जेवणें झाली. मित्र बाहेर बोलत बसले होते. संप मोठा होणार असें सर्वांचें म्हणणें होतें. भाईजी मुके होते.

“तुम्ही कांहींच का बोलत नाहीं ?” विश्वासनें विचारलें.

“मला काय समजतं ? तुमच्या सा-या शास्त्रीय गोष्टी.” ते खिन्नपणें म्हणाले.

“भाईजी, हा टोमणा ना ?”

“कीं हा विनय ?”

“हा टोमणाहि नाहीं, विनयहि नाहीं; हें सत्यकथन आहे.” भाईजी गंभीरपणें म्हणाले.

“तुमच्या मनांत कांहींच का विचार येत नाहींत ?” विश्वासनें तीव्रतेनें विचारलें.

“विचार येतात; परंतु तुमचे विचार निराळे, माझे निराळे. मी स्वत:ला गांधीवादी म्हणवतों; गांधीवादी मला तसं समजोत वा न समजोत. वाद हा शब्दहि मला आवडत नाहीं. आपल्या परंपरेंत निरनिराळया विचारसरणींना योग हा शब्द लावीत. सांख्ययोग, भक्तियोग, ज्ञानयोग. मी गांधीयोगाचा उपासक आहें. त्याला सर्वोदययोग म्हणणं अधिक चांगलं. तुम्ही विग्रहावर भर देतां. आम्ही समन्वयावर भर देतों. सामोपचारानं जरा घ्यावं. या देशांत तरी रक्तपाताचे प्रयोग न होवोत. महात्माजी संप करूंच नये असं म्हणत नाहींत. संपाचा अधिकार आहेच. अहमदाबादला कामगार संप संपवून परत तसेच कामावर जाऊं लागलेले पाहतांच महात्माजींनीं उपवास सुरू केला. संप लढवा ते म्हणाले. संप म्हणजे शेवटचं हत्यार. तें हातीं घेतलं म्हणजे मग खालीं ठेवूं नये. अहमदाबादला कामगारसंघटना आहे. तिनं का कामगारांचा फायदा केला नाहीं ? तुम्हां मुंबईच्या कामगारपुढा-यांना तसा फायदा करून दिल्याचं दाखवतां येणार नाहीं. उठल्या बसल्या तुमच्या संपाच्या गर्जना.” भाईजी बोलले.

“भाईजी, आमची संघटना केवळ दीड दोन आणे पगारवाढ व्हावी म्हणून नाहीं. आर्थिक फायदा झाला तर हवाच आहे. परंतु आमची संघटना राजकीय आहे. शेवटी सर्व सत्ता श्रमणा-यांच्या हातीं यावी हें आमचं ध्येय आहे. तुमच्या डोळयांसमोर हें ध्येय आहे का ? तुमच्या डोळयांसमोर कामगार आज नऊ तास काम करीत असेल, तर उद्यां त्याला आठ तास काम करून पुरेशी मजुरी मिळाली म्हणजे झालं, असं असेल. वर्गसमन्वयाची भाषा बोलणा-यांसमोर बहुजनसमाजाचं कोणतं चित्र असतं ? कामगाराला थोडी अधिक मजुरी द्या, जरा चाळी नीट बांधून द्या, थोडी पगारी रजा द्या; याहून अधिक भव्य असं भविष्यकालीन दृश्य तुमच्या दृष्टीसमोर आहे का ? आमच्यासमोरचं चित्र निराळं आहे. सारं उत्पादन आम्ही यांत्रिक करूं. दोनतीन तास काम करून सर्व मानवी गरजा भागतील असं करूं. आणि सर्वांना मग भरपूर विश्रांति मिळेल. सारी संस्कृति फुरसतीच्या वेळीं निर्माण होते. उद्यांच्या नवसंस्कृतींत सारी मानवजात भाग घेईल. माझे कामगार इतिहास वाचतील, भूगोल वाचतील. कोणी शास्त्रज्ञ होतील, कोणी कलांची उपासना करतील. चित्रालयं, ग्रंथालयं, पदार्थसंग्रहालयं, प्रयोगालयं ठायीं ठायीं असतील. ज्ञानोपासना, कलोपासना मोफत असेल. सारी जनता स्वत:चा बौध्दिक विकास करून घेईन. महान् ध्येय, थोर दृश्य ! तुमच्यासमोर आहे का हें उदात्त भवितव्य ? तुमच्या रामराज्यांत कामगार केवळ राबणारा कामगार म्हणूनच राहील. त्याला ज्ञानाचा, कलेचा आनंद मिळणार आहे का ? कामगारांना थोडी डाळरोटी अधिक द्याल, परंतु मानवी संस्कृतींत भाग घेणारा, भर घालणारा असा तो होईल का ? तुमच्या वर्गसमन्वयांत गादीवर लोळणारे राहायचेच आणि केवळ श्रमणारे राहायचेच. हें क्षुद्र ध्येय आमचं नाहीं. दोन दिडक्या अधिक मिळवून संतुष्ट व्हा असं आम्ही कधींहि सांगणार नाहीं. श्रमणा-याला संपूर्ण विकसित मानव आम्हीं करूं इच्छितों. जीवनांतील बुध्दीचे व कलांचे आनंद त्याच्या दारीं नेऊं इच्छितों. आम्हांला अशी समाजरचना हवी आहे, जींत सर्वांना स्वत:चा विकास करून घ्यायला पूर्ण वाव असेल, अवसर असेल.” विश्वास भावनोत्कटतेनें बोलत होता.

क्षणभर सारे स्तब्ध होते. भाईजी शेवटीं म्हणाले, “विश्वास, तुम्ही तुमच्या मार्गानं जा. मी काँग्रेसचा सेवक आहें माझ्या काँग्रेसलाहि सर्वांचा विकास हवा आहे. महात्माजींना सारे श्रमणारें सदैव राबतच असावेत असं कांहीं वाटत नाहीं. त्यांनाहि कलेचा आनंद असावा असं त्यांना वाटतं. आणि काय रे, जी श्रमजीवि जनता आहे, त्या जनतेजवळ का कला नाहीं, संस्कृति नाहीं ? सुंदर सुंदर गाणीं, सुंदर नृत्यं त्यांच्याजवळहि आहेत. नागपंचमी आली तर शेतक-यांच्या बायका फेर धरून त्यांच्याजवळहि आहेत. नागपंचमी आली तर शेतक-यांच्या बायका फेर धरून का गाणीं म्हणत नाहींत ? कलेशिवाय कोणी जगूं शकत नाहीं. सर्वांजवळ संस्कृति असते. माणुसकीची संस्कृति श्रमणा-यांजवळ का कमी आहे ? परंतु बहुरंगी संस्कृतिहि त्यांना मिळूं नये असं का आम्हांला वाटतं ?”

“परंतु तुमच्या ग्रामोद्योगानं ती कशी मिळेल ? अधिक फुरसत तर हवी ?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel