११

संध्येची चलबिचल

संध्या दु:खी झाली होती. तिच्या डोळयांत नाचणारी आशा कोठें उडून गेली ती परत येईचना. तिचें हास्य कुठें पळून गेलें तें तिला पुन्हां भेटायला येईना. ती खिन्न, अति खिन्न असे. सायंकाळीं संध्येचे सुरम्य रंग दिसतात. परंतु ते रंग जातात व भीषण रात्र पसरते. अंधार पृथ्वीला घेरतो. चंद्रमा असला तर बरें. नाहीं तर ता-यांची ती नुसती चकमक अंधाराला तेजस्वी करूं शकत नाहीं. उलट ते थरथरणारे तारे पाहून अंधारांत जीव अधिकच थरथरू लागतो. संध्येची मन:स्थिति अशीच झाली होती. क्षणभर तिला आशा वाटे, परंतु ती आशाच अधिक उदास करी. भयाण अंधारांत मिणमिण दिवा भीतिदायक वाटतो. संध्येला ध्यानींमनीं कल्याण दिसे. स्त्रिया देतात तेव्हां सर्वस्व देतात. स्त्रिया म्हणजे धो धो वाहात येणा-या सरिता. एकदां एखाद्या गोष्टीकडे त्या निघाल्या, म्हणजे त्यांना अन्य दिसत नाहीं, अन्य सुचत नाहीं. स्त्रियांना सर्वस्वसमर्पणांत पूर्णता वाटते. प्रिय वस्तूशीं सायुज्य मोक्ष त्यांना पाहिजे असतो. लहानसें ध्येयहि त्यांना परिपूर्णतेच्या परमेश्वराचें दर्शन घडवूं शकतें. संध्या प्रेम देत होती. रात्रंदिवस दोन्ही डोळयांतून प्रेमाचें अर्ध्य सोडीत होती. परंतु तिचा प्रेम-देव कोठें होता ? सूर्य दूर असला, दिसत नसला तरी भक्त त्याला अर्ध्य अर्पितोच कीं नाहीं ? संध्येचा सूर्यनारायण तुरुंगांतील भिंतीआड होता. ती त्याला दुरून पूजा पाठवींत होती.

“संध्ये, तूं हा मृगजळाचा नाद सोडून दे” एके दिवशीं आई म्हणाली.

“आई, मला जगवणा-या जीवनाला तूं का मृगजळ म्हणतेस ? हें मृगजळ नाहीं, हें अमृतवर्षण आहे. हा अमृतसिंधु आहे.”

“अग, तो कल्याण सदोदित तुरुंगांत राहणार. एखाद्या दिवशीं बाहेर येईल. परंतु पुन्हां तुरुंग. तुरुंग हेंच त्याचं घर. तुला कुठला आनंद, कुठलं सुख ? माझं ऐक.”

“आई, यांतच माझा आनंद आहे, सर्व सुख आहे. ज्याला मीं मनानं वरलं, तो असा त्यागी तरुण आहे हेच माझं भाग्य. तो केवळ भोगासक्त जीव नाहीं हेंच माझं भाग्य. आई, सावित्रीनं अल्पायुषां होणारा परंतु सद्गुणसागर असा सत्यवान् वरला. खरं ना ? ज्याला मीं मन दिलं, त्याला दिलं. आई, संध्या रडतांना दिसली तरी ती त्यांतहि आनंद मानते हो. मी का मला सुख नाहीं म्हणून रडतें ? कल्याणचे हाल डोळयांसमोर येऊन मी रडतें.”

“बरं बाई. मी तरी काय सांगूं ?” असें म्हणून आई कामाला गेली.

संध्येनें कल्याण फोटो आपल्या उशाशीं ठेवला होता. त्याची ती पूजा करी. रात्रीं सारीं झोंपत. संध्या हळूच उठे. तो फोटो घेऊन ती अंगणांत जाई. सायंकाळीं आणून ठेवलेली फुलें त्याला वाही. ती तो फोटो हृदयार्शी धरी. त्याच्याजवळ बोले, हंसे, रडे. वर आकाशाकडे तोंड करून ती देवाची प्रार्थना करी. माझ्या जीवनाचा राणा सुखरूप परत आण असें ती देवाला विनवी.

कल्याण तुरुंगांत होता. तुरुंग आतां जरा सुधारले होते. निर्जीव यंत्रांत थोडी माणुसकी आली होती. शिवीगाळ, मारहाण जरा प्रमाणांत झाली होती. कैदी जरा आनंदले होते. जुन्या शिस्तींत वाढलेले व सतरा जेलांचें पाणी पिऊन आलेले कैदी म्हणत, “अब तो जेल नहीं । सब ताबुत थंडे हो गये ।”

“काय हो, पुन्हां काँग्रेसची चळवळ कधीं सुरू होईल ? गांधीबाप्पा चळवळ कधीं करील ?” कैदी कल्याणला उत्सुकतेनें विचारीत. मागें ३०-३२ सालीं चळवळ झाली तेव्हां सत्याग्रहींना जागा व्हावी म्हणून सरकारनें इतर कैदी सोडून दिले होते. पुन्हां अशी चळवळ झाली तर आपण सुटूं अशी त्यांना आशा वाटे. म्हणून ते कल्याणला आशेनें विचारीत.

“काँग्रेसची चळवळ सध्यां तर नाहीं. पुढं कदाचित् होईल.” कल्याण सांगे.

“तुम्ही काँग्रेसचेच ना ?”

“मी काँग्रेसचाच. परंतु थोडा पुढं गेलेला. आमचं म्हणणं असं कीं, सत्ता श्रमणा-यांच्या हातीं असावी. शेतक-या-कामगारांचं राज्य व्हावं. श्रमावं यांनीं व सत्ता गादीवाल्यांच्या हातीं, हें आम्हांला पसंत नाहीं.”

“खरं आहे दादा तुमचं म्हणणं.” कैदी म्हणत.

त्या तुरुंगांत कल्याण एकटाच राजकीय कैदी होता.

त्याची प्रकृति खालावली. त्याला रक्ती आमांश सुरू झाला. तो दवाखान्यांत पडून होता. त्याचें वजन घटलें. तो दुबळा झाला. परंतु शांतपणें तो पडून राही. त्यानें घरीं कोणाला कळविलें नाहीं कीं मी आजारी आहें म्हणून. आणि भेटायला तरी इतक्या लांब कोण येणार ?

परंतु एके दिवशीं अकस्मात् भेट आली. कोण आलें होतें भेटावयाला ? विश्वास आला होता. बरेच दिवस विश्वास खानदेशांतील शेतक-यांत हिंडत होता. तिकडे त्याला नवीन मित्र भेटले. त्यांच्याशीं त्यानें नवीन स्नेहाचें नातें जोडलें. विश्वासला आनंद झाला होता. खानदेशी मित्रांतील एकाचें त्याच्यावर प्रेम जडलें. या खानदेशी मित्राचें नाव भाईजी. भाईजी खानदेशांतील शेतक-यांत नवचैतन्य निर्मू पाहात होते. दुष्काळ पडला होता. भाईजी सर्वत्र हिंडत होते. त्यांच्या प्रयत्नांची माहिती कळूनच विश्वास तिकडे गेला होता. भाईजींबरोबर तो सर्वत्र हिंडला. जणूं भाईजींचा तो लहान भाऊ झाला. भाईजींचा निरोप घेऊन विश्वास परत निघाला, तेव्हां त्यांना किती तरी वाईट वाटलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel