ह्या तरुण मुलीची गोष्ट येथें देणें योग्य आहे. आईबापें बाळपणींच वारल्यामुळें तिच्या दाईनें तिचें मोठ्या कष्टानें आपल्या मुलीप्रमाणें संगोपन केलें. तिच्या सौंदर्याची आणि विशेषतः लांब केसांची त्या शहरांत फार ख्याति होती. दुसर्‍या एका श्रीमंताची मुलगी अल्पकेशा होती. तिनें हजार कार्षापणांपर्यंत ह्या मुलीच्या केसांची किंमत देऊं केली. परंतु हे नैसर्गिक आभरण द्रव्य घेऊन विकण्यास ती कधींहि कबूल झाली नाहीं. एवढ्या शहरांत महाकात्यायनासारख्या भिक्षूला भिक्षा मिळूं नये, हें पाहून तिला अत्यंत वाईट वाटलें, आणि आपल्या शहराची अब्रू बचावण्यासाठीं तिनें आपले केंस आपल्या हातानें कापून ते दाईकडून त्याच श्रीमंत मुलीकडे विकावयाला पाठविले. ते वस्त्रानें झांकून एका हातानें आंसवे पुशीत व दुसर्‍या हातानें केंस आणि आपलें तुटून पडूं पाहणारें हृदय संभाळीत ती दाई त्या श्रीमंत मुलीकडे गेली.

केंस पाहून ती मुलगी आपल्या मनाशीं म्हणाली, “आपण हिला किती तरी पैसे देण्याचें कबूल केलें होतें! पण आतां ह्यांच्या खर्‍या किंमतीसच हे मला मिळतील.” दाईच्या हातावर आठ कार्षापण ठेवून ती म्हणाली, “तूं ते कोठे जरी नेलेस, तरी ह्या केसांची किंमत आठच कार्षापण!” बिचारी दाई कांहीं न बोलतां ते कार्षापण घेऊन माघारी आली; व तें सर्व द्रव्य खर्चून त्या गरीब मुलींने महाकात्यायनादिकांना भिक्षा दिली.

महाकात्यायन उज्जयनीला आला, तेव्हां प्रद्योतानें त्याचा चांगला आदरसत्कार केला. वाटेंत घडलेली ही गोष्ट सहजासहजीं कात्यायनानें राजला सांगितली; तेव्हा त्यानें आपल्या मंत्र्याला पाठवून मोठ्या आदरसत्कारानें त्या गरीब मुलीला उज्जनीला आणून आपली पट्टराणी केलें. तिला जो मुलगा झाला, त्याला तिच्या बापाचें ‘गोपाल’ हे नांव ठेवण्यांत आलें, व त्यामुळें तिला ‘गोपालमाता देवी’ असें म्हणत असत. तिनें राजाकडून कांचनवनोद्यानांत महाकात्यायनासाठीं एक विहार बांधविला. ह्याप्रमाणें उज्जयनी येथें महाकात्यायनाचा मोठा गौरव झाला. तरी त्याला गंगायमुनेच्या प्रदेशांत रहाणें अधिक आवडत असे; कां कीं, तेथें बुद्धदर्शन सुलक्ष होतें.

मज्झिमनिकायांतील मधुपिंडिक, महाकच्चानभद्देसकरत्त व उद्देसविभंग ह्या तीन सुत्तांत महाकात्यायनानें भगवंताच्या संक्षिप्त उपदेशाचा विस्तारानें अर्थ सांगितला आहे. मधुर किंवा मधुरिय सुत्तांत महाकात्यायनाचा मधुरराजाशीं झालेला संवाद आहे. तो बराच बोधप्रद वाटल्यावरून त्याचा सारांश येथें देतों :-

एके वेळीं महाकात्यायन मधुरा १  येथें गुंदावनांत रहात होता. मधुरेचा अवंतिपुत्र नांवाचा राजा महाकात्यायनाच्या दर्शनासाठीं तेथें आला, व कुशलप्रश्नादिक विचारून म्हणाला, “भो कात्यायन, ब्राह्मणवर्णच श्रेष्ठ आहे व दुसरे वर्णहीन आहेत; ब्राह्मणांलाच मोक्ष आहे, इतरांना नाहीं; ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या मुखापासून झाले, असें ब्राह्मणांचें म्हणणें आहे. त्या बाबतींत आपलें मत काय?”
-----------------------------------------------------------------------------------------------------
१- मथुरेला बौद्ध ग्रंथांत मधुरा हें नांव आहे, व त्याजवरून मद्रास इलाख्यांतील मधुरा शहराचें नांव घेतलें असावें अशी कित्येक प्राच्यपंडितांची समजूत आहे. गुंदा [सं. गुन्द्रा] म्हणजे भद्रमुस्तक नांवाचें गवत. स्याद्‍भद्रमुस्तको गुन्द्रा [ अरमकोश ].
-----------------------------------------------------------------------------------------------------
कात्यायन :- महाराज, हा नुसता घोष आहे! समजा, इतर जातीचे लोक धनाढ्य झाले तर त्यांची मोठ्या स्वामिभक्तीनें सेवा करण्यास ब्राह्म तयार असतात कीं नाहीं?

राजानें ‘होय’ असें उत्तर दिल्यावर कात्यायन म्हणाला, “असें आहे तर सर्व वर्ण समान ठरत नाहींत काय?  व ब्राह्मण वर्ण श्रेष्ट आहे, हा नुसता घोष आहे, असें ठरत नाही काय? जर ब्राह्मणानें पापकर्म केलें तर तो नरकांत जाणार नाहीं, आणि शुद्रानें केलें तर तो जाईल, असें घडेल काय? किंवा ब्राह्मणानें पुण्यकर्म केलें तर तो स्वर्गाला जाईल, आणि शूद्रानें केलें तर तो जाणार नाहीं, असें होणें शक्य आहे काय?”

महाराजानें, ‘नाहीं’ असें उत्तर दिलें तेव्हां कात्यायन पुढें म्हणाला, “तुमच्या राज्यांत ब्राह्मणानें चोरी किंवा इतर गुन्हा केला तर त्याला माफी मिळते, व शूद्रानें केला तर त्याला शिक्षा होते, अशी पद्धत आहे काय?”

राजाः- असें होणें कधींच शक्य नाहीं, ब्राह्मण असो कीं, शूद्र असो, ज्याच्या त्याच्या गुन्ह्याप्रमाणें त्याला योग्य शिक्षा देण्यांत येत असते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel