“मला नाही माहीत. सांग.”

आणि सरलेने सारी कथा सांगितली. उदय गेल्यापासूनची कथा. ती सांगताना ती मधून सद्गदित होई. तिला हुंदके येत. उदयच्या खांद्यावर मान ठेवून ती रडे. पुन्हा अश्रू पुसून ती कथा पुढे सुरू करी. उदयच्या डोळयांतूनही पवित्र गोदावरी स्त्रवत होती.

“उदय, घेशील का तू मला जवळ?”

“असे का विचारतेस?”

“उदय, सीतेहून पवित्रतम कोण? परंतु रावणाकडे राहिली म्हणून रामरायांनी तिला अग्निदिव्य करायला लाविले. मी तर सामान्य स्त्री. त्या नरकपुरीत आज सात-आठ महिने होत्ये. शक्यतो पवित्र व निष्कलंक राहिल्ये. परंतु उदय, तुला शंका असेल तर त्या डोहात मला लोट. तुझ्या हातचे मरणही अमृत आहे हो.”

“सरले, वेडी आहेस तू. कशीही असलीस तरी मला प्रिय आहेस. तू निष्कलंक आहेस. आणि त्या दुष्टांनी तुझ्यावर संकट आणलेच असते, तरीही मी तुझा स्वीकार केला असता. कारण मनाने तू तेथे संन्यासिनी होतीस. सरले, किती ग तुला दु:खे, किती यातना, वेदना? आणि हे सारे माझ्यामुळे ! अरेरे!”

“उदय, तुला मी रमविले नसते, आईकडे जाऊ दिले असते तर अशी ही दशा झाली नसती. त्या मातृप्रेमाची मी अवहेलना केली म्हणून या नरकात पडले.”

“आता नको रडूस.”

“उदय. मनात येते की हा शेला आपण दोघांनी आपल्याभोवती गुंडाळून त्या डोहात उडी घ्यावी. म्हणजे पुन्हा वियोग नको.”

“सरले, देवाने तुला उध्दरिले ते का पुन्हा जीव देण्यासाठी? मी जीव दिला नाही, तू जीव दिला नाहीस. आणि आता भेट झाल्यावर का जीव द्यायचा? आणि आपला बाळ आहेस त्याला विसरलीस वाटते?”

“आपण उद्याच जाऊ. पंढरपूरला जाऊ.”

“येथे सत्याग्रह असला तर?”

“असलाच तरी तो रामनवमीला सुरू होणार. उद्याच नाही काही. सुरू होणार असे कळले तर आपण परत येऊ. त्यात भाग घेऊ.”

“तूसुध्दा येशील?”

“हो.बाळाला घेऊन येईन.”

“सरले?”

“काय उदय?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel