२ आणि ३
सारिपुत्त आणि मोग्गल्लान

“भिक्षुहो, माझ्या महाज्ञानी भिक्षुश्रावकांत सारिपुत्त श्रेष्ठ आहे.”
“भिक्षुहो, माझ्या बुद्धिमान भिक्षुश्रावकांत महाभोग्गल्लान श्रेष्ठ आहे.”

हे दोघेहि राजगृहाजवळ सधन ब्राह्मणकुळांत जन्मले. ते वयानें भगवंतापेक्षां मोठे होते. सारिपुत्त उपतिष्य१ (१- सारिपुत्त आणि मोग्गल्लान हे प्रसिद्धीला आल्यावर त्यांच्या जन्मामाल त्यांची लहानपणीची नांवें दिलीं गेलीं असतील, हेंहि संभवनीय आहे.) गांवच्या पुढारी कुटुंबांत जन्मला म्हणून त्याला ‘उपतिष्य’ हेंच नांव ठेवण्यांत आलें होतें. सारि ब्राह्मणीचा मुलगा म्हणून त्याला सारिपुत्त म्हणत असत, व ह्याच नांवानें पुढें तों प्रसिद्धीस आला. कोलित गांवच्या पुढारी कुटुंबांत जन्मल्यामुळें मोग्गल्लानाला ‘कोलित’ हेंच नांव ठेवण्यांत आलें होतें. मोग्गली ब्राह्मणीचा मुलगा म्हणून त्याला मोग्गाल्लान म्हणत, व ह्याच नांवानें पुढें तो प्रसिद्धीस आला. ह्या दोन कुटुंबांत पुष्कळ पिढ्यांचें सख्य नांदत होतें. त्यांत सारिपुत्त आणि मोग्गल्लान समवयस्क व समानशील असल्या कारणानें त्या दोघांची निकट मैत्री जडली. बाहेर गांवीं कोठेंहि जावयाचें असलें तर ते एकमेकांना सोडून जात नसत.

राजगृह येथें टेंकडीवर दर वर्षी जत्रा भरत असे. तिला गिरग्गसमज्जा (गियग्रसमज्या) म्हणत असत. हे दोघेहि तेथें जाऊन नाचतमाशा पहाण्यांत गुंतले असतां त्यांच्या मनांत पूर्वपुण्यप्रभावानें एकाएकीं असा विचार आला, कीं, शंभर वर्षांनंतर ह्यांतील एकहि प्राणी शिल्लक रहावयाचा नाहीं. ते दोघेहि विचारांत मग्न झाले. शेवटीं कोलित उपतिष्याला म्हणाला, “मित्रा तूं रोजच्याप्रमाणे आनंदी दिसत नाहींस, याचें कारण काय? तेव्हां उपतिष्यानें आपल्या मनांतला विचार सांगितला; व कोलिताच्या विचारमग्नतेचें कारण विचारलें. कोलितानेंहि, आपल्या मनांत तंतोतंत तोच विचार आला, असें जेव्हां सांगितलें, तेव्हां तेथेंच त्या दोघांना गृहत्याग करून परिव्राजक होण्याचा निश्चय केला; आणि राजगृह येथें राहणार्‍या प्रसिद्ध संजय परिव्राजकाचे ते दोघेहि शिष्य झाले. परंतु संजयाच्या धर्माच्या अभ्यासानें त्यांच्या मनाला शांति मिळेना. तेव्हां त्यांनीं असा निश्चय केला कीं, इतर पंथाच्या श्रमणांशीं धर्मचर्चा करून जर आपणांपैकी एकाद्याला खर्‍या मार्गाचा बोध झाला, तर त्यानें ती गोष्ट तत्काळ दुसर्‍याला कळवावी, व दोघानींहि मिळून त्या पंथांत शिरावें.

वाराणसी येथें धर्मचक्राची स्थापना करून व साठ भिक्षूंना धर्मोपदेशासाठीं इतस्तत: पाठवून बुद्ध भगवान् स्वत: उरुवेलेला आला. तेथें त्यानें उरुवेलकाश्यप, नदीकाश्यप व गयाकाश्यप ह्या तीन प्रसिद्ध जटिल तपस्वी बंधूंना आपल्या संघांत घेतले व त्यांच्या पंथांतील सर्व जटिलांना भिक्षु करून ह्या मोठ्या भिक्षुसमुदायासह तो राजगृहाला आला. तेथें बिंबिसारराजानें त्याचा मोठा गौरव करून त्याला व भिक्षुसंघाला राहाण्यासाठीं वेळुवन नांवाचें उद्यान दान दिलें. बुद्ध भगवान् उद्यानांत रहात असतां एके दिवशीं अस्सजि (अश्वजित्) भिक्षु राजगृहांत भिक्षाटन करीत होता. त्याची प्रसन्न चर्या पाहून सारिपुत्ताच्या मनांत एकदम त्याजविषयीं आदर उत्पन्न झाला. परंतु भिक्षाटनाच्या वेळीं प्रश्न विचारणें योग्य नव्हतें. म्हणून कांहीं एक न बोलतां सारिपुत्त अस्सजीच्या मागोमाग राजगृहांतून बाहेर पडाला; व अस्सजीला शहराबाहेर गांठून कुशलप्रश्नादि विचारून म्हणाला, “आयुष्मन, तुझी चर्या प्रसन्न दिसत आहे. तुझा गुरु कोण? तूं कोणत्या धर्माला अनुसरून वागतोस?”

अस्सजि:-आयुष्मन् शाक्य कुलांतून निघून प्रव्रज्या घेतलेला महाश्रमण आहे. तो भगवान् माझा गुरु. त्या भगवंताच्या धर्मास अनुसरून मी वागतो
सारिपुत्त:- तुझ्या गुरूचा धर्म कोणता? तो कोणतें मत प्रतिपादन करतो?
अस्सजि:- मी ह्या पंथांत नुकताच आलों आहें. तेव्हां माझ्या गुरूचा धर्म सविस्तर मला सांगतां येत नाहीं. पण तो थोडक्यांत मी तुला सांगूं शकेन.
सारिपुत्त:- संक्षेपानें सांग किंवा विस्तारानें सांग. भावार्थ सांग म्हणजे झालें. मला भावार्थ पाहिजे आहे. पुष्कळ शब्द घेऊन काय करावयाचे?
अस्सजि:- कारणापासून उत्पन्न झालेले जे पदार्थ (पंचस्कंधादिक दु:खद पदार्थ) त्यांचें कारण तथागतानें सांगितलें आहे, आणि त्यांचा निरोध कसा होतो हेंहि सांगितलें आहे; हेंच महाश्रमणाचें मत होय.१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१- मूळ गाथा अशी आहे:- येधम्मा हेतुप्पभवा हेतुं तेसं तथागतो आह। तेसं च यो निरोधो एवंवादी महासमणो।। ही गाथा फार प्रसिद्ध असून प्राचीन शिलालेखांत पुष्कळ ठिकाणीं सांपडतें.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तें ऐकून सारिपुत्ताच्या अंत:करणांत तत्काळ चक्क प्रकाश पडला. ज्या दु:खाचा उत्पाद होतो त्याचा निरोधहि झाला पाहिजे, आणि हाच तो मोक्षाचा मार्ग आहे. अशी त्याची खात्री झाली. त्यानें मोग्गल्लानापाशीं जाऊन हें वर्तमान त्याला सांगितलें. तेव्हां मोग्गल्लान म्हणाला, “ह्या पंथांत आमच्या आश्रयानें रहाणारे हे अडीचशें भिक्षु आहेत. त्यांनाहि आपण ही गोष्ट कळवूं.” त्यांजवळ जाऊन सारिपुत्त आणि मोग्गल्लान त्यांना म्हणाले, “तु्म्ही आमच्या आश्रयानें या परिव्राजकपंथांत रहात आहां. पण आतां आम्हीं भगवंताच्या पंथांत जाण्याचा निश्चय केला आहे. जर तुमची इच्छा असेल तर आमच्या बरोबर चला.” त्या दोघांनी आपला विचार संजय परिव्राजकालाहि कळविला. तेव्हां संजय म्हणाला, “तुम्ही असें करूं नका. आपण तिघेहि ह्या परिव्राजकसंघाचे प्रमुख होऊं.” पण सारिपुत्त आणि मोग्गल्लान ह्यांनीं त्याचें बोलणें ऐकलें नाहीं; आणि आपल्या आश्रयानें रहाणार्‍या २५० परिव्राजकांना घेऊन ते भगवंताकडे गेले. त्यामुळें संजयाला अत्यंत दु:ख झालें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel