“ऊठ बेटी. आली होती का झोप?”

“शेटजी, पहाटे पडलेले स्वप्न खरे होते ना?”

“देवाच्या मनात असेल तर सारे खरे होते. कसले स्वप्न पडले?”

“माझा उदय आल्याचे.”

“येणार असेल. दु:खापाठीमागून दु:खे येतात, त्याप्रमाणे सुखापाठीमागून सुखेही येतात. जीवनात असे हंगाम कधी कधी येतात. सारखे सुखाचे हंगाम ! सारखे दु:खाचे हंगाम ! कोठला वारा कधी येईल त्याचा काय नेम? कधी वासंतिक वारा तर कधी गारठून टाकणारा शिशिर ऋतूतील वारा ! काल माझ्या आत्मचंद्राचे ग्रहण सुटेल अशी होती का मला कल्पना? आणि तू मुक्त होशील अशी तुला तरी होती का कल्पना? जगात आश्चर्ये आहेत; योगायोग आहेत. पुण्य करायला जावे तर हातून पाप होते. पाप करायला जावे तर उध्दाराची वेळ येते. ऊठ बेटा. तू येथेच राहा. सभेला मागून थोडया वेळाने ये. हे तुझेच घर. बागेत हिंड, फीर.”

“परंतु कोणी परत नेणार तर नाही?”

“त्याची नको काळजी. तू निश्चिंत राहा.”

शेटजी गेले. आणि सरलाही उठली. प्रातर्विधी करून तिने मंगल स्नान केले. तिने केस नीट विंचरले. प्रसन्न कुंकू लावले. आज तिच्या मुख-मंडळावर अपूर्व पावित्र्य दिसत होते. एक सात्त्वि सौम्यता तेथे फुलली होती. प्रात:काळी फुले कशी मंदमधुर फुललेली असतात ! तशी ती दिसत होती. ती आपल्या खोलीत गेली. प्रभू रामचंद्राचे तिने ध्यान केले. आज आठ महिने तोच तिचा आधार होता. त्यानेच तिला वाचवले होते. धीर दिला होता. तिला आज आश्चर्य वाटत होते. ते पापी इतके दिवस आपल्या वाटेस का गेले नाहीत? मी जीव देईन किंवा वाघीण होईन, नागीण होईन, चावा घेईन, दंश करीन, असे खरेच का त्यांना वाटे? काय असेल हे सारे? प्रभूची कृपा. खरेच त्याची कृपा. सरलेने डोके टेकले. विश्वंभराची निराकार मूर्ती तेथे तिला दिसत होती. त्या मूर्तीकडे डोळे मिटून ती पाहात होती.

शेटजींना नेण्यासाठी मंडळी आली. रामभटजीही आले. शेटजी मोटारीत बसून गेले. सकाळची साडेआठ वाजण्याची वेळ होती. नऊ वाजता प्रकट परिषदेस सुरुवात होणार होती. सभामंडप भरून गेला होता. सारी सनातनी पुण्याई तेथे जमली होती ! सारे सनातनी पावित्र्य तेथे होते. तेथे जरीचे रूमाल होते. काही श्रीमंत सरदार सरदारी पोशाखांत होते. काही पेन्शनर वेताची पागोटी घालून आले होते. काहींच्या सुंदर पगडयाही होत्या. काळया टोप्या घातलेलेही कोणी धर्मवीर होते. कोणाचे बंदाचे लांब अंगरखे होते. कोणाच्या अंगावर उपरणी होती. कोणाच्या अंगावर शालजोडया होत्या. गंधे झळकत होती. कानांतील रूद्राक्ष कोठे कोठे शोभत होते. तपकिरीच्या डब्या कनवटीस होत्या. कोणी विडे खाल्ले होते. कोणाच्या हातांत चंच्या होत्या. कानांतून भिकबाळया, बोटांतून सोन्याची पवित्रके, सल्लेजोडया होत्या. मोठा प्रतिष्ठित देखावा ! अनेकरंगी, विविधाकार आणि स्वयंसेवक सभोवती होते. शिटया होत होत्या. मंडप गजबजून गेला होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel