४८. आजकाल जें जगांत प्राचीन वाङ्मय अस्तित्वांत आहे, त्यांत स्त्रीला परिग्रह मानतां कामा नये, हा विचार कोठें आढळत नाहीं. अर्थात् त्या काळीं स्त्रियांना स्वातंत्र्य मिळणें शक्यच नव्हतें. ‘न स्त्री स्वातंत्र्यमहर्ति’ १  हें मनूचें वाक्य प्रसिद्धच आहे. बौद्धांनी आणि जैनांनी भिक्षुणींचे आणि साध्वींचे संघ स्थापून स्त्रियांना बरेंच स्वातंत्र्य दिलें. परंतु तें त्यांच्या संघांपुरतेंच असे; आणि तें देखील अपत्यप्रेमाची किंमत देऊन त्यांना मिळवावें लागे.. त्या विवाहबंधनांत बद्ध झाल्या, तर त्यांची गणना उत्कृष्ट संपत्तींत होत असें. अर्थात् वैदिक वाङ्मयाप्रमाणें श्रमणवाङ्मयांतहि स्त्रियांचा समावेश परिग्रहांतच केला आहे. 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ अस्वतन्त्राः स्त्रिय: कार्या: पुरुषैः स्वैर्दिवानिशम् ।
विषयेषु च सज्जन्त्य: संस्थाप्या आत्मनो वशे ।।
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।
रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति ।।
मनुस्मृति, अ० ९।२-३
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
४९.  मध्ययुगीन हिंदी ग्रंथकारांत एक तेवढा वराहमिहिर स्त्रियांची तरफदारी करणारा आढळतो. तो म्हणतो –

येऽप्यङ्नानां प्रवदन्ति दोषान् वैराग्यमार्गेण गुणान्विहाय ।
ते दुर्जना मे मनसो वितर्क: सद्‍भाववाक्यानि न तानि तेषाम् ।।५।।
प्रब्रूत सत्यं कतरोSङ्नानां दोषोSस्ति जो नाचरितो मनुष्यै:।
धाष्टर्येन पुम्भि:प्रमदा निरस्ता गुणाधिकास्ता मनुनात्रचोक्तम् ।।६।।

बहिर्लोम्ना तु षण्मासान् वेष्टित:  खरचर्मणा ।
दारातिक्रमणे भिक्षां देहीत्युक्त्वा विशुध्यति ।।१३।।
अहोधाष्टर्यमसाधूनां निन्दतामनघा: स्त्रिय: ।
मुष्णतामिव चौराणां तिष्ठ चौरेति जल्पताम ।।१४।। २
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(२ बृहत्संहिता, अं० ७४.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(जे वैराग्यमार्गाचा अवलंब करून स्त्रियांचे गुण न पहातां दोष वर्णितात, ते दुर्जन आहेत, व त्यांचें तें बोलणें सद्धेतुक नाहीं, असें मला वाटतें ।।५।। खरें बोला कीं, जो पुरुषांनी आचरला नाहीं असा कोँणता दोष स्त्रियांमध्यें सांपडतो? केवळ धाष्टर्यानें पुरुषांनी स्त्रियांवर ताबा मिळवला. त्या पुरुषांपेक्षा अधिक गुणी आहेत, असें मनूचेंहि म्हणणें आहे ।।६।। जो आपल्या पत्‍नीचें अतिक्रमण करतो, त्याला प्रायश्चित्त म्हटलें म्हणजे त्यानें गाढवाचें चामडें लंव बाहेरच्या बाजूला करून पांघरावें, व सहा महिनेपर्यंत दारोदार भिक्षा मागावी ।।१३।। निष्पाप स्त्रियांची निंदा करणार्‍या दुष्टांचें हें धाडस? चोर्‍या करणार्‍या चोरांनी ‘चोरी थांब’ म्हणून ओरडण्यासारखेंच हें आहे ।।१५।। ) [ बृहत्संहिता, अं. ७४ ]

५०. या तरफदारीबद्दल वराहमिहिराचें कौतुक करावें तेवढें थोडेंच वाटतें.  तथापि, स्त्री हें अमूल्य रत्‍न आहे, अर्थात्  त्याचें जतन अत्यंत प्रयत्‍नानें केलें पाहिजे, या कल्पनेपासून वराहमिहिर मुक्त नव्हता. १

१ ह्याच अध्यायांत तो म्हणतो –
श्रुतं दृष्टं स्पृष्टं स्मृतमपि नृणां ल्हादजननं
न रत्‍नं स्त्रीभ्योSन्यत् क्वचिदपि कृतं लोकपतिना ।

अमेरिकेसारख्या भांडवलशाहीच्या शिखरावर चढलेल्या देशांत आजलाहि स्त्रीविषचींची कल्पना कमीजास्त प्रमाणानें अशाच प्रकारची आहे. तिच्या सुखासाठीं आणि ऐषआरामासाठीं वरिष्ठ वर्गांतील पुरुष आटोकाट मेहनत करीत असतात. आणि इतकें करूनहि वाटेल तेवढे काडीमोड होतातच! याचें कारण असें कीं, केवळ अमूल्य रत्‍नांप्रमाणें जोपासना केल्यानें स्त्रियांची स्वातंत्र्यतृप्ति होत नाहीं. आपल्या कमाईवर राहतां आल्यावांचून स्त्रियांना खरें स्वातंत्र्य मिळाले असें वाटणार नाहीं; आणि सध्याच्या भांडवलशाही जगांत मातृपद मिळवूं इच्छिणार्‍या स्त्रियांना आपल्या कमाईवर अवलंबून रहातां येणें शक्य नाहीं.

५१. आर्थिक स्वातंत्र्याशिवाय स्त्रियांना खरें स्वातंत्र्य मिळणार नाहीं, या विचाराचा पुरस्कार कार्ल मार्क्स यानें केला; व आजला त्याचे अनुयायी बोल्शेव्हिक पुढारी तो विचार अंमलांत आणूं पहात आहेत. त्यांच्या मार्गांत पुष्कळ विघ्नें आहेत, यांत शंका नाहीं, त्यांत मुख्य विघ्न स्त्रियांचे संस्कार हें होय. हजारों वर्षें पारतंत्र्याच्या अंधारकोठडींत कोंडल्या गेलेल्या स्त्रियांना एकाएकीं प्रखर स्वातंत्र्याच्या सूर्यप्रकाशात पाऊल टाकणें धोक्याचें वाटावें यांत नवल नाहीं. येथें आम्हास पॅरिसमधील बास्तिल किल्यांत तीस वर्षेंपर्यंत कोंडलेल्या एका स्त्रीची गोष्ट आठवते. फ्रेंच राज्यक्रान्तीच्या आरंभीं सामान्य जनतेनें जेव्हां हा किल्ला  पायासकट खणून टाकला, तेव्हां तेथें कोंडलेल्या राजकीय कैद्यांबरोबर ह्या स्त्रीलाहि स्वतंत्रता मिळाली. पण ती सूर्यप्रकाश पाहून अतिशय घाबरून गेली व म्हणाली कीं, ‘जर तुम्ही मला माझ्या अंधारकोठडींत नेऊन पोंचवलें नाहीं, तर मी कोणाचा तरी खून करून फांशी जाईन !’  चिरकालपर्यंत अंगवळणीं पडलेले घातक संस्कार देखील माणसाला किती प्रिय होतात पहा !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel