राहुल म्हणाला, “भगवन्, रूपच तेवढें आपला आत्मा नाहीं, असें जाणावें काय?”

भगवान् :-  राहुल, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञानहि असेंच समजावें.

भगवंतानें उपदेश केला असतां, ‘आज कशाला भिक्षेला जा,’ असा विचार करून राहुल श्रावस्तींत न जातां बाहेरच एका झाडाखालीं बसला. त्याला पाहून सारिपुत्त म्हणाला, “राहुल आनापानस्मृतीची (प्राणायामाची) भावना वृद्धिगंत केली असतां फार फायदेशीर होते.”

संध्याकाळीं तेथून उठून राहुल भगवंतापाशीं गेला, आणि ‘आनापानस्मृतीची भावना कशी करावी?’ असा त्यानें भगवंताला प्रश्न केला. भगवान् म्हणाला, “पूर्वजन्मींच्या कर्मापासून उत्पन्न झालेले केशलोमादिक कठीण शरीरावयव ही आध्यात्मिक पृथ्वीधातु आहे. आध्यात्मिक पृथ्वीधातु काय कीं बाहेरची पृथ्वीधातु काय, सर्व सारखीच. ती माझी नाहीं, ती मी नाहीं, ती माझा आत्मा नाहीं, हें प्रज्ञेनें यथार्थतया जाणावें. राहुल, पित्तश्लेष्मादिक आध्यात्मिक आपोधातु काय, कीं बाहेरची आपोधातु काय, ती सर्व सारखीच. ती माझी नाहीं, ती मी नाहीं, ती माझा आत्मा नाहीं, हें प्रज्ञेनें यथार्थतया जाणावें. अन्नाचें पचन करणारी, दाह करणारी इत्यादी आध्यात्मिक तेजोधातु काय कीं बाहेरची तेजोधातु काय... श्वासोच्छ्वासादिक आध्यात्मिक वायुधातु काय कीं बाहेरची वायुधातु काय... आध्यात्मिक आकाशधातु काय, कीं बाहेरची आकाशधातु काय, ती सर्व सारखीच. ती माझी नाहीं, ती मी नाहीं, ती माझा आत्मा नाहीं, हें प्रज्ञेनें यथार्थतया जाणावें.

“राहुल, पृथ्वीसमान मनाची भावना कर. पृथ्वीवर लोक शुचि आणि अशुचि पदार्थ फेंकीत असतात; पण त्यायोगें पृथ्वी कंटाळत नाहीं. ह्याप्रमाणें मनाची भावना केली असतां तुझ्या मनावर अनिष्ट स्पर्शाचा आघात व्हावयाचा नाहीं. पाण्याप्रमाणें मनाची भावना कर. पाण्यांत लोक शुचि आणि् अशुचि पदार्थ धूत असतात... अग्नीप्रमाणें मनाची भावना कर. शुचि आणि अशुचि पदार्थ अग्नि सारखेच जाळीत असतो... वायूसारखी मनाची भावना कर. शुचि आणि अशुचि पदार्थांवर वायु सारखाच वहात असतो; पण त्यायोगें तो कंटाळत नाहीं... आकाशाप्रमाणें मनाची भावना कर. आकाश कशांतच संलग्न होत नाहीं. ह्याप्रमाणें भावना केली असतां तुझ्या मनावर अनिष्ट स्पर्शाचा आघात व्हावयाचा नाहीं.

“राहुल, मैत्रीची भावना कर. मैत्रीची भावना केली असतां तुझी द्वेषबुद्धि नष्ट होईल. करुणेची भावना कर. करुणेची भावना केली असतां तुझी त्रासदायक बुद्धि नष्ट होईल. मुदितेची भावना कर. मुदितेची भावना केली असतां तुझी असंतोषबुद्धि नष्ट होईल. उपेक्षेची भावना कर. उपेक्षेची भावना केली असतां तुझी प्रत्याघातबुद्धी नष्ट होईल. अशुभाची १ (१- अशुभभावना म्हणजे शरीरांतील अस्थिमांसादिक अमंगल पदार्थांचें चिंतन करून चित्ताची एकाग्रता साधणें. बुद्ध, धर्म आणि संघ पृ.३८ पहा.) भावना कर. अशुभाची भावना केली असतां तुझा कामविकार नष्ट होईल. अनित्यतेची भावना कर. अनित्यतेची भावना केली असतां तुझा अहंकार नष्ट होईल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel