३३.  ही झाली महाब्रह्म्याची गोष्ट. परन्तु बौद्ध श्रमणांची एका ब्रह्मदेवानें तृप्ति झाली नाहीं. त्यांनी अनेक ब्रह्मदेव निर्माण केले. त्यांपैकी सहंपति ब्रह्मा हा बुद्धाचा विशेष भक्त दिसतो. “उरुवेल येथें बुद्धानें जेव्हां प्रथमत: धर्म जाणला, तेव्हां त्याच्या मनांत असा विचार आला कीं, ‘हा धर्म मी मोठ्या प्रयासानें जाणला आहे. तो लोकांना उपदेशिणें योग्य नाहीं. कां कीं, रागद्वेषानें बुद्ध झालेले लोक हा धर्म सुगमपणें जाणूं शकणार नाहींत. प्रवाहाच्या उलट जाणारा, सूक्ष्म, गंभीर, दुर्दर्श आणि अणुमय असा हा धर्म अंधकारानें व्यापलेले लोभी लोक जाणूं शकणार नाहींत !”

३४.  “बुद्धाचा हा विचार सहंपति ब्रह्म्याला समजला. तो आपल्याशींच उद्‍गारला, ‘तथागत अर्हंत सम्यक संबुद्ध विशेष खटपटींत न पडण्याचा विचार करतो ! धर्मोपदेश करण्याचा विचार करीत नाहीं. हाय ! हाय ! ह्या लोकाचा विनाश होणार ! तेव्हां एकदम ब्रह्मा बुद्धासमोर प्रगट झाला व बुद्धाला हात जोडून म्हणाला, ‘भगवन् ! तूं धर्मोपदेश कर. जगांत अल्परजस्क प्राणी आहेत. धर्म न ऐकल्यामुळें त्यांची हानि होत आहे. ते तुझा धर्म जाणतील. हे भगवन्, ह्या मगध देशांत मलिन माणसांनी उपदेशिलेला धर्म चालू आहे. ह्या लोकांसाठीं तूं हें अमृतद्वार मुक्त कर. निर्मल बुद्धानें जाणलेला हा धर्म लोकांना ऐकूं दें’.... ही ब्रह्मदेवाची विनंती ऐकून प्राण्यांवरील करुणेमुळें बुद्धानें धर्मोपदेश करण्याचा बेत केला.”१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ विनयमहावग्ग, महाक्खन्धक, ब्रम्हयाचनकथा; मज्झिमनिकाय, अरियपरियेसनसुत्त.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३५.  बुद्धाच्या वेळीं ब्रह्मसायुज्येतला कसें जावें यासंबंधीं ब्राह्मण वर्गांत बराच मतभेद होता असें दिसतें. त्याचें थोडेसे वर्णन दीघ निकायांतील तेविज्जसुत्तांत आलें आहे, तें असें – “एके समयीं भगवान् कोसल देशांत प्रवास करीत असतां मनसाकट नांवाच्या ब्राह्मणग्रामाला आला, व तेथें त्या गांवाच्या उत्तरेस अचिरवती नदीच्या तीरीं आम्रवनामध्यें वस्तीला राहिला. त्या वेळीं चंकी, तारुक्ख, पोक्खरसाति, जानुस्सोणि, तोदेय्य इत्यादि प्रसिद्ध ब्राम्हण मनसाकट येथें रहात असत. त्यांपैकीं वासिष्ठ आणि भारद्वाज या दोन तरुण ब्राह्मणांत एक वाद उपस्थित झाला. वासिष्ठ म्हणे कीं, पोक्खरसाति ब्राह्मणानें सांगितलेलाच ब्रह्मसायुज्यतेचा मार्ग बरोबर आहे. भारद्वाज म्हणे, तारुक्ख ब्राह्मणानें सांगितलेला मार्गच ठीक आहे. ते उभयतां परस्परांचें समाधान करूं शकले नाहींत. तेव्हां वासिष्ठ भारद्वाजाला म्हणाला, ‘आजकाल हा श्रमण गोतम शाक्यपुत्र आम्रवनांत रहात आहे. तेथें जाऊन त्याला हा प्रश्न आम्ही विचारूयां.’

३६.  “ते दोघेहि बुद्धाजवळ आले आणि त्यांनी त्याला हा प्रश्न विचारला. त्यावर भगवान् म्हणाला, ‘तुम्ही निरनिराळे मार्ग मानतां. त्यांत तुमचा मतभेद आहे तो कोणता?’ वासिष्ठ म्हणाला, ‘अध्वर्य ब्राह्मण, तैत्तिरीय ब्राह्मण, छांदोग्य ब्राह्मण, बहवृच ब्राह्मण ब्रह्मसायुज्यतेचा निरनिराळा रस्ता सांगतात; तरी ते सर्व मार्ग ब्रह्मसायुज्यतेला जातातच. जसे एकाच गांवाला किंवा निगमाला निरनिराळे रस्ते येऊन मिळतात, तसे निरनिराळ्या ब्राह्मणांनी उपदेशिलेले हे मार्ग ब्रह्मसायुज्यतेलाच जातात.’ भगवान् म्हणाला, ‘पण, हे वासिष्ठ, एकाद्या ब्राह्मणानें किंवा त्यांच्या आचार्य-प्राचार्यांपैकी कोणी तरी, अथवा वामदेव विश्वामित्रादिक मंत्रद्रष्टया ऋषींनी ब्रह्मदेवाला पाहिलें आहे काय?’
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel