या मनुष्यांच्याचार पायर्‍या आहेत. बुद्ध, धर्म आणि संघ, पान ९९ पहा.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
त्याला अत्यंत दु:ख झालें. तेव्हां बुद्धा त्याला बोलावून आणून म्हणाला "आनंद! असा शोकाकुल होऊं नकोस. सर्व प्रिय वस्तूंपासून आम्हांला विभक्त व्हावें लागणार, हें मीं आगाऊच सांगितलें नाही काय? जी वस्तु जन्माला आली, त्या वस्तूचा नाश होऊं न देणें शक्य आहे काय? आनंद, तूं तथागताची मनोभावें सेवा केली आहेस, तूं पुण्यवान् आहेस; जर प्रयत्न करशील, तर तूं लवकर अर्हन् होशील.''

आनंद म्हणाला "भगवन्, या लहानशा शहरांत आपलें परिनिर्वाण होणें मला इष्ट वाटत नाहीं. चंपा, राजगृह, श्रावस्ति, साकेत, कौशांबी, आणि वाराणसी, या मोठ्या शहरांपैकीं एकाद्या शहरी तथागताचें परिनिर्वाण व्हावें, अशी माझी इच्छा आहे.''

बुद्ध म्हणाला "आनंद, हें लहान शहर आहें, असें समजूं नको. सध्यां जरी याची लहान शहरांत गणना होते, तरी पूर्वी एका काळी सुदर्शन नांवाच्या प्रख्यात राजाची ही राजधानी होती. त्या वेळीं याला कुशावती असें म्हणत, व देवांच्या राजधानींची तिला उपमा देण्यांत येत असे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel