१०

मुंबईस

मुंबईला संपाची वावटळ कधीं उठेल याचा नेम नव्हता. मिलचे मालक वाटेल तेव्हां चावटपणा करीत. किती तरी वर्षांपूर्वीं मंदी म्हणून त्यांनीं पगारकाट केली होती. ती तशीच चालू होती. मंदी संपली होती. तेजी होती; परंतु पगार कमीच. आम्हांला परवडत नाहीं हें मालकांचें तुणतुणें नेहमींचें ठरलेलें. या कारखानदारांचे हिशेब मोठे और असतात. सतराशें फंडांतून रकमा दाखवतील. पुन्हां एजन्ट तेच. एजन्सीचें कमिशन तेच खाणार. तें कमिशन कमी होतां कामा नये. सतरा तोंडांनीं मालक खात असतो व जगाला कारखाना नुकसानींत आहे असें दाखवतो. हातचलाखी हें तर बुध्दीचें लक्षण.

गिरण्यांतील माल उठत नाहीं असें एकीकडे हे मालक म्हणत होते, तर दुसरीकडे रात्रपाळया सुरु होत होत्या ! मालाचा उठाव नसता तर रात्रपाळया सुरू झाल्या असत्या का ? परंतु मालक सामोपचारानें थोडेंच ऐकणार ?

कामगार-युनियनचें रात्रपाळीच्या बाबतींत असें म्हणणें होतें कीं, रात्रपाळीवाल्याला अधिक मजुरी दिली पाहिजे. परंतु मालक तें मान्य करीत नव्हते. कामगार पुढा-यांनीं अर्थशास्त्रावरील पुस्तकांतील उतारे सादर केले. परंतु मालक म्हणाले, “ते उतारे काय करायचे ? रात्रीं काम करणारे का अधिक काम करतात ?”

“रात्रीं काम केल्यानं आयुष्य कमी होतं, असं या पुस्तकांत स्वच्छ आहे. रात्रीं काम करणारा दिवसा झोंप घेतो. परंतु ती झोंप व नीट येत नाही. रात्रीची झोंपच खरी आरोग्यदायी असते. दिवसाचं आठ तास काम व रात्रीचं आठ तास काम यांत फरक आहे. दिवसां काम करण्यांत जो ताण पडतो, यांत त्याच्या दीडपट ताण रात्रीं पडतो.” असें कामगार पुढा-यांनीं पुराव्यानिशीं सिध्द केलें.

परंतु मालकांचा नकार ठेवलेलाच. दुसरेहि अनेक प्रश्न होते. आणि अशा रीतीनें हळूहळू प्रकरण चिघळत चाललें. शेवटीं युनियन संपाचा विचार करूं लागलें. आणि मुख्य संपाची तयारी म्हणून आधीं एकच दिवस सर्वत्र संप करण्याचें निश्चित करण्यांत आलें. त्या एक दिवसाचा संप यशस्वी व्हावा म्हणून सर्वत्र जोरांत प्रचार सुरू झाला. कामगारांचें वर्तमानपत्र “ठिणगी” सर्वत्र तेजाचे झोत सोडूं लागलें. ठिणगीचे हजारों अंक खपूं लागले. कोंप-याकोंप-यावर सायंकाळीं प्रचारसभा होऊं लागल्या. मोटरलॉरीवरून कर्ण्यांतून घोषणा घुमवण्यांत येऊं लागल्या.

अशा परिस्थितींत कल्याण व विश्वास आले. एका मोठया कामगार पुढा-याकडे ते उतरले. तो एक थोर पुढारी होता. दिसायला साधा, परंतु त्याची शक्ति महान होती. त्याचें संघटनाचातुर्य अप्रतिम होतें. कामगार त्याला आपला प्राण मानीत. पूर्वी एका संपांत त्याच्यावर येणारी गोळी एका कामगारानें स्वत:वर घेतली. इतकें कामगाराचें त्या पुढा-यावर प्रेम होतें. अपार कष्ट त्यानें सोसले होते. तुरुंगांत कित्येक वर्षें काढली होतीं. तुरुंगांत खडी फोडून हात रक्तबंबाळ झाले होते. अर्थशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. कल्याण व विश्वास यांना आनंद झाला. त्या घरीं ते एकरूप झाले. ते गेले तेव्हां तो पुढारी आपल्या लहान मुलीला खेळवीत होता. तें दृश्य मोठें विलोभनीय होतें. गिरणी-मालकांना ज्याच्या नांवानें कांपरें भरे, सरकार ज्याला वचके, कामगार ज्याच्या शब्दानें मरायला तयार होत, असा तो उग्र नेता लहान मुलीला खेळवीत होता, तिच्याकडून आपलें केस ओढवून घेत होता. नेपोलियनचें असेंच एक चित्र आहे. युरोपची सिंहासनें मोडणारा व उभारणारा नेपोलियन मांडीवर मुलाला घेऊन बसला आहे असें तें चित्र आहे. वात्सल्य म्हणजे एक अपूर्व चीज आहे. औरंगजेब कोठेंहि नमत नसे. परंतु स्वत:च्या मुलीसमोर नमे. त्याच्या हृदयांतील गोठलेली माणुसकी, गोठलेली कोमलता तेथें प्रकट होई व माणुसकीचा अनुभव त्याला येई.

कल्याण व विश्वास यांना ठिणगी पत्राच्या कचेरींत काम देण्यांत आलें. विश्वासला निरनिराळया वर्तमानपत्रांतील बातम्या थोडक्यांत काढण्याचें काम देण्यांत आलें. तसेंच इतर कांही लेखांचें भाषांतर करण्याचेंहि काम त्याला असे. विश्वास सुंदर लिही. त्याचें लिहिणें तेथील मंडळीला आवडूं लागलें. कल्याण मुद्रितें तपाशी. दोघे मित्र कामांत दंग असत. जणूं तें वर्तमानपत्र त्यांचेंच होतें. त्या दोघांची निष्ठा व कार्यतत्परता पाहून सर्वांना कौतुक वाटे. दिवसभर काम करून सायंकाळीं प्रचार-सभांना ते दोघे पुन्हां जात. अशा रीतीनें वेळ केव्हांच जाई.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel