त्या काळीं कांही भिक्षु साकेत नगराहून श्रावस्तीला जात होते. वाटेंत चोरांनीं त्यांचीं चीवरें हिरावून घेतलीं. तेव्हां ते भिक्षु अज्ञाति गृहपतीकडे किंवा गृहपत्नकडे चीवर मागणें योग्य नाहीं म्हणून नागवेच श्रावस्तीला आले; व वृद्ध भिक्षूंनां नमस्कार करूं लागले. भिक्षु म्हणाले, “भिक्षूंला नमस्कार करणारे हे आजीवक फार चांगले दिसतात.” ते म्हणाले, “आम्हीं आजीवक नसून भिक्षु आहोंत.” भिक्षूंनीं उपालीला ह्या प्रकरणीं चौकशी करण्यास सांगितलें. उपालीनें, ते भिक्षु आहेत अशी खात्री करून घेऊन त्यांना चीवरें द्यावयास लावलीं. ते नागवेच आले हें सज्जन भिक्षूंला आवडलें नाहीं. ते म्हणाले, “हे नागवे येतात हें कसें? ह्यांनी तृणपर्णानें तरी आपली लज्जा झांकावी कीं नाहीं!” ही गोष्ट भगवंताला कळविली, तेव्हां तो म्हणाला, “भिक्षुहो, ज्याचें चीवर हिरावून घेतलें असेल किंवा नष्ट झालें असेल, त्यानें अज्ञाति गृहपतीकडून किंवा गृहपत्नीकडून चीवर घ्यावें. ज्या आवासांत तो प्रथम येईल तेथें संघाचें, विहाराचें, बिछान्यावर आंथरण्याचें, जमिनीवर आंथरण्याचे चीवर किंवा बिछान्याची पिशवी घेऊन पुन्हां परत करीन अशा हेतूनें वापरावी. ह्यांपैकीं कांहीं मिळत नसल्यास गवत किंवा पानें नेसून यावें. परंतु नागवें कधींच येऊं नये.” आणि त्यानें वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

जो भिक्षु प्रसंगावांचून अज्ञाति गृहपतीकडे किंवा गृहपत्नीकडे चीवर मागून घेईल त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें. तो प्रसंग असा:- भिक्षूचें चीवर हिरावून घेण्यांत येतें किंवा नष्ट होतें, हा प्रसंग ।।६।।

२६. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवानांत अनाथ पिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं कांही भिक्षूंची चीवरें हिरावून घेण्यांत आलीं होतीं. त्यांनी जपाशीं जाऊन षड्वर्गीय भिक्षु म्हणाले, “भगवंतानें चीवरें हिरावून घेतली असतां अज्ञाति गृहपति किंवा गृहपत्नी यांजकडून चीवर मागून घेण्यास परवानगी दिली आहे. तेव्हां तुम्हीं चीवरें मागून घ्या. ते म्हणाले, “आम्हांला चीवरें मिळालीं आहेत.” षड्वर्गीय म्हणाले, “तुम्हांला जर मागावयाचीं नसलीं तर आम्ही तुमच्या करितां मागतों.” ते म्हणाले, “ठीक आहे.” तेव्हां षड्वर्गीय भिक्षूंनीं लोकांकडून पुष्कळ चीवरें घेतलीं. एका सभेंत एक मनुष्य दुसर्‍याला म्हणाला, “ज्यांचीं चीवरें हिरावून घेण्यांत आलीं होतीं असे भिक्षु मजकडे आले होते; त्यांना मीं चीवरें दिलीं.” दुसराहि तसेंच म्हणाला. तिसराहि तसेंच म्हणाला. आणि ते सर्व म्हणाले कीं, हे शाक्यपुंत्रीय श्रमण प्रमाण न जाणता पुष्कळ चीवरें घेतात हें कसें? हे काय कापडाचें दुकान मांडणार आहेत की काय? अशा रितींने झालेली टीका भिक्षूंच्या कानीं आली. भगवंतानें हें वर्तमान ऐकून षड्वर्गियांचा निषेध केला, व भिक्षूंला नियम घालू दिला तो असा:-

तशा भिक्षूला अज्ञाति गृहपति किंवा गृहपत्नी पुष्कळ चीवरें आणून तीं घेण्याची विनंती करील; पण त्यानें अंतरवासक आणि उत्तरासंग एवढीं दोनच चीवरें घ्यावीं; त्यापेक्षां जास्त घेईल तर त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।७।।

२७. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथ पिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं एक पुरुष आपल्या बायकोला म्हणाला, “मी आर्य उपनंदाला चीवरानें आच्छादणार आहें.” त्याचें बोलणें एका पिंडचारिक भिक्षूने ऐकलें; व तो उपनंदाला म्हणाला, “आयुष्मान्, तूं धन्य आहेस. अमक्या घरांत रहाणारा पुरुष आपल्या बायकोला म्हणतो कीं, मी आर्य उपनंदाला चीवराने आच्छादणार आहें.”  उपनंद म्हणाला, “आयुष्मान्, तो माझा उपस्थायक आहे.” तो त्या पुरुषापाशीं जाऊन त्याला म्हणाला, “मला तूं चीवरानें आच्छादणार आहेस हे खरें काय?” त्याने ‘होय’ असें उत्तर दिलें. तेव्हां उपनंदानें अशा अशा प्रकारचें चीवरवस्त्र तयार करून दे असें सांगितलें. तेव्हां त्यानें उपनंदावर टीका केली. हें वर्तमान समजलें, तेव्हां भगवंतानें उपनंदाचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

ह्या चीवरद्रव्यानें चीवर तयार करून, अमूक भिक्षूला त्यानें मी अच्छादीन अशा उद्देशानें अज्ञाति गृहपतीनें किंवा गृहपत्नीनें चीवरद्रव्य गोळा केलेलें असतें. अनधीष्ट भिक्षु तेथें जाऊन, आयुष्मान्, पुण्यबुद्धि धरून ह्या चीवरद्रव्यानें अशा अशा प्रकारचें चीवरवस्त्र तयार करून मला आच्छादन कर, असें म्हणून विशिष्ट वस्त्राची आवड दर्शवील, तर त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।८।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel