५३
किसा गोतमी

“रुक्षचीवर धारण करणार्‍या भिक्षुणीश्राविकांत किसा गोतमी श्रेष्ठ आहे.”

ही श्रावस्ती येथें एका गरीब कुटुंबांत जन्मली. वयांत आल्यावर तिचें लग्न झालें, पण ती गरीब कुळांतील मुलगी म्हणून तिची सासरीं अवहेलना होत असे. कांहीं काळानें तिला एक मुलगा झाला, व त्यामुळें तिची प्रतिष्ठा होऊं लागली. मुलगा मोठा होऊन इकडे तिकडे नाचूं उडूं लागला, तोंच एकाएकी कांहीं रोग होऊन मरण पावला. तेव्हां ती अत्यंत शोकाकुल होऊन, ‘ह्याला कांहीं औषध द्या, ह्याला कांहीं औषध द्या’ असें म्हणत इकडे तिकडे फिरूं लागली; व ‘मेलेल्याला औषध कोणतें’ असें म्हणून लोक तिची थट्टा करूं लागलें. पण त्यामुळें ती ताळ्यावर न येतां अधिकाधिकच वेडी होत गेली. तेव्हां एक शहाणा मनुष्य तिला म्हणाला, “ह्या समोरच्या विहारांत भगवान् बुद्ध रहात आहे. त्याजकडे जाऊन तूं तुझ्या मुलाला औषध विचार.” तिला तें खरें वाटून ती भगवंतापाशीं गेली व औषध मागूं लागली.

भगवान् म्हणाला, “औषधासाठीं मजपाशीं आलीस, हें तूं चांगलें केलेंस. तूं शहरांत जा, आणि ज्या घरांत कोणाचा आप्तइष्ट मरण पावला नसेल, त्यांच्याकडून थोडे मोहोरीचे दाणे घेऊन ये.” ती संतुष्ट होऊन शहरांत गेली, व ज्याच्या त्याच्याकडे मोहोरीचे दाणे मागूं लागली. लोक तिला दाणे देऊं लगाले. पण ती म्हणे, “तुमच्या घरच्या माणसांचा कोणी आप्तइष्ट मेला नाहीं ना?” अग गोतमी, हें तूं काय बोलतेस?  येथें जिवंतांपेक्षा मेलेलींच माणसें ज्यास्ती, असें लोक म्हणत. तेव्हां ती दाणे न घेतां दुसर्‍या घरीं जाई. ह्याप्रमाणें पुष्कळ घरें फिरल्यावर ‘हाच जगाचा नियम आहे’ असें जाणून व मुलाचें प्रेत स्मशानांत फेंकून देऊन ती आपणाशींच म्हणाली, “अनित्यता (मरण) हा गांवाचा किंवा शहराचा स्वभाव नव्हे, किंवा एका कुळाचाहि नव्हे. देवलोकासह सर्व जगताचा हाच धर्म आहे.” १
------------------------------------------------------------------------------------------------------------
१ मूळ गाथा अपदानांत आहे व ती मनोरथपूरणींत घेतली आहे. ती अशी :-
न गामधम्मो नो निगमस्स धम्मो ।
न चापयं एककुलस्स धम्मो।।
सब्बस्स लोकस्स सदेवकस्स ।
एसो व धम्मो यदिदं अनिच्चता ।।

------------------------------------------------------------------------------------------------------------
भगवंतापाशीं आल्यावर त्यानें तिला धर्मोपदेश केला, व ती भिक्षुणी झाली.

भिक्खुनीसंयुत्तांत माराबरोबर झालेल्या तिच्या संवादाची हकीकत आहे. तिचा सारांश असा :-

सकाळच्या प्रहरीं किसा गोतमी श्रावस्तींत भिक्षाटन करून जेवण झाल्यावर विश्रांतीसाठीं अंधवनांत जाऊन एका झाडाखालीं बसली. तिला भय आणि लोमहर्ष उत्पन्न करण्याच्या उद्देशानें आणि समाधीपासून च्युत करण्याच्या उद्देशाने मार तेथें आला आणि म्हणाला, “काय ग, मेलेल्या पुत्राच्या आईसारखी दिसतेस. तुझें तोंड रडवें दिसतें. येथें अरण्यांत एकटी कशाला बसतेस? कोणी पुरुषाला कशाला शोधीत नाहींस?”

किसा गोतमी म्हणाली, “खात्रीनें माझा मुलगा मेला आहे. सर्व पुरुषांची गति हीच होणार आहे. म्हणून मी शोकहि करीत नाहीं आणि रडतहि नाहीं; आणि, बा मारा, तुला घाबरतहि नाहीं. सर्व ठिकाणीं माझ्या तृष्णेचा नाश झाला आहे, अंधकारराशीचा विध्वंस झाला आहे, मृत्यूच्या सेनेवर जय मिळवून मी अर्हत्पद मिळविलें आहे.”

आपणाला किसा गोतमीनें ओळखलें, असें जाणून दुःखित अंतःकरणानें मार तेथेंच अंतर्धान पावला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel