“काय कल्याण, कसं आहे संध्येचं ? ताप वगैरे नाहीं ना ?”

“ताप नाहीं. परंतु फारच गळून गेली आहे. प्रसूतीच्या वेदना आणि त्यांहून तीव्र अशा मनोमय दु:खाच्या वेदना. उन्हानं वेल गळून जावी तशी माझी संध्या झाली आहे. कांहीं खाईना. परंतु शेवटीं दोन घांस भरवले. आणि भाईजी, सांजाशिरा वगैरे नाहीं द्यायचा. अगदीं हलकं अन्न द्यायचं असं डॉक्टर व तिथल्या त्या बाई म्हणाल्या. त्या बाई फार प्रेमळ आहेत. तुम्हांला त्या ओळखतात. चाळीसगांवला एकदां तुमचं व्याख्यान त्यांनीं ऐकलं होतं. संध्येजवळ त्या बसतात, धीर देतात. संध्या शांत होत आहे. आणि विश्वास वगैरे कुठं गेले सारे ?”

“कोणी तरी मित्र आले होते, त्यांच्याबरोबर विश्वास, बाळ वगैरे गेले. कुठं गेले तें मला माहीत नाहीं. ते गर्दीत होते.”

“मीहि जाऊन येऊं का, भाईजी ? तुम्हांला एकटयाला सारं करावं लागतं.”

“कल्याण, असं नको हो म्हणूं. जाऊन ये.”

कल्याणहि गेला. पाऊस पडत होता. परंतु त्याला काय त्याची पर्वा ? आगींत घुसणारीं तीं माणसें. तीं का पावसांतून जायला भितील ? पाहा त्यांची कर्तव्यनिष्ठा, ध्येयाचा ध्यास. पत्नी दवाखान्यांत पडलेली. काल तो तसा प्रसंग; परंतु सारीं दु:खें गिळून, अश्रु गिळून कार्यासाठीं धांवपळ सुरूच आहे. कोप-यांत बसून मुळुमुळु रडणें नाहीं, कांहीं नाहीं. घरांत काय आहे, डाळतांदूळ आहेत कीं नाहीं, संध्येला सायंकाळीं काय करून न्यायचें, कशाचा विचार करायला वेळ नाहीं. क्रांतीचे निस्सीम उपासक, क्रान्तीच्या निदिध्यासानें रंगलेले कर्मवीर !

बारा वाजून गेले. भाईजी वाट पाहात होते. पाऊस पडतच होता. रंगाहि आला. परंतु अद्याप विश्वास वगैरेंचा पत्ता नाहीं. शेवटीं एकदांचे आले सारे. ओलेचिंब होऊन आले होते. सर्वांनीं कपडे काढले. अंगें पुसून नवीन कपडे घालून सारे जेवायला बसले.

“कल्याण, आपण इथं राहायला आलों ही गोष्ट पोलिसांना कळली.” विश्वास म्हणाला.

“तो सी. आय्. डी. इथं घिरटया घालीत होता.” रंगा म्हणाला.

“अरे, आपण प्रसिध्द व्यक्ति आहोंत. आपलं रक्षण करायला सरकार सदैव पाठीशीं असतं.” कल्याण म्हणाला.

“सरकार काय रक्षण करणार ?” भाईजी म्हणाले.

“आज हरणी नाहीं वाटतं आली ?” विश्वासनें विचारलें.

“नाहीं आली.” भाईजींनीं सांगितलें.

“संध्येकडे जायला तिला सांगितलं असतं.” तो म्हणाला.

“बाळ आपल्या आईला घेऊन तिच्याकडे जाणार आहे. तो आत्तांच घरीं गेला.” कल्याण म्हणाला.

“बाळची आई इथं येऊन गेली. जुन्याचे तांदूळ व साजुक तूप देऊन गेली.” भाईजींनीं सांगितलें.

“प्रेमळ आहे माउली.” कल्याण म्हणाला.

जेवणें झालीं. सारे दमले होते. सर्वांच्या मनालाहि शीण आलेला होता. सारे झोंपले. तों हळूच दार उघडून कोणी तरी आलें. कोण होतें ?

त्या घराचा तो मालक होता. तो वृध्द पेन्शनर होता. कां आला तो ? काय काय ? विश्वास एकदम जागा झाला. तो उठला.
“काय पाहिजे ?” त्यानें विचारलें.

“तुमच्याजवळ थोडं बोलायचं आहे. इकडे येतां का ?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel