बुद्धाचा मध्यम मार्ग

६२. सध्या ज्याला आपण बुद्धगया म्हणतों, तेथें ध्यान-समाधीचा अनुभव घेत असतां बोधिसत्त्वाला तत्त्वबोधाचा नवा मार्ग सांपडला. तो लोकांना उपदेशावा कीं नाही, ह्याविषयीं बोधिसत्त्वाच्या मनांत बरेच साधकबाधक विचार आले. शेवटीं तो मार्ग सर्व लोकांस दाखवून देण्याचा त्याचा बेत ठरला. आडार कालाम व उद्रक रामपुत्र ह्या दोघांना त्या मार्गाचा बोध तात्काळ झाला असता. परंतु ते नुकतेच परलोकवासी झाले होते. रहातां राहिले त्याच्या बरोबर तपश्चर्या करणारे पांच भिक्षु. त्यावेळीं ते वाराणसीला ऋषिपत्तनांत १  रहात असत. त्यांना गांठण्यासाठीं बुद्ध भगवान् प्रवास करीत करीत वाराणसीला आला; व मोठ्या प्रयत्‍नानें त्या पांच भिक्षूंची त्यानें खात्री करून दिली कीं, आपण शोधून काढलेला तत्त्वबोधाचा खरा मार्ग आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ यालाच सध्या सारनाथ म्हणतात. )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
६३ भगवंतानें या पांच भिक्षूंना उपदेश केला तो असा- “भिक्षुहो, धार्मिक मनुष्यानें या दोन अंताना जाऊं नये. ते दोन अंत कोणते ? पहिला कामोपभोगांत सुख मानणें. हा अंत हीन, ग्राम्य, सामान्यजनसेवित, अनार्य आणि अनर्थावह आहे. दुसरा अंत देहदंडन करणें. हा दु:खकारक, अनार्य व अनर्थावह आहे. या दोन अंतांना न जातां तथागताने सुदृष्टि व ज्ञान उत्पन्न करणारा, उपशमाला, प्रज्ञेला, संबोधाला आणि निर्वाणाला कारणीभूत होणारा मध्यम मार्ग शोधून काढला आहे. तो कोणता? सम्यक् दृष्टि, सम्यक् संकल्प, सम्यक वाचा, सम्यक् कर्मान्त, सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति, सम्यक् समाधिं, हा तो आर्य अष्टांगिक मार्ग होय.

६४. “भिक्षुहो, दु:ख नांवाचें पहिलें आर्यसत्य हें आहे. जाति ( जन्म) दु:खकारक आहे, जरा दु:खकारक आहे, व्याधीहि दु:खकारक आहे, मरणहि दु:खकारक आहे; शोक, परिदेव, दु:ख, दौर्मनस्य, उपायास हेहि दु:खकारक आहेत. अप्रियांचा समागम दु:खकारक आहे, व प्रियांचा वियोग दु:खकारक आहे. इच्छिलेली वस्तु मिळत नसली म्हणजे तेणेंकरुनहि दु:ख होतें. संक्षेपानें पांच उपादानस्कंध दु:खकारक आहेत.१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ रूप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान या पांच पदार्थांना पंचस्कंध असें म्हणतात. हे पांच स्कंध वासनायुक्त असले म्हणजे त्यांना उपादानस्कंध असें म्हणतात. विशेष माहितीसाठीं ‘ बुद्ध, धर्म आणि संघ ’ परिशिष्ठ २ पहा.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
६५. “भिक्षुहो, पुन: पुन: उत्पन्न होणारी आणि अनेक विषयांत रमणारी तृष्णा, - जिला कामतृष्णा, भवतृष्णा आणि विनाशतृष्णा म्हणतात ती – दु:खसमुदय नांवाचें दुसरें आर्यसत्य होय.

६६. “त्या तृष्णेचा वैराग्यानें पूर्ण निरोध करणें, त्याग करणें, तिच्यापासून मुक्ति मिळवणें, हें दु:खनिरोध नांवाचें तिसरें आर्यसत्य होय.

६७. “आणि ( वर सांगितलेला) आर्य अष्टांगिक मार्ग हें दु:खनिरोधगामिनी प्रतिपदा नांवाचे चौथें आर्यसत्य होय.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel