३५. दुष्काळ आणि रोगांच्या सांथी वेळोवेळीं जगांतील सर्व राष्ट्रांत फैलावत असतच. परंतु त्यांची जाणीव फार थोड्या राष्ट्रांना होत असे. सोळाव्या शतकांत प्रथमत: ही जाणीव इंग्लंड देशाला झाली, असें म्हणण्यास हरकत नाहीं. ह्या वेदनेमुळें इंग्लंडच्या वरिष्ठ वर्गांत राष्ट्रीय तृष्णा उत्पन्न झाली. कसें तरी करून आपल्या राष्ट्राची संपत्ति वाढविली पाहिजे, असें त्यांस वाटूं लागलें. ह्या तृष्णेमुळें पर्येषणेला सुरुवात झाली. तिकडे अमेरिकेंत वसाहती करण्यासाठीं धांव घे, इकडे ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून पूर्वेकडील व्यापारांत फायदा मिळवण्याची खटपट कर, असे प्रयत्‍न सुरु झाले. या पर्येषणेंत कधीं लाभ व कधीं अलाभ होऊं लागला. तेव्हां त्यासाठीं निश्चय करणें जरूर पडलें. जेथें लाभ होईल तेथेंच आपलें घोडें पुढें दामटावें, व जेथें अलाभ होईल अशा ठिकाणीं माघार घ्यावी, असा प्रकार सुरू झाला. तेव्हां लाभाच्या जागा दृढ करण्याचें अध्यवसान बळावलें; व त्यामुळें परिग्रह उत्पन्न झाला; ही माझी हद्द, ती इतरांची अशा रीतीनें अधिकारक्षेत्राचें जाळें पसरूं लागलें. त्यायोगें आपल्या संपत्तीबद्दल  मात्सर्य उत्पन्न झालें, व आरक्षा ठेवणें भाग पडलें. समुद्रावर स्वामित्व रहाण्यासाठीं इंग्रजांचें आरमार इतर सर्व आरमारापेक्षां बळकट असलें पाहिजे, अशी राष्ट्रीय दृष्टि बनली; व इतरांची अल्पस्वल्प स्पर्धा दिसून आल्याबरोबर त्यांचा प्रतिकार करण्यास ह्या शस्त्र-सामग्रीचा उपयोग होऊं लागला; आणि कलह, विग्रह, विवाद, हमरीतुमरी, पैशुन्य किंवा राजकारण आणि असत्य भाषण अथवा वर्तमानपत्री प्रचार इत्यादिक अनेक पापकारक, अकुशल गोष्टींचा प्रादुर्भाव झाला.

३६. इंग्लंडांत वाढणार्‍या ह्या राष्ट्रीय तृष्णेच्या बीजाला भिणारे लोक नव्हते असें नाहीं. गोल्डस्मिथ म्हणतो,

‘Ill fares the land, to hastening ills a prey,
where wealth accumulates, and men decay.’

( ह्या देशाची दुर्दशा होत आहे. त्वरित येणार्‍या आपत्तींचा तो शिकार बनला आहे. येथें संपत्ति एकवटत आहे, पण माणसांचा र्‍हास होत आहे.) पुन्हा तो म्हणतो,

‘While thus the land, adorn’d for pleasure all
In barren splendour feebly waits the fall.’

( याप्रमाणें सर्व देश ऐषआरामासाठीं निर्जीव भपक्यानें श्रृंगारलेला आहे खरा, तरी दुर्बलत्वामुळें जो च्युत होण्याच्या बेतांत आहे.) गोल्डस्मिथचें हें ( The Deserted Village) सर्वच काव्य इंग्लंडला भावि संकटांचा इषारा देणार्‍या विचारांनी भरलेलें आहे. पण त्याला पुसतो कोण? तरुण मालुवा लतेच्या आलिंगनानें जसा शालवृक्षाचा, तसा इंग्लंडचा अन्तरात्मा तरुण राष्ट्रीयतृष्णेनें नुसता भांबावून गेला होता. मोठमोठाले राजकारणी पुरुष, ज्यांचें खाजगी वर्तन अनिंद्य असे, ते देखील राष्ट्रीय लोभासाठीं वाटेल तीं राजकारणें करण्यास तयार असत; व तीं वाईट नव्हेत, अशी त्यांची ठाम समजूत असे!  देशकार्यासाठीं, म्हणजे देशांत इतर देशांतील संपत्ति आणण्यासाठीं कोणतेंहि कुकर्म सत्कर्म समजलें जात असे!

३७. ह्या राष्ट्रीय तृष्णेचा विकास होतां होतां तिनें प्रथमत:  इंग्रजी साम्राज्याची उत्तर-अमेरिकारूपी मोठी शाखा तोडून टाकली. इतक्यांत ह्या वृक्षाला पूर्वेकडे हिंदी साम्राज्याच्या रूपानें फांटे फुटूं लागले. तेव्हां इंग्लंडला ह्या तृष्णेबद्दल तिटकारा न येतां आणखीहि मोह उत्पन्न झाला. परिणामीं गेल्या महायुद्धाचा प्रसंग उद्‍भवला. तेव्हां ह्या तृष्णेच्या कार्याला स्पष्टपणें सुरुवात झालेली दिसूं लागली. वसाहती जवळ जवळ विभक्त झाल्या, व आयर्लंड विभक्त झाला, एवढेंच नव्हे, तर तो मूळ वृक्षाला जाचक होऊं लागला. तरी ह्या तृष्णेला आफ्रिकेंतील आणि पूर्वेकडील शाखांचा आश्रय आहेच. आणि त्या शाखांचें पूर्ण निर्दलन केल्यावांचून ही तृष्णा स्वयमेव नष्ट होईल, अशीं चिन्हें दिसत नाहींत.

३८. स्पेनच्या आरमाराचा विध्वंस केल्यावर इंग्रंजांच्या या राष्ट्रीय तृष्णेला हवा तेवढा वाव मिळाला. युरोपीय राष्ट्रें आपपसांत भांडण्यांत गुंतलीं असल्यामुळें आरमाराच्या बाबतींत त्यांना इंग्रजांशीं स्पर्धा करणें शक्य नव्हतें. अमेरिका आपलें आरमार वाढवून इंग्रजांवर मात करूं शकली असती.  पण तसें करण्याची तिला मुळींच जरूरी नव्हती. कां कीं, खुद्द अमेरिकेंतच वाटेल तेवढी संपत्ति हस्तगत करतां येण्याजोगी होती. अर्थात् इंग्लंडला ‘समुद्रराज्ञी’ ही पदवी पटकावणें सोपें गेलें. परंतु कामसुत्तांत मह्टल्याप्रमाणें आज त्यांचे अबल प्रतिस्पर्धी बलवान् होत आहेत (अबला नं बलीयत्‍नि).  भूमध्यसमुद्रांत इटली आणि फ्रान्स या दोन राष्ट्रांचीं आरमारें एकवटलीं, व त्यांना त्या देशांतील युद्धविमानांची जोड मिळाली, तर इंग्लंडचा ताबा भूमध्यसमुद्रावरून जाण्यास फार दिवस लागावयाचे नाहींत. आणि जर एकदां हा जलमार्ग इंग्लंडच्या हातांतून गेला, तर त्याचें पूर्वेकडील साम्राज्य टिकाव धरूं शकणार नाहीं. म्हणजे इंग्लंडच्या साम्राज्याच्या हांवेमुळें स्वत: इंग्लंड कमकुवत होत असून हीं आजबाजूचीं दुर्बळ राष्ट्रें बलवान् होत चाललीं आहेत, व त्यायोगें इंग्लंडच्या मार्गांत अनेक विघ्नें उपस्थित होत आहेत (मद्दन्ति नं परिस्सया).

३९. तात्पर्य, वैयक्तिक तृष्णेपेक्षां सांघिक तृष्णा अधिक भयंकर आहे; व सांघिक तृष्णेपेक्षां राष्ट्रीय तृष्णा अधिक हानिकारक आहे. आरंभीं आरंभीं जरी ती मोठी नाजुक आणि सुंदर दिसत असली, तरी कांहीं कालानें तिचे परिणाम अत्यंत घातुक झाल्यावांचून रहात नाहींत. सांघिक किंवा राष्ट्रीय तृष्णा वरिष्ठ वर्गांत शिरते, व बुद्धिमत्तेंत मागसलेल्या लोकांवर पोसते. पण जेव्हां ह्या मागसलेल्या लोकांकडून प्रतिकाराला सुरुवात होते, तेव्हां ती त्या संघावर आणि त्या राष्ट्रावरच उलटते. या तृष्णेमुळें स्पेन देशानें अनेक मागसलेल्या लोकांवर अनेक प्रकारचे अत्याचार केले. त्यामुळें ते देश स्पेन देशापासून विभक्त झाले, आणि स्पेन देश निर्वीर्य आणि हताश होऊन बसला. असें असतां आजकाल इटली आणि जर्मनी ह्याच तृष्णालतेला मोठ्या आनंदानें आलिंगन देऊन डुलत आहेत. ह्यांतच सगळ्या युरोपीय राष्ट्रांच्या दु:खाचें मूळ आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel