“त्याने कधी पाठवले नाही. माझ्या कविता तो फाडी. जगात असेच आहे ! आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो आपल्यावर करतोच असे नाही. जगात ओढाताण आहे. दोघाही जीवांचे परस्परांवर प्रेम असणे ही एक दुर्मिळ वस्तू आहे; नाही?”

“परंतु आपल्याला प्रेम करायला कोणी मिळाले यातच आपण कृतार्थता मानावी. प्रेमाची हुरहूर, प्रेमाच्या वेदना म्हणजे अमोल ठेवा वाटतो. ज्याच्यासाठी हृदय रडत असेल, डोळे ओले होत असतील, प्राण कासावीस होत असतील, असा कोणीतरी मिळणे म्हणजे भाग्य, नाही?”

“परंतु तो आपणास झिडकारीत असेल.”

“झिडकारू दे. खरे प्रेम निरपेक्ष असते. ते शेवटी काही मागत नाही. ते मुके असते. प्रिय वस्तूच्या आनंदात समाधान मानते व स्वत:चे दु:खही शेवटी विसरते. तो सुखी असो, असे ते प्रेम म्हणत राहाते.”

“तुम्ही कोणावर केले आहे प्रेम?”

“तुम्हांला काय वाटते?”

“मी काय सांगू?”

“माझे डोळे बघा. कसे दिसतात?”

“कसे म्हणजे?”

“कोठे तरी ते भरपूर प्रेम प्यायले आहेत असे दिसतात का? माझे डोळे प्रेमळ आहेत का कठोर आहेत?”

“मला ते काही समजत नाही. मी प्रेमाच्या जगात फार वावरल्ये नाही. प्रेमाच्या समुद्रात खोल जाण्याचे धैर्य मला कधी झाले नाही. उदयवर माझे प्रेम होते. परंतु त्याच्यासाठी घरदार सोडावे, आईबाप सोडावे असे मला वाटले नाही. उदयवर माझे थोडेसे प्रेम आहे असे कळताच बाबांनी झटपट माझे लग्न लावून टाकले. आणि मी आता एकाची पत्नी झाल्ये. आता संसार करायचा. राहायचे. मी साधी मुलगी आहे. जे मिळाले तेच आता गोड करून घ्यायचे.”

एकाएकी सरलेचे डोळे भरून आले. तिने तोंड फिरविले. ती खिडकीतून बाहेर पाहू लागली. तिने अश्रू पुसले. ती गंभीर झाली.

“काय झाले हो?”

“काही आठवणी आल्या.”

“तुम्ही दु:खी आहात. खरे ना?”

“जगात सुखी कोण आहे?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel