२६. चार महिने तो नीट रितीनें वागला तर संघाने त्याला पूर्वी सांगितल्याप्रमाणें उपसंपदा द्यावी. जर त्याच्याजवळ चीवर नसेल तर तें उपाध्यायाने द्यावें. जटिल श्रावक हे कर्मवादी१ आहेत. तेव्हां त्यांस परिवास न देतां उपसंपदा द्यावी. शाक्य कुलांत जन्मलेला मनुष्य दुसर्‍या पंथांतून संघांत येण्याची इच्छा करीत असला तर त्यालाहि परिवास न देतां उपसंपदा द्यावी.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- कर्मांप्रमाणे फळ मिळतें असें समजणारे, म्हणजे नास्तिक नव्हत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२७. त्या काळीं मगध देशांत कुष्ठ, गंड, किलास, क्षय आणि अपस्मार हे पांच रोग फैलावले. लोक जीवक कौमारभृत्याकडे जाऊन औषध मागत असत. परंतु त्याला सवड नसे. तो म्हणे, “मला बिंबिसार राजाच्या प्रकृत्तीची काळजी घ्यावी लागते, त्याच्या अंत:पुरांतील स्त्रियांना औषध द्यावें लागतें, व बुद्धाच्या भिक्षुसंघाचीहि काळजी घ्यावी लागते. तेव्हां इतरांची चिकित्सा करण्यास मला सवड नाही.” तेव्हां आपणाला औषध मिळावें ह्या उद्देशानें रोगी लोक बौद्धसंघांत शिरूं लागले. त्यामुळें भिक्षूंना अत्यंत मेहनत पडत असे; व जीवक कौमारभृत्यालाहि ह्या नवीन रोगी भिक्षूंची काळजी घेतां घेतां आपलीं कामें करण्यास वेळ मिळत नसे. तसाच एक रोगी मनुष संघांत शिरला; व जीवकानें त्याला पूर्वस्थितीवर आणल्यानंतर तो संघ सोडून चालता झाला. एके दिवशीं जीवकानें ‘पूर्वी तू संघांत होतास कीं नाही’ असा प्रश्न त्या मनुष्याला केला. तेव्हां त्यानें होय असें उत्तर दिलें. ‘संघ सोडण्याचें कारण काय?’ असें विचारलें असतां तो म्हणला, “मला तुमच्याकडून औषध मिळावें व माझा रोग बरा व्हावा ह्याच हेतूनें मी संघांत प्रवेश केला; व रोग बरा झाल्याबरोबर संघाला सोडून निघालों.” हें त्या मनुष्याचे कृत्य जीवकाला आवडलें नाहीं. बुद्धाजवळ जाऊन ‘अशा रोग्यांना संघांत घेण्यांत येऊं नये’ अशी त्यानें विनंती केली. बुद्धानें त्याला धर्मोपदेश केल्यावर तो बुद्धाला वंदन करून निघून गेला. तेव्हां बुद्ध भिक्षूंना म्हणाला, “आजपासून अशा रोग्यांना संघांत घेण्याची मी मनाई करतों.”

२८. त्या काळीं बिंबिसार राजाच्या राज्याच्या सरहद्दीवर बंड चाललें होतें. तेव्हां बिंबिसार राजानें तें मोडण्यास आपल्या सेनानायक महामात्रांना आज्ञा केली. त्यांनी लढाईची तयारी चालविली; परंतु कित्येक प्रसिद्ध शिपायांच्या मनांत असा विचार आला कीं, ह्या लढाईच्या नादीं लागून आम्ही पुष्कळ पाप पैदा करतों; ह्यांतून मुक्त होऊन कल्याणाचा मार्ग आम्हांस कसा मिळेल? शाक्यपुत्रीय२ श्रामण पंथांत शिरल्यानें आपण युद्धांतून सुटूं असें वाटून त्यानीं संघांत प्रवेश केला. इकडे महामात्रांनीं त्यांचा शोध चालविला असतां ते बौद्ध भिक्षु झाले आहेत असें आढळून आलें; व त्यांनीं ती तक्रार बिंबिसार राजाजवळ नेली. बिंबिसार राजा न्यायाधिशांना (वोहारिकांना) बोलावून म्हणाला, “सैन्यांतील योद्धयाला जो प्रव्रज्या देईल त्याला कोणता दंड करावयास पाहिजे?” न्यायाधिश म्हणाले, “राजयोद्धयाचा जो उपाध्याय होईल त्याचें डोकें कापावें; संघांत जाहीर कणार्‍याची जीभ तोडावी; व हजर असलेल्या भिक्षूंच्या अर्ध्या बरगड्या मोडाव्या. तेव्हां बिंबिसार भगवान् बुद्धाकेड जाऊन त्याला वंदन करून म्हणाले, “भदंत असे पुष्कळ राजे आहेत कीं, ज्यांची भगवंतावर श्रद्धा नाहीं; व ते थोडक्यासाठी भिक्षूंना त्रास देण्यास तयार असतात. तेव्हां भिक्षूंनीं राजयोद्धयाला प्रव्रज्या देऊं नये हे बरें.” बुद्धाने बिंबिसार राजाला धर्मोपदेश केल्यावर बुद्धाला नमस्कार करून तो निघून गेला. नंतर बुद्ध भिक्षूंना म्हणाला, “आजपासून राजयोद्धयाला प्रव्रज्या देऊं नये.”
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(२- बौद्ध)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२९. आणखीहि निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळ्या तर्‍हेच्या माणसांना संघांत येण्याची बुद्धानें मनाई केली. त्याचा सारांश असा:- कोणत्याहि प्रकारच्या चोराला संघांत घेतां कामा नये. कर्जदाराला संघांत घेतां कामा नये. दासाला जोंपर्यंत तो दास्यांत आहे तोंपर्यंत संघांत घेतां कामा नये. ज्याच्या वयाला वीस वर्षे पुरीं झालीं नाहींत अशा तरुणाला संघात घेतां कामा नये. जो संघाच्या परवानगीवांचून आपण होऊन संघांत शिरला असेल त्याला संघांतून हाकून द्यावें व पुन्हां संघांत घेऊं नये. जो भिक्षु झाला असतां भिक्षुवेषानेंच इतर परिव्राजक पंथांत जाईल. त्याला पुन्हां संघांत घेऊं नये. आई, बाप, आणि आर्हन्त ह्यांचा अनादर करणारा, भिक्षुणींवर जुलूम करणारा, संघभेदासाठीं प्रयत्न करणारा व बुद्धाला जखम करणारा, ह्यांना संघांत घेऊं नये; व चुकून घेण्यांत आलें असल्यास त्यांना संघाबाहेर घालवून द्यावें. नपुंसकाला संघांत घेऊं नये, व घेतले असल्यास संघाबाहेर घालून द्यावें. उपाध्याय असल्यावांचून उपसंपदा देऊं नये. तो उपाध्याय योग्य असावा.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel