वर्षावास (चातुर्मास्य)

४२. बुद्ध भगवान् राजगृह येथील वेळुवनांत रहात होता. त्या काळी भगवंतानें वर्षाकाळांत भिक्षूंनीं एका ठिकाणीं रहावें असा नियम केला नव्हता. भिक्षु हिंवाळ्यांतहि, उन्हाळ्यांतहि आणि पावसाळ्यांतहि धर्मोपदेश करीत फिरत असत. पण त्यांच्या त्या कृत्यांवर लोक टीका करूं लागले. पावसाळ्यांत इकडे तिकडे हिंडून हे भिक्षु ओलें गवत तुडवतात, व त्यायोगें पुष्कळ बारीकसारीक प्राण्यांचा नाश होतो असें ते म्हणूं लागले. ही गोष्ट भगवंताला समजली तेव्हां भिक्षूंनीं वर्षाकाळीं एकाच ठिकाणी रहावें असा त्यानें नियम केला. कोणत्या दिवशीं वर्षांवासाला सुरवात व्हावी अशी भिक्षूंना शंका आली. तेव्हां भगवंतानें, आषाढी पौर्णिमेच्या दिवशी पहिल्या वर्षावासाला व आषाढी पौर्णिमेनंतर एका महिन्यानें दुसर्‍या वर्षावासाला सुरवात व्हावी असा नियम केला. वर्षावासाला सुरवात झाल्यानंतर भिक्षूनें तीन महिने एका ठिकाणीं राहिलें पाहिजे. पण त्याला कांहीं अपवाद आहेत ते असे:- एखादा श्रद्धापूर्ण उपासक किंवा उपासिका कांही दानधर्म करीत असली तर सात दिवसांच्या मुदतीनें त्याच्या किंवा तिच्या आमंत्रणावरून तिकडे जावें. भिक्षु, भिक्षुणी, आईबाप वगैरे आजारी असतील तर सात दिवसांच्या मुदतीनें त्यांस भेठावयास जावें.

प्रवारणा

४३. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथ पिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं कांही भिक्षु कोसल राष्ट्रांत एका आवासांत वर्षावासासाठीं राहिले. आपण वादविवाद उपस्थित झाल्यावांचून एकमतानें वर्षावास कसा घालवूं व आपणांस भिक्षेची पंचाईत कशी पडणार नाहीं ह्यासंबंधानें ते विचार करूं लागले. शेवटीं त्यांनीं असा नियम केला कीं, ह्या वर्षाकाळांत कोणी काणाशीं संभाषण करूं नये. जो भिक्षाटण करून प्रथम विहारांत येईल त्यानें आसनें मांडावी; पाय धुण्याचें पाणी व पाट ठेवावा; उरलेले अन्न काढून ठेवण्याचें ताट धुवून ठेवावें; पिण्याचें आंचवण्याचें पाणी तयार ठेवावें. जो सर्वांच्या शेवटीं भिक्षाटन करून येईल त्यानें शिल्लक राहिललेल्या अन्नापैकीं अन्न पाहिजे तर घ्यावें, नको असल्यास जेथें हिरवें गवत नसेल तेथें किंवा पाण्याच्या प्रवाहांत तें टाकावें. त्यानें आसनें गोळा करावीं, पाय धुण्याचें पाणी, पाट वगैरे काढून बाजून ठेवावे; शिल्लक राहिलेलें अन्न ठेवण्याचें ताट धुवून ठेवावें; पिण्याचें पाणी व आंचवण्याचें पाणी पूर्वींच्या जागीं ठेवावें; व जेवण्याची जागा झाडून साफ करावी. जो पिण्याच्या पाण्याचा, वापरण्याच्या पाण्याचा किंवा पायखान्यांतील पाण्याचा घडा रिकामा पाहील, त्यानें तो भरून ठेवावा. तो एकट्याला उचलतां येणें शक्य नसल्यास दुसर्‍याला खुणेनें बोलावून मदत करावयसा लावावी; परंतु शब्द उच्चारूं नये. ह्याप्रमाणे आपण वादविवाद केल्यावांचून एकीनें राहूं व आपणांस भिक्षेची कमतरता पडणार नाहीं, असे त्यांस वाटलें.

४४. वर्षाकाल संपल्यावर बुद्ध भगवंताच्या दर्शनास जाण्याची भिक्षूंची वहिवाट असे. त्याप्रमाणें हे भिक्षुहि श्रावस्ती येथें भगवंताच्या दर्शनाला आले. आपल्या भेटीला आलेल्या भिक्षूंना कुशलसमाचार विचारावा असा बुद्ध भगवंताचा परिपाठ होता. म्हणून तो भिक्षूंना म्हणाला, “भिक्षुहो, तुमचें कसें काय चाललें आहे? तुम्ही सामग्रीनें, प्रेमानें व विवाद केल्यावांचून वर्षाकाल सुखानें घालविला ना? जेवणाखाण्याचा तुम्हांला त्रास पडला नाहीं ना?” त्या भिक्षूंनीं, ‘आपण मोठ्या आनंदानें वर्षाकाल घालविला’ असे उत्तर दिलें. पण तथागतांची चाल अशी आहे कीं, जाणत असतांहि ते प्रश्न विचारितात, जाणत असतांहि विचारीत नाहींत, काळवेळ पाहून विचारतात, काळवेळ पाहून विचारीत नाहींत, लाभदायक प्रश्न विचारतात, हानिकारक प्रश्न विचारीत नाहींत; कांकीं, हानिकारक गोष्टींपासून तथागत फार दूर रहातात. ते दोन कारणासाठी प्रश्न विचारतात. धर्मोपदेश करण्याच्या उद्देशानें किंवा श्रावकांना नवीन नियम घालून देण्याच्या उद्देशानें. म्हणून भगवान् त्या भिक्षूंना म्हणाला, “ तुम्हीं सामुग्रीनें आणि आनंदानें वर्षाकाल कसा घालविला ते सांगा.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel