५०. या ऋचांचें सरळ भाषांतर असें करता येईल—“तो जलद चालणारा कृष्ण दहा हजार सैन्यासह अंशुमती नदीजवळ आला (व त्यानें तेथें तळ दिला). जिकडे तिकडे महाशब्द करणार्‍या त्या कृष्णाजवळ इन्द्र आला; आणि सल्ला करण्याच्या हेतूनें त्यानें कृष्णाशीं स्नेहाचें बोलणें चालविलें. तो आपल्या सैन्याला म्हणाला, ‘अंशुमती नदीच्या खोर्‍यांत जंगलांत दडून बसलेल्या त्या द्रुतगामी व आकाशाप्रमाणें तेजस्वी कृष्णाला मी पहात आहें; आणि, शूरहो, तुम्ही आतां त्याच्याशीं लढाई करावी अशी माझी इच्छा आहे.’ त्यानंतर त्या कृष्णानें आपली सेना अंशुमतीच्या खोर्‍यांत एकत्र केली, व मोठा पराक्रम दाखवला. चारी बाजूला चालून येणार्‍या ह्या देवेतर सेनांचा इन्द्रानें बृहस्पतीच्या मदतीनें पराजय केला. (किंवा इन्द्रानें या सैन्याचे हल्ले सहन केले.)”

५१. यावरून असें दिसतें कीं, इन्द्र आपल्या देशांतून कृष्णावर हल्ला करण्यासाठीं अंशुमती नदीपर्यंत गेला असतां तेथे कृष्णानें आपल्या सैन्याची अशा बिकट जागीं रचना केली व इन्द्राला त्याच्यावर हल्ला करणें मुष्किलीचें झालें. आपला पराजय झाला नाहीं हाच आपला जय समजून इन्द्र मागें हटला; किंवा या संकटांतून बृहस्पतीनें त्याला वांचवलें, असें म्हणण्यास हरकत नाहीं.

५२. दुसर्‍या एका ऋचेंत इन्द्रानें कृष्णाच्या गरोदर बायकांना मारल्याचा उल्लेख आहे (‘यः कृष्णगर्भा निरहन्’ ऋ० १।१०१।१). म्हणजे अंशुमती नदीवर कृष्णाला जिंकणें शक्य न झाल्यामुळें कृष्णाच्या देशांतील कांहीं गरोदर बायकांना ठार मारून व दुसरे अशाच प्रकारचे कांहीं अत्याचार करून इन्द्र मागें हटला असावा.

५३. भागवतांतील दशम स्कन्धांत चोवीस आणि पंचवीस अध्यायांत अशी कथा आली आहे कीं, ‘नन्दादिक गोपालांनी इन्द्राला यज्ञानें तुष्ट करावें असा बेत केला. पण कृष्णाला ही गोष्ट पसन्त पडली नाहीं. त्यानें साधें जेवण करावयास लावलें, व गोप-गोपीनां घेऊन तो गोवर्धन पर्वताकडे गेला. इन्द्राला हें कृत्य आवडलें नाहीं, व मुसळधार पाऊस पाडून त्यानें गोकुळाचा नाश करण्याचा प्रयत्‍न केला. तेव्हां कृष्णानें गोवर्धन पर्वत हातावर उचलून धरला, व त्याच्याखालीं गोकुळाला आश्रय देऊन इन्द्राचें कांहीं चालूं दिलें नाहीं.’ या भागवतांतील दन्तकथेचा व वरील ऋचांचा निकट संबंध असावा.

५४. इंद्राला देवत्व मिळाल्यानंतरची भागवताची गोष्ट आहे. तथापि तिच्यांत थोडासा ऐतिहासिक अंश असला पाहिजे. ही गोष्ट वरील ऋचांबरोबर वाचली म्हणजे निष्कर्ष निघतो तो असाः—“ इन्द्रानें पराक्रमी कृष्णावर हल्ला चढवला. इन्द्राजवळ घोडदळ असल्यामुळें इन्द्राचें सैन्य बळकट होतें. कृष्णाचें बळ म्हटलें म्हणजे गाई व बैल, आणि अत्यन्त जलद चालणारें सैन्य. पण कृष्णानें अशी जागा शोधून काढली कीं, इन्द्राचें त्याच्यापुढें कांहीं चाललें नाहीं; त्याच्या घोडदळाचा काहीं उपयोग झाला नाहीं. त्याला आपलें सैन्य घेऊन मागें जावें लागलें.” त्यानंतर पूर्वेकडे हल्ले करण्याची इन्द्रानें खटपट केली नसावी.

५५. इंद्राचे मदतनीस म्हटले म्हणजे मरुत् होत. ते कुठल्या प्रदेशांत रहात होते हें समजत नाहीं. पर्शिया आणि एलाम यांच्या दरम्यान जो मीडिया म्हणून देश होता त्यांतील किंवा आजकालच्या बलुचिस्तानांतील रहाणारे हे लोक असावेत. ऋग्वेदांत एक दोन ठिकाणीं मरुतांना शाक म्हटलें आहे. ‘ अस्य शाकैर्यदीं सोमासः सुषुता अमन्दन् ’ ऋ० ५।३०।१०, ‘ अस्य शाकैरिह नूनं वाजयन्तो हुवेम ’ ऋ० ६।१९।४, या दोन ठिकाणीं शाक शब्द मरुद्वाचक आहे असें सायणाचार्य म्हणतात. शाकांचा संबंध शकांशीं होता कीं काय ? असें असलें तर मरुतांचा पुढारी जो रुद्र तोच शकांचा महादेव असणें संभवनीय आहे.

५६. एकतिसाव्या जातकांत जी कथा आली आहे, व जिचा उल्लेख या विभागाच्या आरंभीं करण्यांत आला आहे, ती अशी—
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel