९५. श्रमणसंस्कृतींत जे दोष शिरले, त्याला मुख्य कारण म्हटलें म्हणजे राजाश्रय हें असावें. बुद्धानें आपली लहानशी वतनवाडी सोडून संन्यास घेतला; व पंचेचाळीस वर्षेंपर्यंत धर्मप्रसाराचें काम केलें. पण ह्या अवधींत त्याचा आणि महाराजांचा क्वचितच संबंध येत असे. विनय-महावग्गांत बिंबिसार राजानें बुद्धाचा मोठा सन्मान करून त्याला वेणुवन दान दिलें. इत्यादि ज्या कथा आहेत त्या निखालस कल्पित असाव्यात. कां कीं, त्यांना सुत्तपिटकांत मुळींच आधार सांपडत नाहीं. बिंबिसार राजा उदार होता, व तो सर्व पंथांच्या श्रमणांना समतेनें वागवीत असें. तेव्हां त्यानें बुद्धाला व त्याच्या संघाला आपल्या वेणुवनांत रहाण्याला परवानगी दिली असली, तर त्यांत विशेष असें कांहींच नाहीं.

९६. बुद्धाचा मुख्य विहार म्हटला म्हणजे श्रावस्ती येथील अनाथ पिंडिकाचा आराम. पण तो राजानें बांधला नव्हता. अनाथपिंडिक किंवा सुदत्त या नांवाच्या प्रसिद्ध व्यापार्‍यानें तो बांधला होता. श्रावस्ती येथेंच विशाखा नांवाच्या धनाढ्य स्त्रीनें बौद्ध संघासाठीं एक प्रासाद बांधला होता. विशाखेला मिगारमाता या नांवानें ओळखत असत;  आणि म्हणूनच त्या प्रासादाला मिगारमातेचा प्रासाद म्हणत. बुद्धाच्या आयुष्यांतील पुष्कळसे चातुर्मास या दोन ठिकाणीं गेले. राजा पसेनदि बुद्धाला भेटावयाला मधून मधून अनाथ पिंडिकाच्या आरामांत येत असे. परंतु त्याच्यावर बौद्धधर्माचा विशेष प्रभाव पडला नसावा, हें वर दिलेल्या त्याच्या यज्ञाच्या वर्णनावरून स्पष्ट होतें. १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ वि. २|८१-८२ पहा. )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
९७. इतर ठिकाणीं जे बुद्धाचे विहार असत त्यांत कपिलवस्तु येथें शाक्यांनी बांधलेला निग्रोधाराम हा एक होता. शाक्य राजे बुद्धाच्या ज्ञातिवर्गापैकीं होते. बुद्धाच्या उत्तरवयांत त्यांनी हा विहार बांधला असावा. कौशाम्बी येथें घोषित श्रेष्ठीनेंहि बुद्धासाठीं एक विहार बांधला होता. यावरून असें दिसून येतें कीं, बुद्धाच्या हयातींत कोणत्याहि महाराजानें बुद्धाला विहार बांधून दिला नाहीं. त्याचा धर्म राजांसाठीं नसून सामान्य जनतेसाठीं होता; आणि मध्यम वर्गांतील उदार लोक तेवढे त्याच्या रहाण्यासवरण्याची व्यवस्था पहात.

९८ परन्तु अशोकानंतर हा मनु पालटला. बौद्धधर्म राजाश्रित बनला. राजाश्रय मिळवण्याचा प्रयत्‍न प्रथमत: बौद्धांनी केला कीं जैनांनी केला हें सांगतां येत नाहीं. चन्द्रगुप्त राजा जैन होता हें खरें मानलें, तर राजाश्रयाचा प्रथम प्रयत्‍न जैनांनी केला असें म्हणावें लागेल. पण हा प्रश्न महत्त्वाचा नाहीं. एवढें खरें कीं, अशोकानंतर जैन व बौद्ध या दोन्ही पंथाची राजाश्रय मिळवण्याची खटपट दिसून येते.

९९. अशोकाला कोणत्या तरी बौद्ध साधूनें बुद्धोपासक करण्याचा प्रयत्‍न केला, याला त्याच्या शिलालेखांत आधार नाहीं. पण हाहि मुद्दा विशेष महत्त्वाचा नाहीं. तो बौद्ध झाल्यावर त्यानें अनेक विहार बांधले, व हजारों भिक्षूंचा योगक्षेम सुखानें चालेल अशी व्यवस्था केली, यांत शंका नाहीं. अशोकानें एकंदर चौर्‍याऐंशी हजार विहार बांधले, अशी दंतकथा आहे. पण तिच्यांत तथ्य एवढेंच असावे कीं, अशोक राजाचें अनुकरण करून त्याच्या प्रजेनें व आजूबाजूच्या राजेरजवाड्यांनी हजारो विहार बांधले; व त्यांची संख्या ऐशीं नव्वद हजारांवर गेली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel