१२. होकायंत्रामुळें समुद्रकांठच्या शहरांतून व्यापारी दळणवळणाला फारच मदत झाली. परंतु दुसरा ओटोमन सुलतान महंमद यानें १४५३ सालीं कांस्टांटिनोपल शहर काबीज केल्यामुळें दार्दनेल सामुद्रधुनींतून चालणारा व्यापार बंद पडत चालला, आणि भूमध्यसमुद्रावरील शहरांना आपला व्यापार अ‍ॅटलांटिक महासागराकडे वाढविणें भाग पडलें. मार्को पोलोच्या प्रवासवर्णनाचा तर एकसारखा प्रसार होतच चालला होता; आणि त्यामुळें भूमध्यसमुद्रावर व अ‍ॅटलांटिक महासागरावर व्यापार करणार्‍या व्यापार्‍यांच्या तोंडाला पाणी सुटणें साहजिक होतें. तरी पण हिंदुस्थानाकडे जाणारा मार्ग समुद्रांतून सांपडेल असें कोणालाहि वाटलें नव्हतें.

१३. परंतु पोर्तुगीज नावाडी दीयाज् (Diaz) ह्यानें १४८६ सालीं केप ऑफ गुडहोपला वळसा घातला. त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजे १४९२ सालीं कोलंबस आपलीं लहानशीं तीन जहाजें घेऊन अमेरिकेला जाण्यास निघाला. पश्चिमेच्या बाजूला हिंदुस्थान असावें, अशी त्याची ठाम समजूत होती. बिचार्‍यानें आपल्या प्रवासाच्या कामीं मदत मिळविण्यासाठीं पोर्तुगीज, स्पॅनिश आणि इंग्लिश दरबारांत खटपट केली. परंतु त्यापासून कांहींच फायदा झाला नाहीं. १४९२ सालीं स्पेननें ग्रानादा येथें मूर लोकांचा पराजय करून मुसलमानांना पश्चिम यूरोपमधून कायमचें हद्दपार केलें. त्यानंतर कोलंबसला पालोस नांवाच्या शहरांतील कांहीं व्यापार्‍यांनी तीन जहाजें देऊन पश्चिमेच्या सफरीस पाठविलें. त्या सगळ्यांत सांता मारिया हें मोठें जहाज शंभर टनांचें होतें, आणि दुसरीं दोन नुसत्या पन्नास टनांच्या फतेमार्‍या होत्या. असल्या या जहाजांतून प्रवास करून १४९३ सालीं कोलंबस सुखरूपपणें परत आला; व त्यानें आपण हिंदुस्थानचा शोध लावला असें जाहीर केलें. त्यानें ज्या बेटांचा शोध लावला, त्यांना अद्यापिहि पश्चिम हिंदुस्थान (West Indies) म्हणतात.

१४. इकडे १४९८ सालीं वास्को-दा-गामा यानें केप ऑफ गुडहोपवरून कालिकोटपर्यंत प्रवास करून खर्‍या हिंदुस्थानचा शोध लावला, व जिकडे तिकडे पोर्तुगीज लोकांचीं व्यापारी ठाणीं स्थापण्यास आरंभ केला. जवळ जवळ एक शतकभर हिंदुस्थानाचाच नव्हे, तर मलाया वगैरे पूर्वेकडील देशांचा व्यापार पोर्तुगीज लोकांच्याच हातीं होता.

१५. तिकडे स्पेनमधील धाडशी लोकांनी दक्षिण अमेरिकेंत एकसारखी धुमाकूळ सुरू केली होती. त्यांत स्पेनच्या राजाला हात घालणें भाग पडलें. तेणेंकरून दक्षिण अमेरिकेंत थोडीबहुत शांतता स्थापित झाली; आणि तेथील संपत्तिलाभानें स्पेनचे राजे, सरदार व इतर व्यापारी एकदम अतिशय धनाढ्य बनले. सर्व पश्चिम यूरोपच्या डोळ्यांत त्यांची संपत्ति सलूं लागली; व व्यापारी चढाओढीला सुरुवात झाली.

१६. पोर्तुगीजांनंतर डच लोकांनी पूर्वकडील व्यापार हस्तगत करण्याचा प्रयत्‍न चालविला; आणि सतराव्या शतकाच्या आरंभीं त्यांनी जवळ जवळ पोर्तुगालचा व्यापार संपुष्टांत आणला म्हणण्यास हरकत नाहीं. त्याच काळीं, म्हणजे १६०० सालीं डिसेंबरच्या ३१ तारखेला इंग्लंडांत ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली; व इंग्रजांनी अतिशय चिकाटीनें आपला व्यापार वाढविण्यास आरंभ केला. प्रथमत: राजकारणांत पडण्याचा त्यांचा मुळींच विचार नव्हता. परंतु आपल्या व्यापाराच्या संरक्षणासाठीं जागजागीं किल्ले बांधून व्यापारी ठाणीं बसवणें त्यांना भाग पडलें. इतक्यांत फ्रेंचांनी सन १६६४ सालीं अशीच एक ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून हिंदुस्थानांत आपलें घोडें पुढें दामटण्याचा घाट घातला. अर्थात् त्यांच्यामध्यें व इंग्रजांमध्यें एक प्रकारची चुरस लागली आणि मत्सर वाढत गेला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel