३०.बुद्ध भगवान् आळवी येथें अग्गाळव चैत्यांत रहात होता. त्या काळी षड्वर्गीय भिक्षु रेशीमवाल्यांजवळ जाऊन म्हणत असत कीं, तुम्ही पुष्कळ कोसले उकळतां. तेव्हां अम्हांलाहि त्यापैकीं थोडे द्या. आम्ही ते आमच्या आंथरूणासाठीं उपयोगांत आणूं. ते रेशीमवाले भिक्षूंवर टीका करूं लागले; व हें वर्तमान भगवंताला समजलें. तेव्हां त्यानें नियम घालून दिल तो असा:-

जो भिक्षु रेशीम मिसळलेलें आंथरूण बनवील त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।११।।

३१. बुद्ध भगवान् वैशाली येथें महावनांत कूटागारशाळेंत राहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु शुद्ध लोंकरीचें आंथरूण करवीत असत. लोकांत त्यांच्यावर टीका होऊं लागली. हे शाक्यपुत्रीय श्रमण चैनी गृहस्थांप्रमाणें शुद्ध काळ्या लोंकरीचें आंथरूण बनवितात हें कसें? हें वर्तमान भगवन्ताला समजलें तेव्हां त्यानें त्यांचा निषेध करून भिक्षूंला नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु शुद्ध काळ्या लोंकरीचें आंथरुण बनवील त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।१२।।

३२. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं भगवंतानें शुद्ध काळ्या लोंकरीचें आंथरूण बनविण्यास मनाई केली आहे. म्हणून षड्वर्गीय भिक्षु थोडीशी पांढरी लोंकर मिसळून शुद्ध काळ्या लोंकरीचें हांथरूण बनवीत असत. ही गोष्ट सज्जन भिक्षूंना आवडली नाहीं; व त्यांनीं ती भगवंताला कळविली. तेव्हां षड्वर्गियांचा निषेध करून भगवंतानें भिक्षूंला नियम घालून दिला तो असा:-

नवीन आंथरूण करविणार्‍या भिक्षूनें शुद्ध काळ्या लोंकरीचे दोन भाग घ्यावे. तिसरा भाग पांढर्‍या लोंकरीच्या व चौथा भाग पिंगट लोंकरीचा घ्यावा. जो भिक्षु दोन भाग शुद्ध काळ्या लोंकरीचे न घेतां तिसरा भाग पांढर्‍या लोंकरीचा व चौथा भाग पिंगट लोंकरीचा घेतां आंथरुण बनविल त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें. ।।१३।।

३३. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतावनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं भिक्षु दरवर्षी नवीन आंथरूण करीत असत; व त्यामुळें लोंकर मागत फिरण्याचा त्यांजवर प्रसंग येत असे. लोक त्यांच्यावर टीका करूं लागले व हें वर्तमान समजल्यावर भगवंतानें त्यांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:- “भिक्षूनें नवीन आंथरुण सहा वर्षे वापरावें. सहा वर्षांपूर्वी आंथरुण टाकून किंवा न टाकतां दुसरें नवीन आंथरूण बनवील तर त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें.”

त्या काळीं कौशांबी येथें एक भिक्षु आजारी होता. त्याचा आम्ही सांभाळ करीत असें म्हणून त्याच्या ज्ञातिबांधवांनीं त्याजकडे माणूस पाठविला. भिक्षुहि त्यांला म्हणाले कीं, तूं आपल्या ज्ञातिबांधवांकडे जा; ते तुझी सेवा करतील. तो म्हणाला, “नवीन आंथरूण सहा वर्षे वापरावें असा भगवंतानें नियम घालून दिला आहे. परंतु मी आजारी असल्यामुळें आंथरूण बरोबर घेऊन जातां येत नाहीं; व आंथरूणावाचून मला बरें वाटत नाहीं. म्हणून मी जात नाहीं.” भगवंताला हें वर्तमान समजलें. तेव्हां संघाच्या संमतीनें आजारी भिक्षूस नवीन आंथरूण वापरण्यास त्यानें परवानगी दिली; व वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

भिक्षूनें नवीन आंथरूण सहा वर्षे वापरावें. संघाच्या संमतीवांचून सहा वर्षांपूर्वी तें आंथरूण टाकून किंवा न टाकतां दसुरें नवीन आंथरूण बनवील, तर त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।१४।।


३४. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. तेथें भगवान् भिक्षूंस म्हणाला, “मी तीन महिनेपर्यंत एकांतांत राहूं इच्छितो. भिक्षा घेऊन येणार्‍या भिक्षूशिवाय दुसर्‍या कोणीहि मजपाशीं येऊं नये. त्याप्रमाणें भिक्षंनीं नियम केला कीं, भिक्षा घेऊन जाणार्‍या भिक्षूशिवाय दुसर्‍या कोणीहि भगवंतापाशीं जाऊं नये; जो जाईल त्यानें पाचित्तिय आपत्ति कबूल करावी.

आयुष्मान् उपसेन वंगंतपुत्त आपल्या साथ्यांसहवर्तमान भगवंताजवळ आला, आणि नमस्कार करून एका बाजूला बसला. आंगतुक भिक्षूंबरोबर संभाषण करण्याची बुद्ध भगवंताची वहिवाट असे. तिला अनुसरून भगवान् उपसेनाला म्हणाला, “उपसेन, तुमचें ठीक चाललें आहे ना? तुमचा प्रवास त्रासदायक झाला नाहीं ना?” “होय. भगवान्, आमचें ठीक चाललें आहे. आमचा प्रवास त्रासदायक झाला नाहीं,” असें उपसेनानें उत्तर दिलें. त्याचा एक शिष्य भगवंतापासून कांही अंतरावर बसला होता. त्याला भगवान् म्हणाला, “तुझीं ही पांसुकूल१  चीवरें तुला आवडतात काय?” तो म्हणाला, “नाहीं भदंत, मला तीं आवडत नाहींत.” भ.-“तर तूं पांसुकूल चीवरें कां वापरतोस?” –“माझा उपाध्यय पांसुकूलिक आहे म्हणून मीहि पांसुकूलिक आहें.”
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- पांसुकूल चीवरें म्हणजे धुळींत, स्मशानांत वगैरे ठिकाणीं पडलेल्या चिंध्या गोळा करून त्यांची बनविलेली भिक्षुवस्त्रें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel