अशोकापासून शंकापर्यंत

४७.  अशोकाच्या वेळीं यज्ञयागांचें महत्त्व निखालस कमी झालें. पहिल्याच शिलालेखांत अशोकानें पशुवधयुक्त यज्ञाला मनाई केली आहे. आणि शेवटपर्यंत त्यानें पशुवधाविरुद्ध लोकमत बनवण्याची खटपट केल्याचें त्याच्या शिलालेखांवरून दिसून येतें. यज्ञयाग बंद करून वैदिक देवांपैकीं एकाद्या देवाला, किंवा त्यानंतर ब्राह्मणांनी तयार केलेल्या ब्रह्मदेवाला अशोकानें आपला कुलदेव केलें असतें, तर पुजारी ह्या नात्यानें ब्राह्मणांची व्यवस्था होऊं शकली असती. परन्तु तसें न करतां त्यानें बुद्धालाच आपलें दैवत बनवलें. बुद्धोपासक होऊन प्रयत्‍न केल्यानें आपण ह्या देशांतले देव जे खरे समजले जात होते ते खोटे ठऱवले, असें तो म्हणतो.१ अर्थात् बुद्धाशिवाय दुसर्‍या कोणाचाहि अशोक भक्त नव्हता. ब्राह्मणांना त्यानें इतर रीतीनें त्रास दिला असें नव्हे. पालि वाङ्मयांत श्रमण-ब्राह्मण असा समास आढळतो. पण अशोकाच्या शिलालेखांत ब्राह्मणांना प्रथम घातलें आहे. (ब्राह्मणसमणानं साधु दानं). यावरून असें दिसतें कीं, अशोक ब्राह्मणांनाहि दानधर्म करीत असे. पण त्या दानधर्मांमागें यज्ञयागपुरस्कार जो ब्राह्मणांचा मान असावयास पाहिजे तो नव्हता. -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ जंबुदीपसि अमिसा देवा हुसु ते दानि मिसा कटा|| रूपनाथ शिलालेख.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
४८.  यज्ञयाग गेले आणि वैदिक देवाहि गेले; मग नुसत्या भिक्षुकीनें पोट भरण्याची पाळी आल्यावर ब्राह्मणांचा मान तो कसला राहिला ? गृह्यसंस्कारांत गृहस्थांना थोडीबहुत मदत करून आपला निर्वाह कसा बसा चालवण्याची ब्राह्मणांवर पाळी आली. पुराणांतरीं मौर्य राजांची शूद्रांत गणना करून ब्राह्मणांनी जो त्यांच्यासंबंधी इतका तिरस्कार दाखविला आहे, त्याचें रहस्य यांतच आहे.

४९.  मौर्यांचा अस्त झाल्यावर पुष्यमित्र उदयाला आला. त्यानें ब्राह्मणी धर्माचें म्हणजे यज्ञयागांचें पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्‍न केला. परंतु तो फारसा सिद्धीस गेल्याचें दिसून येत नाहीं. आजूबाजूच्या बौद्धांना त्यानें थोडा बहुत त्रास दिला असावा. परंतु बौध्द धर्म अशोककाळींच चारी दिशांना फैलावून बराच दृढ झाला होता. त्याचें अल्पस्वल्प प्रयत्‍नांने उन्मूलन करणें शक्य नव्हतें.

५०.  दुसरें हें कीं, पुष्यमित्राच्या वेळीं यवन (ग्रीक), शक वगैरे बाहेरच्या लोकांच्या पुन्हा हिंदुस्थानावर स्वार्‍या होऊं लागल्या. ह्या लोकांत जातिभेद नसल्या कारणानें सामान्य व्यवहारांत त्यांचा कल ब्राह्मणधर्मापेक्षां बौद्ध धर्माकडे विशेष होता. त्यांच्याकडून यज्ञयागांना मदत होणें शक्य नव्हतें. अर्थात् पुष्यमित्र आणि अग्निमित्र यांच्यानंतर राजकीय यज्ञयाग बंद पडले, व त्यांना बरींच शतकें डोकीं वर काढतां आलीं नाहीत.

५१.  या संबंधानें डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या A Peep into the Early History of India’ या लहानशा पण अत्यंत उपयुक्त पुस्तकांतील एक लहानसा उतारा येथें देणें प्रशस्त वाटतें. ‘Thus from about the beginning of the second century before Christ, to about the end of the fourth century after, princes of foreign races were prominent in the history of India and ruled sometimes over a large portion of the country up to the limits of Maharashtra.. During this period it is the religion of the Buddha alone that has left prominent traces, and was professed by the majority of the people.” (p.44). (याप्रमाणें सरासरी ख्रिस्ती शतकाच्या पूर्वी दुसर्‍या शतकाच्या आरंभापासून सरासरी चौथ्या शतकाच्या अंतापर्यंत हिंदुस्थानाबाहेरील राजे लोकांनाच हिंदुस्थानांत महत्त्व आलें होतें, आणि मधून मधून त्यांची सत्ता फार मोठ्या प्रदेशांत महाराष्ट्राच्या मर्यादेपर्यंत पोंचली होती... ह्या कालांत बौद्धधर्म तेवढा प्रामुख्यानें अस्तित्वांत असल्याचीं चिन्हे दिसून येतात; आणि हाच धर्म बहुजनांचा होता.) अशा परिस्थितींत ब्राह्मणांना एक नवीन दैवत सांपडलें. तें कोणतें हें पुढील विवेचनावरून दिसून येईल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel