१३५. बुद्ध भगवान् शाक्यदेशांत कपिलवस्तु येथें निग्रोधारामांत रहात होता. त्या वेळीं हस्तिदंताचें काम करणार्‍या एका कारागिरानें भिक्षूंना सुया ठेवण्यासाठीं डब्या (सूचिगृह) करून देण्याचें कबूल केलें होतें. भिक्षु त्याजपाशीं नानाप्रकारच्या डब्या मागूं लागल्यामुळें इतर वस्तू तयार करून आपला निर्वाह करणें त्याला फार कठीण झालें...ह्या प्रसंगीं भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु हाडाची, हस्तीदंती किंवा शिंगाची सुयांची डबी करवील त्याला- ती डबी फोडवून- पाचित्तिय होतें ।।८६।।


१३६. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं उपनंद शाक्यपुत्र उंच मंचकावर निजत असे... ह्या प्रसंगीं भगवंतानें नियम केला तो असा:-

नवीन खाट किंवा आसन करवीत असतां त्याचे पाय खालचे अटनीपासून१ आठ सुगत अंगुळें ठेवावे. त्यापेक्षां जो जास्त उंच ठेवील, त्याला- ते कापावयास लावून- पाचित्तिय होतें ।।८७।।
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- अटनी म्हणजे घोड्याच्या खुरासारखा किंवा अशाच दुसर्‍या कांहीं आकाराचा पायाचा बुडाचा भाग. तीन अंगुळें म्हणजे एक सुगत अंगुळ.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१३७. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु मंचक आणि आसन, कापूस भरून वरून कापड्यांनीं शिवून तयार करीत असत. त्यांची लोक निंदा करीत... ह्या प्रसंगीं भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु कापूस भरलेला मंचक किंवा आसन तयार करवील, त्याला- कापूस काढावयास लावून- पाचित्तिय होतें ।।८८।।

१३८. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या वेळीं भगवंतानें भिक्षूंना आसन वापरण्याची परवानगी दिली होती. षड्वर्गीय भिक्षु मोठमोठलीं आसनें वापरीत असत. तीं मंचकाच्या किंवा लांकडी बैठकीच्याखालीं लोंबकळत असत...ह्या प्रसंगीं भगवंतानें नियम केला तो असा:-

“भिक्षु बसण्याचें आसन करवीत असतां त्यानें ते प्रमाणांत करवावें. ते प्रमाण असें:- दोन सुगतवितस्ति लांबी आणि दीड सुगतवितस्ति रुंदी. ह्या प्रमाणांचा अतिक्रम करील, त्याला- तें आसन कापावयास लावून- पाचित्तिय होतें.”
परंतु उदायी भिक्षु धिप्पाड असल्यामुळें त्याला एवढें आसन पुरत नसे. तेव्हां भगवंतानें वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

भिक्षु बसण्याचें आसन करवीत असतां त्यानें तें प्रमाणांत करवावें. तें प्रमाण असें:- दोन सुगतवितस्ति लांबी, दीड सुगतवितस्ति रुंदी आणि एक वीत कांठ. ह्या प्रमाणाचा अतिक्रम करील, त्याला- तें आसन कापावयास लावून- पाचित्तिय होतें ।।८९।।

१३९. बुद्ध भगवान् श्रावस्ती येतें जे. अ. आरामांत रहात होता. त्या वेळीं भगवंतानें भिक्षूंना खरूज झाली असतां कण्डुप्रतिच्छादक पंचा वापरण्याची परवानगी दिली होती. पण षड्वर्गीय भिक्षु असे पंचे प्रमाणाबाहेर वापरीत असत; म्हणून भगवंतानें नियम केला तो असा:-

कण्डुप्रतिच्छादक पंचा भिक्षूनें प्रमाणांत करवावा. त्याचें प्रमाण असें:- चार सुगतवितस्ति लांबी व दोन सुगतवितस्ति रुंदी. त्याचा अतिक्रम करील, त्याला- पंचा कापावयास लावून- पाचित्तिय होतें ।।९०।।

१४०. श्रावस्ती येथें असतांना षड्वर्गीयांनीं पावसाळ्यांत वापरण्याच्या पंचाच्या प्रमाणांत अतिक्रमण केल्यामुळें भगवंतानें खालील नियम केला:-

वर्षाकालीन पंचा करवितांना भिक्षूनें प्रमाणांत करवावा. त्याचें प्रमाण असें:- सहा सुगतवितस्ति लांबी, व अडीच सुगतवितस्ति रुंदी. ह्या प्रमाणाचा अतिक्रम करील त्याला- तो पंचा कापावयास लावून- पाचित्तिय होतें ।।९१।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel