१८. ह्या सुत्तांत सांगितलेले पहिले श्रमण-ब्राह्मण म्हटले म्हणजे वैदिंक यज्ञयागादि कृत्यें करून मांसाहार व सोमपान करणारे ब्राह्मण व यति हे असले पाहिजेत. अशा चैनीला कंटाळून व भिऊन अरण्यवास पतकरणारे जे तपस्वी संघ असत; ते दुसरे श्रमण-ब्राह्मण होत. जंगलांत जोंपर्यंत खायला मिळें, तोंपर्यंत त्यांचे ठीक चाले. पण जेव्हां फलमूलांची न्यूनता पडे तेव्हां पुनः ग्रामवास पतकरून ते चैनींत शिरत. पुराणांतरीं पराशरदिकांचीं उदाहरणें आहेतच. तिसरे श्रमण-ब्राह्मण म्हटले म्हणजे बुध्दसमकालीन निरनिराळ्या संघांत रहाणारे संन्यासी होत. ते ब्रह्मचर्यादिक नियम पूर्णपणें पाळीत, व उपभोग्य वस्तूंचा मितपणें उपभोग घेत. परंतु आत्मा आहे कीं नाही, जग शाश्वत कीं अशाश्वत इत्यादि वादांत शिरत, व त्यामुळें ते माराच्या पाशांत सांपडत. चौथे श्रमण-ब्राह्मण म्हणजे बुध्दाचे शिष्य. ते आत्मवादांत शिरत नसत, व त्यामुळें ते माराच्या पाशांत सांपडत नसत.

१९. बुध्दसमकालीन श्रमणांचें वर्णन पुढें येणारच आहे.१. येथें एवढेंच दाखवावयाचें आहे कीं, बुध्दापूर्वीं यज्ञयागांचा धर्म मानणारे ब्राह्मण होते, व त्यानन्तर यज्ञयागांना कंटाळून अरण्याचा आश्रय करणारे तपस्वी होते. बुध्दसमकालीं असे ब्राह्मण व तपस्वी नव्हते असें नाहीं. परन्तु या दोन पंथाचे दोष पहाणारे तिसर्‍या प्रकाराचे संन्यासी लोकहि होते; आणि त्या लोकांत पार्श्व मुनीच्या शिष्यांची गणना प्रामुख्यानें केली पाहिजे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ वि० २।२३-३५ पहा )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२०. कपिल मुनि बुद्धापूर्वी एक दोन शतकें तरी जन्मला असला पाहिजे. कारण त्याचें नांव शाक्यांच्या मुख्य राजधानीला दिलें होतें.

एतत्पवित्रमग्र्यं मुनिरासुरयेऽनुकंपया प्रददौ |
आसुरिरपि पंचशिखाय तेन च बहुधा कृतं तंत्रम् ।।


( हें पवित्र व उत्तम शास्त्र कपिल मुनीनें अनुकंपा करुन आसुरीला दिलें, व आसुरीनें पंचशिखाला दिलें; आणि त्यानें याचा विस्तार केला.) सांख्य कारिकेच्या शेवटीं सांपडणार्‍या ह्या आर्येंत सांख्याचार्यांची परम्परा सांगितली आहे. त्यावरुन असें दिसून येतें कीं, कपिल मुनीचा शिष्य आसुरि व आसुरीचा शिष्य पंचशिख होता.

२१. शान्तिपर्वांतील तीनशें चोविसाव्या अध्यायांत१. पंचशिख भिक्षूचा व जनक राजाचा संवाद दिलेला आहे; आणि तीनशें पंचविसाव्या अध्यायांत जनक म्हणतो कीं, “भिक्षो: पंचशिखस्याहं शिष्य: परमसंमत:” ( पंचशिख भिक्षूचा मी परमसंमत शिष्य आहें). हें महाभारताचें म्हणणें खरें असेल तर जनकापूर्वी दोन पिढ्या कपिल होता असें सिद्ध होतें; व त्याचा काळ बुद्धापूर्वी दुसर्‍या शतकांतील ठरतो. सांख्याचा विकास जनकाच्या वेळीं झाला असें गृहीत धरलें तर बुद्धसमकालीं अस्तित्वांत असलेल्या प्रसिद्ध श्रमणसंघांवर त्याचा फारसा परिणाम झाला नसावा असें म्हणावें लागेल. अथवा सांख्याचें तत्त्वज्ञान कांही अंशी पकुध (ककुध) कात्यायनाच्या तत्त्वज्ञानासारखें असावें, व त्याचा विकास होतां होतां सध्या अस्तित्वांत असलेल्या ईश्वर कृष्णाच्या सांख्यकारिका बनल्या असाव्या असें धरावें लागेल. कांही असो, बुद्धकालीं बरेच श्रवणब्राह्मण सांख्यासारख्या आत्मवादांत शिरले होते ह्यांत शंका नाहीं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ कुम्भकोण संस्करण; औंध संस्करण अध्याय ३१९ व ३२० )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२२. आजकाल असें गृहीत धरण्यांत येतें की, बौद्ध धर्म सांख्यतत्त्वज्ञानापासून निघाला पण त्याला प्राचीन बौद्ध ग्रंथांत मुळींच आधार नाहीं. बुद्धचरितकाव्यांत आडार कालाम व उद्रक रामपुत्र यांना सांख्याचे प्रवर्तक बनविलें आहे. त्यांच्यावर सांख्याचा परिणाम झाला होता हें सांगतां येणें कठीण आहे. कारण सुत्तपिटकांत जी त्यांची माहिती आली आहे तींत सांख्याचा व त्यांच्या तत्त्वज्ञानाचा निकट संबंध दिसून येत नाहीं. सांख्याचें तत्त्वज्ञान बीजरूपानें बुद्धकाळीं अस्तित्वांत होतेंच. त्याचा बुद्धावर जर कांही परिणाम झाला असेल, तर तो हाच कीं, सांख्यानें वर्णिलेल्या आत्म्याचें बुद्धाला मुळीच अस्तित्व दिसून आलें नाहीं. किंबहुना तशा आत्म्याचें अस्तित्व मानणें अपायकारक आहे, असें बुद्धाचें ठाम मत झालें. पार्श्वनाथाच्या चार यामाशींहि सांख्याचा संबंध मुळींच नाहीं. याच यामांतून अहिंसाधर्म निघाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel