भगवान् ह्या वेळी वेळुवनांत रहात होता. सारिपुत्त आणि मोग्गल्लान येत असल्याचें पाहून तो भिक्षूंना म्हणाला, “कोलित आणि उपतिष्य हे दोघे इकडे येत आहेत. ते माझे अग्रश्रावक होतील.” भगवंताजवळ येऊन त्यांनीं व त्यांच्या साथीदार परिव्राजकांनीं भिक्षुसंघांत घेण्याची भगवंताला विनंति केली. भगवान् म्हणाला, “भिक्षुहो, इकडे या. धर्माचें उत्तम विवरण केलें आहे. दु:खाचा पूर्णपणें उच्छेद करण्यासाठीं ब्रह्मचर्य आचरा.” हीच त्या सर्वांची उपसंपदा झाली.

त्रिपिटक वाङ्‌मयांत ज्याचा प्रवेश झाला असेल, त्याला सारिपुत्त आणि मोग्गल्लान यांची थोरवी सांगण्याची आवश्यकता नाहीं. सारिपुत्तानें उपदेशिलेलीं पुष्कळ सुत्तें सुत्तपिटकांत आहेत. सेल ब्राह्मणानें, ‘आपला सेनापति कोण’ असा प्रश्न केला असतां भगवान् म्हणातो:-

मया पवत्तितं चक्कं धम्मचक्कं अनुत्तरं ।
सारिपुत्तो अनुवत्तेति अनुजातो तथागतं ।।

मीं प्रस्थापित केलेलें चक्र-श्रेष्ठ धर्मचक्र-सारिपुत्र चालवीत आहे. तथागताच्या मगोमाग जाणारा तो आहे.१ (१- सुत्तनिपात, सेलसुत्त.)

मोग्गल्लानाच्या योगसिद्धीसंबंधानें तर सुत्त आणि विनयपिटकांत अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. तेव्हां मथाळ्यावरील अवतरणांत केलेलें त्यांचें अतिसंक्षिप्त गुणवर्णन यथार्थ आहे, हें निराळें सांगणें नलगे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------          


महाकश्यप

“अत्यंत१  साधेपणानें रहाणार्‍या माझ्या भिक्षुश्रावकांत महाकाश्यप श्रेष्ठ आहे.”
वाराणसी येथील ऋषिपत्तनांत धर्मचक्राची प्रस्थापना करून व उरुवेलकाश्यपादिक बंधूंना भिक्षुसंघांत घेऊन बुद्ध भगवान् राजगृहाला आला, त्या वेळीं मगध देशांतील महातीर्थ गांवच्या एका अत्यंत धनाढ्य ब्राह्मणकुळांत महाकाश्यपाचा जन्म झाला.२  त्याचें लहानपणाचें नांव पिप्फलि असें होतें. तो वयांत आल्यावर लग्न करण्यासाठीं आईचा त्याच्या मागें तगादा लागला. आमरण ब्रह्मचर्य पाळण्याचा निश्चय व मातृप्रेम ह्यांच्या तो कचाट्यांत सांपडला. शेवटीं एका सोनाराला हजार मोहरा (निष्क) देऊन त्यानें सोन्याची एक उत्तम स्त्रीप्रतिमा बनविली, व ती वस्त्रांनीं, दागिन्यांनीं आणि फुलांनीं अलंकृत करून तो आईला म्हणाला, “अशा तर्‍हेची सुंदर स्त्री मिळेल तर मी लग्न करीन.” तशी सुस्वरूप स्त्री मिळणार नाहीं व आपणाला आमरण अविवाहित रहातां येईल असें कश्यपाला वाटत होतें. पण त्याची आई मोठी खटपटी. तिनें आठ हुशार ब्राह्मणांना तशा सुंदरीच्या शोधासाठीं देशोदेशीं पाठविलें. मद्र राष्ट्रांतील स्त्रियांच्या सौंदर्याची त्या वळीं फार ख्याति होती. तेव्हां ते ब्राह्मण प्रथमत: त्या राष्ट्रांतील शागल नगराला आले, व ती सुवर्णमूर्ती नदीकांठीं ठेवून तेथें विश्रांतीसाठी बसले. कौशिल गोत्री ब्राह्मणाच्या दासीनें त्याच्या मुलीला-भद्रेला-न्हाऊं घालून स्वत: स्नान करण्यासाठीं ती नदीवर आली. त्या सुवर्णमूर्तीला पाहून आपल्या मालकाचीच मुलगी तेथें आली असावी, असा तिला भास झाला; व ती मोठ्यानें हात उगारून म्हणाली, “अग, तुला एकटीला येथें येऊन बसण्याला लाज वाटत नाहीं काय?” ते ब्राह्मण म्हणाले, “बाई, अशा तर्‍हेची सुंदर स्त्री तरी कोण आहे?”

दासी:- अहो, ही तुमची प्रतिमा जड आहे. पण आमची भद्रा जिवंत सौंदर्याची पुतळी आहे. तिची ह्या प्रतिमेशीं कशी तुलना करतां येईल?

त्या ब्राह्मणांनीं कौशिक ब्राह्मणाच्या घरीं जाऊन ‘आम्ही काश्यपाच्या बापाकडून त्याच्या मुलाला मुलगी पहाण्यासाठीं येथें आलों आहो, व आपली मुलगी काश्यपाला पसंत पडेल. अशी आमची खात्री आहे,’ वगैरे सर्व सांगितलें. काश्यपाचा बाप कपिल ब्राह्मण पार प्रसिद्ध होता; तेव्हां अशा कुटुंबांत आपली मुलगी जाणें कौशिकाला इष्टच होतें. त्याला त्यांचें म्हणणें पसंत पडलें, व त्याप्रमाणें परस्पर कुटुंबांत पत्रव्यवहार होऊन वाङ्‌निश्चय झाला.
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- प्रत्येक अवतरणाच्या आरंभी असलेला ‘भिक्षुहो’ हा शब्द येथपासून गाळला आहे. ‘धुतवादानं यदिदं महा कस्सपो’ असें मूळ वाक्य आहे. तेरा धुतंगांचे वर्णन विशुद्धिमार्गाच्या दुसर्‍या परिच्छेदांत आहे. तरी त्रिपिटकांत प्राधान्येंकरून चार धुतंगांचा उल्लेख आढळतो. अरण्यांतच रहाणें, चिंध्याचींच चीवरें धारण करणें, तीनच चीवरें ठेवणें व आमंत्रण न स्वीकारतां भिक्षेवरच निर्वाह करणें, हीं तीं चार धुतंगे होत. महाकाश्यप आजीवन हीं धुतंगे पाळीत होता; व तीं पाळण्याविषयीं दुसर्‍या भिक्षूंना उपदेश करीत होता. म्हणून साधेपणानें वागणार्‍या भिक्षूंत त्याला अग्रस्थान मिळालें.
------------------------------------------------------------------------------------------------------------
२- भगवान् बुद्ध होऊन राजगृह येथें आला, तेव्हां त्याचें वय कमींत कमी सदतीस वर्षांचें असलें पाहिजे. मनोरथपूरणीच्या म्हणण्याप्रमाणें महाकाश्यपाचा जन्म ह्या वेळीं झाला असें जर गृहीत धरलें, तर भगवंताच्या परिनिर्वाणसमयीं महाकाश्यपाचें वय त्रचाळीस वर्षांचें असलें पाहिजे. एवढ्या तरुणपणीं राजगृह येथें भरलेल्या पहिल्या संगीतीचा (सभेचा) त्याला अध्यक्ष नेमण्यांत आलें, हें संभवत नाहीं. दुसरा एक मनोरथपूरणीच्या विरुद्ध बळकट पुरावा सांपडतो. कस्सपसंयुत्ताच्या पांचव्या सुत्तांत भगवान् कस्सपाल म्हणतो, “कस्सप, आतां तूं म्हातारा झाला आहेस. हीं तागाचीं पांसुकूलें (चिंध्यांचीं वस्त्रें) धारण करणें तुला आतां जड जाईल.” त्रेचाळीस वर्षांच्या वयापूर्वी बुद्धकाळीं तरी मनुष्य म्हातारा होत नसला पाहिजे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel