५५. अरियपरियेसन सुत्तांत पुढील मजकूर आढळतो. “भिक्षुहो, मी देखील संबोधिज्ञान होण्यापूर्वी बोधिसत्त्वावस्थेंत स्वत: जन्मधर्मी असतांना जन्माच्या फेर्‍यांत सांपडलेल्या वस्तूंच्या (पुत्र, दारा, दास, दासी इत्यादिकांच्या) मोहांत सांपडलों होतों. स्वत: जराधर्मी, व्याधिधर्मी, मरणधर्मी, शोकधर्मी असतांना जरा, व्याधि, मरण, शोक यांच्या फेर्‍यांत सांपडलेल्या वस्तूंच्या मोहांत सांपडलों होतों. तेव्हां माझ्या मनांत असा विचार आला कीं, मी स्वत: जन्म, जरा, मरण, व्याधि, शोक यांनी बद्ध असतां त्यांनीच बद्ध जे पुत्रदारादिक त्यांच्या मागे लागलों आहें हें ठीक नव्हे. जन्मजरादिकांनी होणारी हानि पाहून अजात, अजर, अव्याधि, अमर आणि अशोक असें जें परमश्रेष्ठ निर्वाणपद त्याचा शोध लावणें योग्य आहे.

५६. “भिक्षुहो, असा विचार करीत असतां कांही काळानें, जरी मी त्यावेळीं तरुण होतों, माझा एकहि केस पिकला नव्हता, भरज्वानींत होतों, आणि माझे आईबाप मला परवानगी देत नव्हते, डोळ्यांतून निघणार्‍या अश्रुप्रवाहानें त्यांची मुखें भिजली होतीं, ते सारखे रडत होते, तरी ( त्याची परवा न करतां) शिरोमुंडन करून, काषाय वस्त्रांनी देह आच्छादून घरांतून बाहेर पडलों व परिव्राजक झालों.”

५७. हें शब्दश: भाषांतर नाहीं. पुनरुक्ति गाळून तात्पर्य दिलें आहे. बोधिसत्त्वाची आई मायादेवी बोधिसत्त्व जन्मल्यावर सातव्याच दिवशीं परलोकवासी झाली; व तिच्या बहिणीनें, महाप्रजापतीनें बोधिसत्त्वाचें पुत्रवत् पालन केलें. ती बोधिसत्त्वाची मावशी असून सावत्र आईहि होती. म्हणून येथें महाप्रजापतीलाच आई म्हटलें आहे. यावरुन हें सिद्ध होतें कीं बोधिसत्त्व कोणाला नकळत पळून गेला नाहीं. आईबापांना सांगून त्यांच्या इच्छेविरुद्धच त्यानें संन्यास घेतला.

५८. गृहत्याग केल्यानंतर तो आडार कालामापाशीं राहिला, व त्याच्या योगमार्गाचा त्यानें अभ्यास केला, हें वरील भरण्डु कालाम सुत्तावरून स्पष्ट होत आहे. कालामापासून जें शिकणें शक्य होतें तें शिकून झाल्यावर तो उद्रक रामपुत्रापाशीं गेला. त्यानें बोधिसत्त्वाला योगाची आणखी एक पायरी शिकवली. हे दोघेहि योगी गुरु कोसल देशांत व त्याच्या आसपासच्या प्रदेशांत प्रसिद्ध होते. परंतु वर निर्देशलेले मोठाले संघनायक बज्जींच्या आणि मगधांच्या देशांत आपल्या धर्माचा प्रसार करीत असत. त्यांची कीर्ति काशी, कोसल इत्यादि देशांतहि पसरली होती. अर्थात् अशा गुरूंच्या तत्त्वज्ञानांचें रहस्य जाणण्यासाठीं बोधिसत्त्व राजगृहाला गेला. तेथें त्यानें कोणत्याहि मोठ्या धर्मगुरूंपाशीं अभ्यास केला नाहीं, तरी त्यांच्या शिष्यांकडून त्यांच्या तत्त्वज्ञानाची माहिती मिळवली असलीच पाहिजे. पण त्यांच्या तत्त्वज्ञानांनी त्याचें समाधान झालें नाहीं; व खडतर तपश्चर्या केल्याशिवाय धर्माचें समाधान झालें नाही; व खडतर तपश्चर्या केल्याशिवाय धर्माचें रहस्य आपणास समजणार नाहीं, अशी त्याची समजूत झाली.

५९. बोधिसत्त्वानें आपल्या तपश्चर्येला सुरूवात गयेपाशी केली. सध्या जिला फल्गु म्हणतात, त्याच नदीला पूर्वी नैरंजरा म्हणत असत. सध्या उन्हाळ्यांत या नदींत पाणी मुळींच रहात नाहीं. पण बुद्धकाळीं तिचा प्रवाह सुन्दर असून आजूबाजूचा प्रदेश फार रमणीय होता. तेथें बोधिसत्त्वाला आणखी पांच तपस्वी भिक्षु भेटले. त्या सर्वांनी मिळून तपश्चर्येला आरम्भ केला.

६०. गृहत्याग केल्यानंतर सात वर्षेपर्यन्त कोणत्याना कोणत्या प्रकारें बोधिसत्त्वाची तपश्चर्या चालूच होती. परन्तु तत्त्वबोधाचा खरा मार्ग त्याला सांपडला नाहीं. तेव्हां त्याच्या मनांत विचार आला कीं, ‘ह्या तपश्चर्येनें लोकोत्तर धर्मज्ञान प्राप्त होईल असें मला वाटत नाहीं. ह्याहून दुसरा कोणता तरी निर्वाणाचा मार्ग असावा. ( घर सोडण्यापूर्वी ) बापाबरोबर शेतांत गेलों असतां जंबुवृक्षाच्या सावलींत प्रथम ध्यानाची समाधि साधल्याची मला आठवण आहे.१. तोच तर निर्वाणाचा मार्ग नसेल ना?” ह्या गोष्टीचें स्मरण झाल्याबरोबर बोधिसत्त्वाला तोच खरा मार्ग असावा असें वाटूं लागलें. तो आपल्याशींच म्हणाला, ‘त्या समाधिसुखाला मी कां भितों ? तें चैनीचें सुख नाहीं, किंवा पापकारकहि नाहीं. अशा सुखाला भिंता काम नये. परंतु या दुर्बल देहानें तें सुख साध्य होणार नाहीं. तेव्हां देहाचें संरक्षण करण्यापुरतें अन्न खाल्लें पाहिजे.’२.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ वि० २।५४ पहा )
( २ मज्झिम नि० महासच्चक सुत्त )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
६१. त्यानंतर बोधिसत्त्व देह संरक्षणाला लागणारें योग्य अन्न सेवन करूं लागला. तें पाहून त्याच्याबरोबर असलेल्या पांच भिक्षूंची निराशा झाली. श्रमण गोतम ढोंगी बनला असें वाटून ते त्याला सोडून चालते झाले. तपश्चर्येमुळें बोधिसत्त्वाच्या अंगीं मुळींच त्राण राहिलें नव्हतें. परंतु बेताबातानें आहारसेवन केल्यानें त्याच्या अंगीं शक्ति आली, व तो समाधिसुखाचा अनुभव घेऊं लागला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel