“अध्यक्षमहाराज, प्रिय बंधु-भगिनींनो,

तुम्ही धर्माचा विचार करण्यासाठी सारे जमला आहात. धर्मावर येणार्‍या संकटांचा कशा रीतीने परिहार करावा त्याचा विचार करण्यासाठी तुम्ही एकत्र आला आहात. खरोखरच धर्मावर संकट आहे. परंतु ते निराळे आहे. आणि ते आजच आले असे नाही. ते कधीच आले आहे. हिंदुधर्माचा प्राण गुदमरत आहे, कासावीस होत आहे. आपली लाखो बाळे रडताना पाहून धर्माला का आनंद होईल? हिंदुधर्मातील स्त्रियांची स्थिती पाहा. त्या केवळ असहाय अबला आहेत. मुलींची लग्ने कशी होतात ती पाहा. मुलीचे एखाद्या तरूणावर प्रेम असले व त्या तरूणाचे तिच्यावर असले तर आईबापांचा धर्म आहे की त्या प्रेमाला आशीर्वाद द्यावा. परंतु असे होत नाही. मला अशी कितीतरी उदाहरणे माहीत आहेत की जेथे मुलींच्या भावना लक्षात न घेता त्यांना कोठेतरी देण्यात आले. त्या सासरी रडत असतील. त्यांचे हृदय किती दु:खी असेल? आणि बालविधवांची स्थिती पाहा. अजून अशी सनातनी मंडळी आहेत की ज्यांना बालविधवांचा पुनर्विवाह ही अधर्म्य गोष्ट वाटते. मी स्वत:चाच अनुभव सांगते. लग्न होऊन पंधरा दिवस नाही झाले तो माझा पती वारला. पांढर्‍या पायाची अवदसा म्हणून सासू-सासर्‍यांनी म्हटले; मला माहेरी पाठवण्यात आले. मी बाबांना एखादे वेळेस विचारी की सारे आयुष्य कसे कंठू? तर म्हणत, शिवलीलामृत वाच. शिवलीलामृतातील सीमंतिनीचा पती परत आला. माझा का येणार होता? माझ्या बाबांनी स्वत: उतारवयात लग्न केले. माझी आई निवर्तल्यावर काही दिवस ते एकटे राहिले. परंतु पुन्हा त्यांनी संसार मांडला. आपली बालविधवा मुलगी घरात डोळयांसमोर असता पुन्हा स्वत:चा संसार त्यांनी सुरू केला ! आणि मी? मला का भावना नव्हत्या ! मला का भुका नाहीत? आणि एका तरूण विद्यार्थ्यावर माझे प्रेम जडले. त्याचेही माझ्यावर. आमचा संबंध आला. तो लौकरच माझ्याशी रजिस्टर्ड रीतीने विवाह लावणार होता. परंतु त्याची आई आजारी पडली म्हणून तो गेला. तो परत आला नाही. त्याचे काय झाले मला कळले नाही. मला दिवस गेलेले. त्याने आपल्या हाताने मला कुंकू लावले होते. विश्वव्यापी प्रभूसमोर आम्ही पतिपत्नी म्हणून राहण्याचे व्रत घेतले. परंतु तो गेला ! आणि मी? वडिलांना सांगण्याचे धैर्य होईना. जीव देण्याचे धैर्य नाही. पंढरपूरला गेल्ये. तेथे मी बाळंत झाल्ये. आणि बाळाला तेथे ठेवून मी बाहेर पडल्ये. लहान अर्भकाला सोडून निघाल्ये. स्तन दुधाने भरून येत होते. कोणाला पाजणार? रडत निघाल्ये. कोठे नोकरी धरीन, माझे बाळ परत आणीन, या आशेन निघाल्ये. कल्याण स्टेशनवर मी होते. तेथे नाशिकचे एक सनातनी सज्जन भेटले. ते म्हणाले, “नाशिकला तुमची व्यवस्था करतो. आमची संस्था आहे.” मी विश्वास ठेवला. मी त्यांच्याबरोबर निघाल्ये. आणि पुढे काय झाले? अरेरे ! माझी कथा कशी सांगू? त्या गृहस्थाने मला कुंटणखान्यात कोंडिले. मी वेश्या व्हावे म्हणून तेथे माझे हाल करण्यात आले. तेथे माझ्या थोबाडीत मारीत. चाबकाने फोडून काढू अशी धमकी देत. परंतु प्रभूची दया ! मी सुरक्षित राहल्ये. आणि आज बाहेर आल्ये. कोणी आणले बाहेर ! कोणता उध्दारकर्ता भेटला? सांगू? हा पाहा माझ्या अंगावरचा शेला. अमोलिक शेला ! खरेच या शेल्याची किंमत करता येणार नाही. हा शेला कोठून आला सांगू? ज्या रामाच्या रथाला अस्पृश्य बंधूंचे हात लागू नयेत म्हणून ही परिषद तुम्ही भरविली आहे, ज्या रामरायाच्या मंदिरात अस्पृश्यांनी शिरता कामा नये म्हणून येथे तुम्ही जमला आहात, त्या रामरायाच्या अंगावरील हा शेला ! प्रभूच्या पवित्र मूर्तीच्या अंगावरचा हा शेला ! या अभागिनीची अब्रू सांभाळायला हा शेला आला. रामरायाने हा शेला पाठवला. माझ्यावर कृपेचे पांघरूण घालायला. हा शेला मी अंगावर घेतला नि मला धैर्य आले. या शेल्याने मला वीरांगना बनविले. नरकातून मी बाहेर आल्ये आणि तुमच्यासमोर ही उभी.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel