“त्या कवीच्या मनात असा झगडा चालतो. आणि रात्र संपत येते. तो त्रस्त झालेला असतो. आता उजाडते. प्रकाश पसरतो. रस्त्यातून मुले हातांत फुले घेऊन जात असतात. तो कवी दारात उभा राहतो. ती आनंदी मुले तो पाहतो. ती फुले पाहतो. त्याला सारे जीवन एकदम सुंदर वाटते. मरणाचे विचार जातात. जगावे असे त्याला वाटते.
“बंधूंनो, त्या लहान फुलांमध्ये त्या कवीच्या मनात क्रांती करण्याची शक्ती होती. अशी ही फुले म्हणजे प्रभूच्या मूर्तीच नाहीत का? पवित्र, निर्मळ, सुंदर सुगंधी मूर्ती ! म्हणून माझे तुम्हाला सांगणे आहे की मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह नको. तुम्ही या विश्वमंदिरातील नाना रूपांनी प्रकट होणार्‍या विश्वंभराची पूजा करा. सत्याग्रह इतर गोष्टींसाठी आपण करू. इतर अन्याय का थोडे आहेत? तेथे झगडू. तरीही हा सत्याग्रह करायचाच असे तुमचे ठरले तर त्यात मलाही घ्या. सनातनींनी दगड मारले तर ते मलाही लागू देत. त्यांची लाठी या माझ्या डोक्यावरही पडू दे. पोलिसांचा दंडुका बसू दे. किंवा त्यांची गोळी या छातीत घुसू दे. मी तुमचा आहे. मला तुमचा माना. परका नका समजू. तुम्हाला समाजात सन्मानाचे स्थान मिळो. तुमचा उत्कर्ष व उध्दार होवो. तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे यात शंका नाही. कारण खरी जागृती तुमच्यात आली आहे. आणि तीच महत्वाची गोष्ट आहे. ही जागृती वाढो. आणि तुमचे ग्रहण सुटो. बंधने तुटोत. दुसरे मी काय सांगू?”

सेवकरामांचे भाषण बराच वेळ चालले होते. इतक्यात मोटार आली. जयजयकार झाले. ते मोठे पुढारी आले. सभा संपली. पुढार्‍यांचे स्वागत झाले. नेतानिवासात मंडळी गेली.

“मी जातो. सत्याग्रह ठरलाच तर येईन.”

“हे पहा सेवकराम, आम्हालाही मंदिरांचे मोठे प्रेम आहे असे नाही. परंतु त्यानिमित्ताने संघटना होते. ही संघटना महत्त्वाची आहे. शेवटी पोटापाण्याचे प्रश्न हीच मुख्य बाब आहे. आमचे बाबासाहेब बुध्ददेवांना मानतात आणि भगवान बुध्द तर देवबीव मानीत नसत. सहानुभूतीचा व प्रेमाचा व्यापक उदार धर्म हीच मुख्य वस्तू आहे. परंतु संघटना करण्यासाठी, जागृती करण्यासाठी हे मंदिरसत्याग्रह वगैरे करायचे. अणि एकदा संघटना उभी राहिली की तिच्या जोरावर आम्ही राजकीय क्षेत्रातही मानाचे स्थान घेऊ आणि आमची दु:खे दूर करू.”

“तसे असेल तर ठीक. बरे मी जातो. बाबासाहेब आले आहेत. तुमचे समितीचे काम आहे ते चालवा. मी जातो गंगेच्या तीराने फिरत. आता चंद्रही उगवत आहे.”

असे म्हणून सेवकराम गेले, सभेतील मंडळीही चालली. सरला मोटारीत होती. ती अनिमिष नेत्रांनी स्वामी सेवकरामांकडे पाहात होती. सेवकरामांजवळ बोलावे असे तिला वाटले. ते आपल्याला सेवेचा मार्ग दाखवतील असे का तिला वाटले? ते भाषण ऐकताना तिच्या डोळयांतून पाणी येत होते. का बरे?

सरला मोटार हाकणार्‍यास म्हणाली, “तू येथेच थांब. मला कदाचित उशीर होईल. तू मोटारीत झोप. मी परत आल्यावर तुला उठवीन. जरा काम आहे. मी जाऊन येत्ये.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel