भाग २ रा

प्रतिबंधक नियम.

चार पाराजिका

१.बुद्ध भगवान् वैरंजा येथें पांचशें भिक्षूंच्या मोठ्या संघासह नळेरुपिचुमंद वृक्षाखालीं रहात होता. त्याची कीर्ति ऐकून वेरंज ब्राह्मण तेथें आला, व कुशल प्रश्नादिक विचारून त्याला म्हणाला, “भो गौतम, तुम्ही बुद्ध ब्राह्मणांना नमस्कार वगैरे करून मान देत नसतां असें मी ऐकतों. हें तुमचें वर्तन मला योग्य वाटत नाहीं.” बुद्ध म्हणाला, “इहलोकीं ज्याला नमस्कार करून तथागतानें मान द्यावा असा मनुष्य मला आढळत नाहीं.” थोडा संवाद झाल्यावर आपल्या वडीलपणाबद्दल बुद्धानें एक उपमा सांगितली, ती अशी-“एकाद्या कोंबडीनें दहा बारा अंडीं घातलीं असलीं व त्यांतून पिलें निघालीं; त्यांत जे प्रथमत: आपल्या प्रयत्नानें अंड्यांतून बाहेर निघेल त्याला ज्येष्ठ म्हणता येईल कीं नाही?” ब्राह्मणानें ‘होय’ असें उत्तर दिल्यावर बुद्ध म्हणाला, “अविद्येच्या अंडकोशांत गुरफटून गेलेल्या लोकांतून मी प्रथमत: बाहेर निघालों आहे आणि म्हणूनच मी ज्येष्ठ आहें.” बुद्धाच्या ह्या संवादानें वेरंज ब्राह्मण प्रसन्न झाला व वर्षाकाळ वैरंजा येथें घालविण्यास त्यानें बुद्धाला विनंति केली.

त्या काळी वैरंज येथें दुष्काळ पडला होता. उत्तर देशांतून घोड्यांचा व्यापार करणारे पांचशें घोडे घेऊन वर्षाकाळासाठीं वैरंजा येथें राहिले होते. त्यांनीं आपल्या कंपूंत भिक्षूंना प्रत्येकीं अर्धाशेर उकडून सडलेले जवस देण्याचा नियम केला होता. भिक्षु ते जवस आणून उखळांत कुटून खात असता. भगवंतासाठीं जे जवस मिळत ते पाट्यावर वाटून आनंद भगवंताला देत असे. भगवंतानें मुसळाचा शब्द ऐकून आनंदाला विचारलें कीं, हें काय आहे? आनंदानें भिक्षु जवस कुठून खात असतात असें सांगितलें. तेव्हां भगवान् म्हणाला, “आनंद, शाबास! तुम्ही सत्पुरुष आहां; पण पुढें असे भिक्षु होणार आहेत कीं, ते उत्तम अन्नाचीहिं पर्वा करणार नाहींत.”

एके दिवशीं आयुष्मान् सारिपुत्त बुद्धाजवळ आला आणि हात जोडून म्हणाला, “भदंत आतां भिक्षूंना प्रतिबंधक नियम घालून देण्याची वेळ आली आहे. त्यायोगें ब्रह्मचर्य चिरस्थायी होईल.” बुद्ध म्हणाला, “सारिपुत्रा, तूं दम धर. प्रतिबंधक नियम करण्याचा समय कोणता हें तथागतालाच माहीत आहे. संघांत पापधर्म जोंपर्यंत शिरले नाहींत तोंपर्यंत तथागत तन्निवारक नियम करीत नाहीं. संघस्थापनेला बराच काळ लोटल्यावांचून, संघाचा विस्तार मोठा झाल्यावांचून, संघाचा लाभ मोठा झाल्यावांचून, संघांत पांडित्याचा प्रसार झाल्यावांचून, त्यांत पापधर्माचा प्रवेश होत नसतो. सध्यां संघ पापधर्मापासून मुक्त आहे, व शुद्ध आहे.” तो वर्षाकाळ संपल्यावर भगवान् आनंदाला म्हणाला, “हे आनंद, तथागतांची अशी वहिवाट आहे कीं, वर्षाकाळासाठीं ज्यानें आमंत्रण दिलें त्यांना भेटल्यावांचून दुसरीकडे जावयाचें नाहीं. तेव्हां चल, आपण वेरंज ब्राह्मणाला भेटावयाला जाऊं.” ते दोघे वेरंज ब्राह्मणाच्या घरीं गेले. भगवंताला आमंत्रण करून सर्व वर्षाकाळभर त्याची चौकशी केली नाहीं ह्याबद्दल वेरंज ब्राह्मणाला पश्चाताप झाला. त्यानें भगवंताला भिक्षुसंघासह निमंत्रण करून उत्तम भोजन दिलें. तेथून भगवान् अनुक्रमे ..रेय्य, संकस्स, कण्णकुज्ज येथून पयागपतिठ्ठान येथें गंगानदी उतरून वाराणसीला आला; व तेथें कांहीं काळ राहून वैशालीला आला.

वैशाली जवळच कलंदक नांवाचा गांव होता. तेथें सुदिन्न नांवाचा श्रेष्ठिपुत्र रहात असे. कांहीं कारणास्तव आपल्या मित्रांबरोबर तो वैशालीला आला; व तेथें एका सभेंत बुद्धाचा धर्म ऐकून त्याला प्रपंचाविषयीं विरक्ति उत्पन्न झाली. पण आईबापांच्या परवानगीशिवाय त्याला भिक्षु होतां येत नाहीं असें बुद्धानें सांगितलें. तेव्हां घरीं जाऊन सुदिन्नानें आईबापांची परवानगी मागितली. पण त्यांनीं ती दिली नाहीं. सुदिन्न उघड्या जमिनीवर उपाशीं पडून राहिला. जर आपणाला परवानगी मिळाली तरच येथून उठेन, नाहींतर येथेंच मरेन असें तो म्हणाला. अशा रीतीनें त्यानें सात जेवणें टाळलीं. तेव्हां निरुपाय होऊन आईबापांनीं भिक्षु होण्याची त्याला परवानगी दिली, व तो वैशालीला येऊन भिक्षु झाला, आणि मोठ्या उत्साहानें वागूं लागला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel